2 वर्षे 50 मृत्यू 1000 प्रश्न

By admin | Published: July 9, 2015 03:45 AM2015-07-09T03:45:47+5:302015-07-09T03:45:47+5:30

आजपासून बरोबर दोन वर्षांपूर्वी व्यापमं घोटाळ्याप्रकरणी पहिला गुन्हा नोंदवला गेला आणि यानंतरच्या दोन वर्षांत या प्रकरणावरून मध्य प्रदेशचे राजकारण ढवळून निघाले.

2 years 50 deaths 1000 questions | 2 वर्षे 50 मृत्यू 1000 प्रश्न

2 वर्षे 50 मृत्यू 1000 प्रश्न

Next
>
मध्यप्रदेश व्यापमं घोटाळा
 
विशेष रिपोर्ट: शिवअनुराग पटैरया/राजेंद्र पाराशर
भोपाळ : आजपासून बरोबर दोन वर्षांपूर्वी व्यापमं घोटाळ्याप्रकरणी पहिला गुन्हा नोंदवला गेला आणि यानंतरच्या दोन वर्षांत या प्रकरणावरून मध्य प्रदेशचे राजकारण ढवळून निघाले. सरकारी व कायदेशीर लढाई लढली गेली. पीएमटी परीक्षा देताना काही बोगस विद्यार्थी (डमी) सापडल्यानंतर ७ जुलै २०१३ रोजी व्यापमंप्रकरणी इंदूरच्या गुन्हे शाखेने इंदूरमध्ये पहिला एफआयआर दाखल केला होता. यावेळी अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीने मध्य प्रदेश सरकार आणि तपास संस्था दोन्ही थक्क झाले. पीएमटी परीक्षा उत्तीर्ण करून देणारी एक नाही तर अशा अनेक टोळ्या असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले होते. तेव्हापासून आजतागायत या घोटाळ्याने हजारो प्रश्न निर्माण केले. आज या घोटाळ्याशी संबंधित ५० जणांच्या संशयास्पद मृत्यूनंतरही हे प्रश्न अनुत्तरित आहेत.
व्यापमं घोटाळ्याचा आवाका पाहून राज्यसरकारने हे प्रकरण विशेष कृती दलाकडे(एसटीएफ) सोपवले. यापश्चात डॉ. जगदीश सगर याच्यारूपात या प्रकरणात एक बडा मासा तपास संस्थांच्या हाती लागला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर डॉ. पंकज त्रिवेदी आणि नितीन महिंद्रा या दोन बड्या अधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्या गेल्या. या अटकसत्रानंतर व्यापमं घोटाळ्याप्रकरणी रोज नवी धक्कादायक रहस्ये उघड होऊ लागली. मध्य प्रदेशातील अनेक दिग्गज आणि प्रभावशाली लोकांची नावे या घोटाळ्यात येऊ लागली. यापैकी काहींना अटक झाली तर काही अद्यापही फरार आहेत. त्यांच्या नावांचा अद्यापही खुलासा झालेला नाही. पंकज त्रिवेदी आणि नितीन महिंद्रा यांच्या अटकेनंतर राज्याचे तत्कालीन तांत्रिक शिक्षण मंत्री लक्ष्मीकांत शर्मा आणि त्यांचे ओएसडी ओ.पी. शुक्ला यांना अटक झाली. यासोबतच मुख्यमंत्र्यांचे ओएसडी प्रेमप्रकाश हेही व्यापमं घोटाळ्यात अडकले. मुलीला चुकीच्या पद्धतीने वैद्यकीय प्रवेश मिळवून दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यापाठोपाठ राजभवनाकडेही संशयाची सुई वळली.
मुख्यमंत्र्यांचे ओएसडी अग्रिम जामिनावर सुटले मात्र राज्यपालांचे ओएसडी एसटीएफच्या कचाट्यात सापडलेच. व्यापमं परीक्षांच्या माध्यमातून नोकऱ्या लावून दिल्याप्रकरणी एसटीएफने त्यांना अटक केली. फेबु्रवारी २०१५ मध्ये राज्यपाल रामनरेश यादव यांच्यावरही व्यापमंप्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्यांच्यासोबत त्यांचे दोन पुत्र शैलेश आणि कमलेश यांनाही एसटीएफने आरोपी बनविले. एसटीएफने गुन्हा नोंदवताच राज्यपाल धावत-पळत दिल्लीत गेले. आजारी पडले. अखेर घटनात्मक पदावर आरूढ असल्याच्या आधारावर ख्यातनाम विधिज्ञ राम जेठमलानी यांच्या युक्तिवादानंतर त्यांचे नाव एफआयआरमधून गाळले गेले. याच घडामोडीदरम्यान राज्यपालांचे पुत्र शैलेश याचा २६ मार्च २०१५ रोजी लखनौ येथे रहस्यमय मृत्यू झाला. या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी म्हणून काँग्रेसने बराच दबाव आणला पण मध्य प्रदेश सरकारने या दबावाला भीक घातली नाही. गत दोन वर्षांत व्यापमं घोटाळ्याशी संबंधित ५० जणांचा मृत्यू झाला. यावरून देशभर बोभाटा झाल्यावर अखेर मध्य प्रदेश सरकारने व्यापमं प्रकरणी पहिला गुन्हा दाखल केला होता, नेमक्या त्याच तारखेला म्हणजे ७ जुलैला या घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीची घोषणा करावी लागली.
 
काय आहे व्यापमं घोटाळा ?
मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळाद्वारे वैद्यकीय, अभियांत्रिकी आदी विभागांच्या भरती प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. सन २००६ मध्ये या परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचे वृत्त आले होते. मात्र २०१३ मध्ये डॉ. जगदीश सगर याला अटक झाल्यानंतर या महाघोटाळ्याचे बिंग फुटले. पात्र विद्यार्थ्यांच्या एका संपूर्ण पिढीचे भविष्य या घोटाळ्याने खराब केल्याचे तपासातून उघड झाले. २००८ ते २०१३ दरम्यान प्री-मेडिकल टेस्टमध्ये निवडले गेलेले २२०० डॉक्टर व अन्य संदिग्धांची नावे या घोटाळ्यात समोर आली. सुमारे ३०० जणांना आरोपी बनविण्यात आले. यात विद्यार्थी, त्यांचे पालक, उद्योगपती, व्यापारी आणि राजकीय नेत्यांचा सहभाग आहे. सुमारे १९८० जणांना अटक झाली. यापैकी काही जामिनावर सुटले मात्र अद्यापही अनेक तुरुंगाची हवा खात आहेत. याप्रकरणात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. अद्यापही ५५० विद्यार्थी फरार असल्याचे कळते.
 
असे चालत होते सेटिंग 
दलालांमार्फत परीक्षार्र्थींसाठी सेटिंग केले जात होते. परीक्षार्थी उत्तीर्ण होणार हे आधीच निश्चित असायचे. त्यासाठी रॅकेटमधील लोक वेगवेगळ्या पद्धतीने काम करीत असत. काही गट परीक्षार्र्थींच्या जागी दुसरा उमेदवार देत कमकुवत विद्यार्थ्यांना पास करीत होते. रॅकेटमधील दुसरे काही गट व्यापमंमधील अधिकाऱ्यांशी साटेलोटे ठेवत ढ विद्यार्थ्यांना हुशार विद्यार्थ्यांसोबत बसण्याची व्यवस्था करीत. हुशार विद्यार्थ्यांची उत्तरे बघून हे विद्यार्थी पेपर सोडवत. तिसरी टोळी अधिक संघटितरीत्या काम करीत असे. या गटाची माजी शिक्षणमंत्री लक्ष्मीकांत शर्मा आणि त्यांचे ओएसडी ओ.पी.शुक्ला यांच्यामार्फत नियंत्रकापर्यंत पोहोच होती. परीक्षा नियंत्रक पंकज त्रिवेदी आणि यंत्रणा विश्लेषक नितीन महिंद्रा हे साथीदारांसोबत त्यांना साथ देत होते. 
 
 
असा झाला पर्दाफाश
>  ७ जुलै २०१३: या घोटाळ्यात इंदूरमध्ये पीएमटीची परीक्षा देत असलेल्या बोगस विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर जगदीश सगरला अटक झाली.
>  आॅगस्ट २०१३ : जगदीश सगरच्या अटकेनंतर जाबजबाबात हायप्रोफाईल लोकांची नावे उघड झाली.
>  सप्टेंबर २०१३: व्यापमं परीक्षा नियंत्रक पंकज त्रिवेदीला अटक आणि कारागृहात रवानगी
>  जुलै २०१४: विधानसभेत व्यापमं मुद्यावर विरोधी पक्षांनी प्रचंड गदारोळ केला आणि मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आपली बाजू मांडली.
>  जून २०१४: तत्कालीन उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान शिक्षण मंत्री लक्ष्मीकांत शर्मा यांना अटक करण्यात आली. शर्मा आणि डॉ. त्रिवेदीला समोरासमोर बसविण्यात आले.
> फेब्रुवारी २०१५: राज्यपाल रामनरेश यादव यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल झाला आणि ते दिल्लीला परतले.
>  एप्रिल २०१५: उच्च न्यायालयाने राज्यपालांच्या अटकेला स्थगिती दिली आणि त्यांच्याविरुद्ध एफआयआर रद्द केला. 
>  फेब्रुवारी २०१५: काँग्रेसचे सरचिटणीस आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंग यांनी एक्सल शीट जारी करून छेडछाडीचा आरोप केला.
>  एप्रिल २०१५: उच्च न्यायालयाने व्यापमं घोटाळ्यात एक्सल शीटप्रकरणी एसटीएफचा अहवाल योग्य ठरविला. 
>  जून २०१५: उच्च न्यायालयाने मृत्यूंची दखल घेतली आणि एसटीएफला दस्तावेज जमा करण्याचे निर्देश 
दिले.
>  जून २०१५: काँग्रेसने या घोटाळ्याशी संबंधित आरोपी आणि संशयितांच्या वाढत्या मृत्यूचा मुद्दा उचलून धरला.
>  जून २०१५: सरकार आणि भाजपा या मुद्यावर एकत्र आले आणि मृत्यूच्या आकड्यांबद्दल काँग्रेस दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला.
>  जुलै २०१५: मृत्यूचे तांडव सुरुच राहिले. या मुद्यावर काँग्रेसकडून वारंवार सीबीआय चौकशीची मागणी
>  ७ जुलै २०१५: अखेर मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना तडकाफडकी पत्रपरिषद बोलावून आपण सीबीआय चौकशीच तयार आहोत,असे सांगावे लागले.
 
घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार
 >  लक्ष्मीकांत शर्मा: तांत्रिक शिक्षण मंत्री असताना घोटाळ्याला संरक्षण दिले. 
>  पंकज त्रिवेदी : माजी परीक्षा नियंत्रक असलेल्या त्रिवेदी यांनी प्रवेश परीक्षा घोटाळ्याची पूर्ण रचना केली.
>  विनोद भंडारी: अरविंदो वैद्यकीय महाविद्यालयाचे मालक असलेला भंडारी खासगी महाविद्यालयांमध्ये जागा विकण्याचा धंदा करायचा. व्यापमं घोटाळ्याचा मार्ग खुला केल्याबद्दल तो अजूनही कारागृहात आहे.
>  सुधीर शर्मा: लक्ष्मीकांत शर्मा यांचा निकटस्थ असून सत्ता आणि संघातील लागेबंध्यांचा लाभ घेतला. अनेकांच्या बनावट भरतींमध्ये सहभाग. तोसुद्धा कारागृहात आहेत.
>  नितीन महिंद्रा : पूर्व यंत्रणा विश्लेषक महिंदा याने संगणकातील प्रोगाममध्ये तांत्रिक घोटाळा घडवून आणला. तांत्रिक स्तरावर खेळ खेळताना त्याने पुरावेही नष्ट केले.
>  ओ.पी.शुक्ला : हा लक्ष्मीकांत शर्मा यांचा ओएसडी होता. त्याने घोटाळ्याला संरक्षण देतानाच घोटाळ्याची व्याप्ती वाढविण्यात पूर्ण योगदान दिले. त्याची रवानगी कारागृहात झाली आहे. ’जगदीश सगर: बनावट परीक्षार्र्थींना परीक्षेला बसविले. उत्तीर्ण करण्याचे कंत्राटच घेतले. घोटाळ्याचा तोच मुख्य सूत्रधार होता. तो अजूनही गजाआड आहे.
 
घोटाळे उघडकीस आणणारे सूत्रधार 
> पारस सखलेचा : रतलामचे अपक्ष आमदार पारस सखलेचा यांनी विधानसभेत हा मुद्दा सातत्याने उचलून धरला. त्यांनी डीमॅटबाबतही प्रश्न उपस्थित करीत सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. उच्च न्यायालय, एसटीएफपर्यंत धाव घेत लढाई लढली.
 
>  डॉ. आनंद राय : सामाजिक कार्यकर्ते असलेल्या डॉ. राय यांनी पीएमटी परीक्षेतील बनावट परीक्षार्थ्यांबाबत तक्रार केली होती. सगरला पकडण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका वठवली. त्यानंतर बनावट प्रवेश आणि भरती प्रक्रियेच्या तपासाची चक्रे फिरू लागली.
 
>  प्रशांत पांडे : व्यापमं घोटाळ्यातील नितीन महिंद्रा याच्याकडे ओरिजनल अ‍ॅक्सल शीट उपलब्ध असल्याची माहिती प्रशांत पांडे यांनी समोर आणली. त्यानंतर दिग्विजयसिंग यांनी तीच अ‍ॅक्सल शीट एसटीएफ आणि एसआयटीकडे सादर करीत गुन्ह्यावर प्रकाश टाकला.
 
>  आशिष चतुर्वेदी : सर्वप्रथम चतुर्वेदी यांनीच डीमॅट घोटाळ्यात ग्वाल्हेरमध्ये बनावट परीक्षार्थी असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलीस यंत्रणा हादरली. अनेक प्रकरणांमध्ये चतुर्वेदी फिर्यादी आहेत. 
 
>  अजय दुबे : आरटीआय कार्यकर्ते असलेल्या दुबे यांनी पर्यवेक्षकांच्या तैनातीतील घोटाळा उघडकीस आणला. व्यापमं कार्यालयाचा सहभागही त्यांनी प्रकाशात आणला. व्यापमं अध्यक्षाचा सहभाग समोर आल्याने खळबळ उडाली.
---------------
मेडिकल एन्ट्रन्स रद्द करण्यात आल्या
2013 मध्ये 439
2012 मध्ये 333
2011 मध्ये 98
2010 मध्ये 90
2009 मध्ये 85
2008 मध्ये 42
----------------
या परीक्षांमध्येही झालेले गैरप्रकार
एसआय भरती परीक्षा
आरक्षक भरती परीक्षा
दुग्ध संघ भरती परीक्षा
संविदा शिक्षक वर्ग-3
संविदा शिक्षक वर्ग-2
वनरक्षक भरती परीक्षा
 

Web Title: 2 years 50 deaths 1000 questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.