देशात ५.६ कोटी नागरिक गरिबीच्या खाईत; कोरोना काळात बसला सर्वाधिक फटका 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 09:24 AM2022-10-07T09:24:28+5:302022-10-07T09:26:43+5:30

ग्रामीण भागातील गरिबीत घट; जागतिक बँकेचा अहवाल

5 6 crore citizens in poverty in the country the biggest hit was during the corona pandemic period | देशात ५.६ कोटी नागरिक गरिबीच्या खाईत; कोरोना काळात बसला सर्वाधिक फटका 

देशात ५.६ कोटी नागरिक गरिबीच्या खाईत; कोरोना काळात बसला सर्वाधिक फटका 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना साथीच्या महामारीमुळे २०२० मध्ये सर्व उद्योगधंदे बंद झाल्याने कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. यामुळे भारतातील तब्बल ५.६ कोटी नागरिक गरिबीच्या खाईत ओढले गेले, असे जागतिक बँकेने आपल्या नव्या अहवालात म्हटले आहे. 

थिंक टँक सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने केलेल्या सर्वेक्षणातील आकडेवारीचा हवाला जागतिक बँकेने यासाठी दिला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष अद्याप निश्चित झालेले नाहीत; परंतु जागतिक बँकेने ‘गरिबी आणि सर्वांची समृद्धी २०२२’ या शीर्षकाच्या अहवालात जगातील गरिबीचा अंदाज घेण्यासाठी या आकडेवारीचा वापर केला आहे. भारत गेल्या काही वर्षांत जागतिक आणि प्रादेशिक गरिबीच्या अंदाजांमधील अंतर भरण्यासाठी आवश्यक असणारा डेटा प्रकाशित करीत नसल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये सादर केलेल्या अंदाजापेक्षा भारतात गरिबीचे प्रमाण अधिक आहे. ‘आयएमएफ’ने २०२०मध्ये २.३ कोटी भारतीय गरिबीत गेल्याचे म्हटले होते. राष्ट्रीय खात्यांवर आधारित असलेला आयएमएफचा अहवाल अर्थशास्त्रज्ञ सुरजित भल्ला, करण भसीन आणि अरविंद विरमानी यांनी लिहिला आहे. २०१८मध्ये पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा देणारे भल्ला सध्या ‘आयएमएफ’मध्ये भारतासाठी कार्यकारी संचालक आहेत.

सध्या किती भारतीय गरीब? 

यापूर्वीच्या जागतिक बँकेच्या आधीच्या अंदाजानुसार २०१७ मध्ये भारतातील एकूण लोकसंख्येपैकी १०.४ टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली होती. त्यांचा प्रतिदिन पगार केवळ १५५ रुपये (१.९ डॉलर) होता. ताज्या अहवालानुसार, २०१७ मध्ये देशातील १३.६ कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली म्हणजे गरिबीत जीवन जगत होते.

किती वाढला गरिबीचा दर? 

कोरोना साथीच्या रोगाने जगात अत्यंत गरिबीचा दर २०२० मध्ये अंदाजे ९.३ टक्क्यांपर्यंत वाढविला, जो २०१९ मध्ये ८.४ टक्के होता. २०११ पासून भारतात विशेषतः ग्रामीण भागात गरिबीत घट झाल्याचेही अहवालात म्हटले आहे.

शहरात, गावाकडे किती गरिबी? 

सन २०१९-२०मध्ये भारतातील १० टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली जगत होती, असे जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले आहे. ग्रामीण भागात १२ टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली राहतात, तर ६ टक्के शहरी लोक गरिबीत जीवन जगत होते.

सरकार कुठे कमी पडले? 

सरकारला गरजूंपर्यंत पोहोचणे कठीण झाले असल्याने कोरोना महामारीमुळे गरिबांची स्थिती आणखी बिकट झाली असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे. केंद्र सरकार कोरोना महामारीच्या काळात १५% ग्रामीण जनतेपर्यंत, तर ३१% जनतेपर्यंत पोहोचण्यास अपयशी ठरले, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.

सर्वाधिक गरीब कोण? 

आफ्रिकन देश (सर्वांत गरीब) दक्षिण आशिया : भारत, पाकिस्तान, बांगलादेश ब्राझील । इंडोनेशिया

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: 5 6 crore citizens in poverty in the country the biggest hit was during the corona pandemic period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.