आयआयटी, एनआयटीमधून ४,४०० विद्यार्थ्यांची गळती
By admin | Published: August 6, 2015 02:09 AM2015-08-06T02:09:51+5:302015-08-06T02:09:51+5:30
गेल्या तीन वर्षांत आयआयटी आणि एनआयटीमधून ४,४०० विद्यार्थी बाहेर पडले. त्यामागे शैक्षणिक ताणासह विविध कारणे होती, अशी चिंता वाढविणारी
नवी दिल्ली : गेल्या तीन वर्षांत आयआयटी आणि एनआयटीमधून ४,४०० विद्यार्थी बाहेर पडले. त्यामागे शैक्षणिक ताणासह विविध कारणे होती, अशी चिंता वाढविणारी माहिती मंगळवारी अधिकृतपणे समोर आली आहे. ही माहिती देतानाच सरकारने योग्य त्या उपाययोजना सुरू केल्या आहेत, असे मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
२०१२-१३ आणि २०१४-१५ या दोन वर्षांत विविध आयआयटींमधून २,०६०, तर तीन वर्षांच्या काळात राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थांमधून (एनआयटी) २,३५२ विद्यार्थी बाहेर पडले. विविध संस्था किंवा महाविद्यालयांमध्ये प्रवेश, वैयक्तिक आणि वैद्यकीय गरज, पदव्युत्तर शिक्षण घेताना नोकरी लागणे तसेच शैक्षणिक ताण न झेपणे यासारखी विविध कारणे त्यामागे आहेत, असे त्या लेखी उत्तरात म्हणाल्या. आयआयटी रुरकीमधून सर्वाधिक २२८, त्यापाठोपाठ आयआयटी खरगपूर (२०९) आणि आयआयटी दिल्ली (१६९) विद्यार्थी बाहेर पडले. आयआयटी रुरकीमधील ७३ विद्यार्थ्यांना गेल्या महिन्यात बडतर्फ करण्यात आल्याबाबत त्या म्हणाल्या, की या निर्णयाला आव्हान देण्यात आले असता न्यायालयाने सदर संस्थेचा निर्णय योग्य ठरविला आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची शैक्षणिक कामगिरी नव्हती. या विद्यार्थ्यांनी पुन्हा योग्य दर्जा मिळविला तरच त्यांना पुन्हा प्रवेश दिला जाईल.
दोन अपहृत प्रोफेसर्सना परत आणण्याची मागणी
१लिबियात अपहरण झालेल्या दोन भारतीय प्रोफेसर्सना मायदेशी परत आणण्याची मागणी तेलगू देसमचे के. राममोहन नायडू यांनी शून्य तासाला लोकसभेत मुद्दा उपस्थित करताना केली. आंध्र प्रदेशमधील प्रो. गोपाल आणि त्यांचे तेलंगणामधील सहकारी अद्यापही अपहृतांच्या तावडीत आहेत. अन्य दोन प्राध्यापकांची मात्र सुटका करण्यात आली आहे.
२ इराकमध्ये ३९ भारतीयांचे अपहरण झाल्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले होते. त्याच धर्तीवर प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांनी ३ जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन ‘राष्ट्रीय महिला साक्षरता दिवस’ म्हणून साजरा करण्याची मागणी केली.
३खासदार आणि माजी खासदारांच्या वाहनांसाठी देशभरात टोल आकारला जाऊ नये, अशी मागणी अण्णा द्रमुकचे सी. गोपालकृष्णन यांनी केली. राज्य सरकारच्या जाहिरातींमध्ये मुख्यमंत्र्यांचा फोटो वापरण्याला मुभा दिली जावी, असे याच पक्षाचे खा. पी. आर. सेंथीलनाथन यांनी म्हटले.