Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 14:43 IST2024-05-01T14:29:00+5:302024-05-01T14:43:27+5:30
AAP Sanjay Singh And Corona Vaccine : आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी निवडणूक आयोगाने ईव्हीएम तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये असं म्हटलं आहे.

Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी निवडणूक आयोगाने ईव्हीएम तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये असं म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी इंडिया आघाडीतील एक सुयोग्य व्यक्ती एकमताने पंतप्रधानपदाचा उमेदवार होईल असंही म्हटलं आहे. तसेच संजय सिंह यांनी कोरोना लस Covishield मुळे झालेल्या मृत्यूंच्या सखोल चौकशीची मागणी केली आणि त्यामागे कोण आहेत हे शोधून काढले पाहिजे असंही सांगितलं.
"कंपनीच्या मालकांवर हत्येचा गुन्हा दाखल करून जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी. कोरोना लस Covishield चे आता गंभीर परिणाम होत आहेत.आज 25-30 वर्षांचे तरुण चालताना पडत आहेत. हे खरे आहे की आज लोक मरत आहेत आणि आज हे लोक Covishield मुळे मरत आहेत. त्याचे तथ्यही समोर आले आहे. अशा परिस्थितीत लोकांच्या मृत्यूवर कंपन्यांकडून नुकसानभरपाई वसूल करावी" असं आप नेत्याने म्हटलं आहे.
संजय सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, निवडणूक आयोगाने ईव्हीएम तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये. ज्याठिकाणी ही तक्रार येईल तेथे त्वरित कारवाई करावी. इंडिया आघाडीतील एक सुयोग्य व्यक्ती एकमताने पंतप्रधानपदाचा उमेदवार होईल. याशिवाय इंडिया आघाडीला बहुमत मिळाल्यास किमान समान कार्यक्रमही केला जाईल. विधानसभा निवडणुकीपर्यंत ही आघाडी कायम राहणार का, असे विचारले असता, वेळीच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असंही ते म्हणाले.
माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी दारू घोटाळ्यावर एसआयटी स्थापन केल्यावर आप नेते संजय सिंह म्हणाले की, "हरियाणात विषारी दारू प्यायल्याने 52 जणांना जीव गमवावा लागला. दारू घोटाळ्याने सर्व रेकॉर्ड उद्ध्वस्त केले, तरीही कारवाईच्या नावावर परिणाम काही नाही. भाजपाची सत्ता आल्यास ही देशातील शेवटची निवडणूक असेल. आरक्षणासोबतच संविधानही धोक्यात येणार आहे."