"मी प्रयत्न केला, पण..."; वायुसेनेच्या अधिकाऱ्याने सांगितला दिल्ली स्टेशनवरचा धक्कादायक प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 14:01 IST2025-02-16T13:55:30+5:302025-02-16T14:01:02+5:30
चेंगराचेंगरीच्या वेळी स्थानकावर उपस्थित असलेल्या हवाई दलाच्या अधिकाऱ्याने घडलेला प्रसंग सांगितला.

"मी प्रयत्न केला, पण..."; वायुसेनेच्या अधिकाऱ्याने सांगितला दिल्ली स्टेशनवरचा धक्कादायक प्रसंग
New Delhi Railway Station Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. महाकुंभ मेळ्याला जाण्यासाठी प्रवाशांची रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती. त्यादरम्यान एक्स्प्रेसमध्ये चढण्यासाठी धावपळ सुरु झाली आणि चेंगराचेंगरीची घटना घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीच्या वेळी स्थानकावर असलेल्या हवाई दलाच्या अधिकाऱ्यानेही घडलेला प्रसंग सांगितला. कोणीही ऐकत नव्हते, असं हवाई दलाच्या अधिकाऱ्याने म्हटलं.
नवी दिल्ली स्टेशनवर शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांना आपला जीव गमवावा लागला. महाकुंभ स्नानासाठी हजारो भाविक प्रयागराज येथे जात असताना रात्री दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडलाी. स्टेशनवर प्रचंड गर्दी जमल्याने चेंगराचेंगरी होऊन १८ जणांना जीव गमवावा लागला. या अपघाताचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या हवाई दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सतत घोषणा करूनही लोक ऐकायला तयार नव्हते.
"रेल्वे स्टेशनवर तिन्ही दलांची कार्यालये आहेत. मी ड्युटीवरून परतत असताना स्टेशनवर प्रचंड गर्दी असल्याने मलाही जाता आले नाही. मी लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि सतत घोषणा होत होत्या ज्यात लोकांना स्टेशनवर एका ठिकाणी एकत्र न येण्याचे आवाहन केले जात होते, पण लोक ऐकत नव्हते. प्रशासनाने अपघात थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणीही ऐकत नव्हते. मी आणि माझ्या एका मित्रानेही जखमींना मदत केली," असं अजित यांनी सांगितले.
रेल्वे स्टेशनवर मर्यादेपेक्षा जास्त गर्दी होती असे हवाई दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले. फूटओव्हर ब्रिजवर लोकांची गर्दी होती. रेल्वे स्टेशनवर इतकी गर्दी मी कधीच पाहिली नाही. सणासुदीच्या काळातही फारशी गर्दी नसते. जमाव एवढा मोठा होता की त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते, असेही हवाई दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
आणखी एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन येण्याचा प्लॅटफॉर्म बदलण्यात आला आणि घोषणा होताच चेंगराचेंगरी झाली. गर्दीवर नियंत्रण ठेवणारे कोणी नव्हते. प्लॅटफॉर्म क्रमांक १२ वर येणारी गाडी प्लॅटफॉर्म १६ वर येणार असल्याची घोषणा होताच दोन्ही बाजूंनी प्लॅटफॉर्मवर जमाव जमला, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली.
दुसरीकडे, रेल्वेचा प्लॅटफॉर्म बदलला गेला नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणाची उच्चस्तरीय समिती चौकशी करण्यात येत आहे. पण एकही ट्रेन रद्द करण्यात आली नाही किंवा कोणत्याही ट्रेनचा प्लॅटफॉर्म बदलला नाही. आता प्लॅटफॉर्मवर परिस्थिती सामान्य आहे. सर्व गाड्या त्यांच्या नेहमीच्या वेळेनुसार धावत आहेत, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, उत्तर रेल्वेचे सीपीआरओ हिमांशू शेखर उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'काल ही दुःखद घटना घडली तेव्हा पाटण्याकडे जाणारी मगध एक्सप्रेस नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर उभी होती आणि जम्मूच्या दिशेने जाणारी उत्तर संपर्क क्रांती प्लॅटफॉर्म क्रमांक १५ वर उभी होती. फूट ओव्हर ब्रिजवरून फलाट क्रमांक १४-१५ कडे जाणाऱ्या पायऱ्यांवर एक प्रवासी घसरून पडल्याने त्याच्या पाठीमागे उभ्या असलेल्या अनेक प्रवाशांना धक्का बसला आणि ही चेंगराचेंगरी झाली.