नोटाबंदीनंतर देशभरात ३३ लोकांचा बळी

By admin | Published: November 17, 2016 02:42 AM2016-11-17T02:42:52+5:302016-11-17T02:42:52+5:30

केंद्राने गेल्या आठवड्यात ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यापासून देशभरात या निर्णयाच्या परिणामस्वरूप ३३ लोकांना प्राण गमवावा लागला असून,

After the noose, 33 people were killed in the country | नोटाबंदीनंतर देशभरात ३३ लोकांचा बळी

नोटाबंदीनंतर देशभरात ३३ लोकांचा बळी

Next

केंद्राने गेल्या आठवड्यात ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यापासून देशभरात या निर्णयाच्या परिणामस्वरूप ३३ लोकांना प्राण गमवावा लागला असून, हे सत्र सुरूच आहे. काळा पैसा खणून काढण्यासाठी सरकारने अचानक मोठ्या नोटा बंद केल्यानंतर देशात या निर्णयाशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध असू शकणारे ३३ मृत्यू झाले. यातील काही धसक्याने मृत्युमुखी पडले, तर काहींनी लांब नागमोडी रांगेत तासन्तास उभे राहून दमल्यामुळे प्राण सोडला. नोटाबंदीमुळे आत्महत्येच्या अनेक घटना घडल्या, तर पश्चिम बंगालमध्ये एका महिलेचा खून झाला. दैनंदिन खर्चासाठी लागणारे पैसे काढण्याकरिता किंवा जुन्या नोटा बदलण्यासाठी आजही देशभरात लोकांनी बँकांसमोर रांगा लावल्या होत्या, तसेच सर्वत्र गोंधळाचे वातावरण होते.
मुलीचा विवाह चार दिवसांवर आला असताना तारा तरन, पंजाब येथील सुखदेवसिंग यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. नव्या नोटांच्या तुटवड्यामुळे लग्नासाठी किराणा माल आणि इतर साहित्याची खरेदी अशक्य झाल्यामुळे ते तणावात होते. त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
आईने कमी दराची नोट देण्यास नकार दिल्यामुळे बीएसएफ जवानाच्या १७ वर्षीय मुलाने आत्महत्येचे पाऊल उचलले. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथे ही दुर्दैवी घटना घडली.
कमी किमतीच्या नोटांअभावी रिक्षाचालकाने आजारी दोन वर्षीय मुलाला रुग्णालयात नेण्यास नकार दिल्यामुळे या मुलाचा मृत्यू झाला. ओडिशातील संभलपूर येथे ही हृदयद्रावक घटना घडली.
सिकंदराबाद, तेलंगणा येथे बँकेसमोर दोन तास रांगेत उभे राहिल्यानंतर लक्ष्मीनारायण (७५) हे ज्येष्ठ नागरिक कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.
बिहारमधील औरंगाबाद येथे सुरेंद्र शर्मा यांचा बँकेसमोरील रांगेत मृत्यू झाला.
मध्य प्रदेशातील छत्रपूर जिल्ह्यातील शेतकरी हलके लोधी यांनी खत आणि बी-बियाणे खरेदी करण्यासाठी पैसे नसल्यामुळे आत्महत्या केली.
मेरठचे कामगार अजीज अन्सारी ( ६०) हे बँकेसमोरील रांगेत असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे प्राणोत्क्रमण झाले.
शिक्षक रघुनाथ वर्मा (७०) यांचा बँकेसमोरील रांगेत मृत्यू झाला. उत्तर प्रदेशात ही घटना घडली. ते मुलीच्या विवाहाकरिता पैसे काढण्यासाठी बँकेत गेले होते.
आई-वडिलांकडे उपचारासाठी नव्या नोटा नसल्यामुळे बुलंदशहर येथील रुग्णालयात
एका बालकाचा मृत्यू झाला.
तीन दिवसांपासून प्रयत्न करीत असूनही जुन्या नोटा न बदलता आल्यामुळे दिल्लीतील २४ वर्षीय रिझवानाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
नव्या नोटांअभावी कुटुंबाचे पोट भरणे कठीण झाल्यामुळे सुरत येथील एका ५० वर्षांच्या महिलेने आत्महत्या केली.
नोटा बदलण्यास गेलेला भाऊ रिकाम्या हाती परतल्यानंतर शामली, उत्तर प्रदेश येथील २० वर्षीय शबानाने आत्महत्या केली.
बँकेत बदलण्यासाठी नेलेले १५ हजार रुपये गहाळ झाल्यामुळे चिकबल्लापूर, कर्नाटक येथील एका मध्यमवयीन महिलेने आत्महत्या केली.
तीन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेणे शक्य न झाल्यामुळे रायगड, छत्तीसगड येथील एका शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले. हे पैसे त्याला तामिळनाडूत अडकलेल्या आपल्या मुलांना पैसे पाठवायचे होते.
लिम्बडी, गुजरात येथे पैशांसाठी बँकेसमोरील रांगेत उभ्या असलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला.
कानपूर येथे नोटा मोजताना एका ज्येष्ठ महिलेचे निधन झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीचे भाषण ऐकताना कानपूर येथील एका व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू झाला. या व्यक्तीला जमिनीच्या विक्रीसाठी ७० लाख रुपयांची आगाऊ रक्कम मिळाली होती.
पालकांकडे वैध नोटा नसल्यामुळे रुग्णालयाने आजारी बालकावर उपचारास नकार दिला. परिणामी, बालक दगावले.
पालकांकडे औषधसाठी पैसे नसल्यामुळे विशाखापट्टणम येथे १८ महिन्यांचे बालक दगावले.
पालकांकडे १०० रुपयांच्या नोटा नसल्यामुळे डॉक्टरांनी आजारी मुलावरील उपचार थांबविले. हा मुलगा तापाने फणफणला होता. उपचाराअभावी त्याचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे ही हृदयद्रावक घटना घडली.
वडिलांना ऐन वेळी १०० रुपये उपलब्ध करता न आल्यामुळे राजस्थानात एका नवजात बाळाला प्राण गमवावा लागला. या बाळाची प्रकृती बिघडली होती. रुग्णवाहिका चालकाने शंभरच्या नोटेअभावी त्याला रुग्णालयात नेण्यास
नकार दिला.
बँक १ हजार रुपयांची नोट बदलून देणार नसल्याचे कथितरीत्या समजल्यामुळे उत्तर प्रदेशच्या कुशिनर येथील महिलेचा धक्क्याने मृत्यू झाला.
साठविलेल्या ५४ लाख रुपयांना काहीही किंमत उरली नसल्याचा समज होऊन तेलंगणाच्या महुबाबाद जिल्ह्यातील एका महिलेने आत्महत्या केली.
पत्नी एटीएमवरून रिकाम्या हाती परतल्यामुळे चिडलेल्या पतीने तिचा खून केला. पश्चिम बंगालमधील हावडा येथे
ही मन विषण्ण करणारी घटना घडली.
मुलीचे भावी सासर हुंड्यात जुन्या नोटा मान्य करणार नाहीत, अशी भीती वाटून बिहारमधील एकाचे हृदयविकाराने निधन झाले.
केरळमध्ये बँकेत ५ लाख रुपये भरण्यासाठी गेलेला इसम (४५) चलन भरणा पावती भरत असताना दुसऱ्या मजल्यावरून पडून ठार झाला.
बँकेत जुन्या नोटा भरण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा (७२) हृदयविकाराने मृत्यू झाला. मुंबईत ही घटना घडली.
शेतमजुरांची मजुरी चुकती करायची असल्याने नोटा बदलण्यासाठी बँकेत आलेल्या शेतकऱ्याचे हृदयविकाराने निधन झाले. ही घटना गुजरातमधील तारापूरची आहे.
बँकेसमोरील रांगेत एक तास उभे राहिल्यानंतर ७५ वर्षीय ज्येष्ठाचा केरळात मृत्यू झाला.
उडपी, कर्नाटक येथे ९६ वर्षांच्या वृद्धाने रांगेत प्राण सोडला.
सागर, मध्य प्रदेश येथेही सेवानिवृत्त बीएसएनएल कर्मचाऱ्याची रांगेत प्राणज्योत मालवली.
भोपाळ येथे स्टेट बँक आॅफ इंडियाच्या रोखपालाचा हृदयविकाराने मृत्यू झाला.
पंतप्रधानांचे नोटाबंदीचे भाषण ऐकल्यानंतर फैजाबाद, उत्तर प्रदेश येथील एका व्यावसायिकाची छाती दुखू लागली आणि नंतर
त्याचा मृत्यू झाला. यानंतरही अनेकांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: After the noose, 33 people were killed in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.