Arvind Kejriwal : "सरकार पाडण्यासाठी 6300 कोटी खर्च केले नसते तर महागाईचा सामना करावा लागला नसता"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 12:50 PM2022-08-28T12:50:07+5:302022-08-28T12:58:25+5:30

AAP Arvind Kejriwal And Modi Government : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महागाईवरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

AAP Arvind Kejriwal Slams Modi Government Over Rice Wheat GST | Arvind Kejriwal : "सरकार पाडण्यासाठी 6300 कोटी खर्च केले नसते तर महागाईचा सामना करावा लागला नसता"

Arvind Kejriwal : "सरकार पाडण्यासाठी 6300 कोटी खर्च केले नसते तर महागाईचा सामना करावा लागला नसता"

Next

नवी दिल्ली - केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लावल्यानंतर अन्नपदार्थांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. रोज लागणारे पीठ, डाळ, तांदूळ आणि साखर यांच्या किमतींत वाढ पाहायला मिळाली आहे. यामुळे सामान्य नागरिकांचा खिसा दिवसेंदिवस रिकामा होत आहे. व्यापाऱ्यांनी सामान्यत: सध्या सुरू असलेल्या पावसामुळे डाळ, साखर, तांदूळ यांच्या किमतींत वाढ होते. मात्र आता जीएसटी लावल्याने आणि त्यानंतर मूळ किमतीत वाढ केल्याने वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे असं म्हटलं आहे. याच दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महागाईवरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"सरकार पाडण्यासाठी 6 हजार 300 कोटी खर्च केले नसते तर महागाईचा सामना करावा लागला नसता" असं म्हणत निशाणा साधला आहे. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "गहू, तांदुळ, दही, ताक, मधावर लादण्यात आलेल्या जीएसटीतून सरकारला वर्षाकाठी 7 हजार 500 कोटींचा महसूल मिळणार आहे. तर आत्तापर्यंत सरकार पाडण्यासाठी सरकारने 6 हजार 300 कोटींचा खर्च केला आहे. सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला नसता तर जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लादण्याची वेळ आली नसती. जनतेला महागाईचा सामना करावा लागला नसता" असं केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

"गरिबांच्या जेवणावर टॅक्स आणि श्रीमंतांचं 5 लाख कोटींचं कर्ज माफ"

अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर याआधी देखील टीकास्त्र सोडलं आहे. "गरिबांच्या जेवणावर टॅक्स आणि श्रीमंतांचं 5 लाख कोटींचं कर्ज माफ" असं म्हणत निशाणा साधला होता. केंद्राने पेन्शन सुविधा बंद करण्यासाठी अग्निवीर योजनेची सुरुवात केली. केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग आणण्यासाठी देखील मनाई केली. तसेच मनरेगासाठी पैसे नसल्याचं म्हटलं असल्याचा दावा अरविंद केजरीवाल यांनी केली होती. 

"पहिल्यांदा तांदूळ-गव्हावर टॅक्स लावण्यात आला"

अरविंद केजरीवाल यांनी "पहिल्यांदा तांदूळ-गव्हावर टॅक्स लावण्यात आला. कोणत्याच सरकारने याआधी असं क्रूर पाऊल उचललं नाही. केंद्र सरकारची अशी काय अवस्था झाली? सरकारी शाळेत फी घेतली गेली तर अर्ध्याहून अधिक मुलं निरक्षर राहतील. गरीब माणसं कुठून आणतील पैसे? उपचारासाठी काय करणार?, केंद्र सरकारचा हा सगळा पैसे नेमका जातो कुठे?... यांनी सरकारी पैशांनी आपल्या मित्रांची कोट्यवधी रुपयांची कर्ज माफ केली आहेत. कर्ज माफ नसतं केलं तर देशाची अशी अवस्था झाली नसती" असं म्हणत मोदी सरकारवर टीका केली होती. 

Web Title: AAP Arvind Kejriwal Slams Modi Government Over Rice Wheat GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.