एसी प्रवास महागला
By admin | Published: November 15, 2015 03:02 AM2015-11-15T03:02:48+5:302015-11-15T03:02:48+5:30
चौदा टक्के सेवाकरासोबत अतिरिक्त ०.५ टक्का स्वच्छ भारत अधिभार लागू करण्यात आल्याने आज रविवारपासून उच्च श्रेणीचा रेल्वे प्रवास महागणार आहे.
नवी दिल्ली : चौदा टक्के सेवाकरासोबत अतिरिक्त ०.५ टक्का स्वच्छ भारत अधिभार लागू करण्यात आल्याने आज रविवारपासून उच्च श्रेणीचा रेल्वे प्रवास महागणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार प्रथम श्रेणी आणि सर्व एसी श्रेणीचे रेल्वेभाडे १५ नोव्हेंबरपासून ४.३५ टक्क्यांनी वाढणार आहे.
सरकारने ६ नोव्हेंबर रोजी सेवाकराच्या व्याप्तीत येणाऱ्या सर्व सेवांवर १५ नोव्हेंबरपासून ०.५ टक्का या दराने स्वच्छ भारत अधिभाराची अधिसूचना जारी केली होती. १५ नोव्हेंबरपूर्वीच्या तिकिटांसाठी हा उपकर नसेल. सर्वसाधारण आणि शयनयान श्रेणीच्या प्रवास भाड्यावर अधिभार लागणार नाही. एकूण प्रवास भाड्यापैकी ३० टक्क्यांवर १४ टक्के सेवा कर आणि स्वच्छ भारत उपकर (०.५ टक्का) लागू होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)
या भाडेवाढीमुळे नवी दिल्ली-मुंबई प्रवासासाठी मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेत एसी-१ प्रवास भाडे २०६ रुपयांनी, तर नवी दिल्ली- हावडासाठी एस-३चे प्रवास भाडे १०२ रुपयांनी वाढले. दिल्ली-चेन्नईसाठी एसी-२चे भाडे १४० रुपयांनी वाढेल. सेवा कर आणि स्वच्छ भारत अधिभारामुळे एका वर्षात १ हजार कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.