अखिलेश यांना फटकारे!

By admin | Published: October 25, 2016 05:09 AM2016-10-25T05:09:21+5:302016-10-25T05:09:21+5:30

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे त्यांचे वडील मुलायमसिंग आणि काका शिवपाल यादव यांच्याशी पूर्णपणे संबंध बिघडले असून, त्यांच्यातील संघर्षामुळे राज्यात राष्ट्रपती

Akhilesh rebukes! | अखिलेश यांना फटकारे!

अखिलेश यांना फटकारे!

Next

- मीना कमल, लखनौ

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे त्यांचे वडील मुलायमसिंग आणि काका शिवपाल यादव यांच्याशी पूर्णपणे संबंध बिघडले असून, त्यांच्यातील संघर्षामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास कोणाला आश्चर्य वाटणार नाही. समाजवादी पक्षाच्या बैठकीत मुलायमसिंग यांनी सोमवारी अखिलेश यांच्यावर तोफा डागल्या आणि ते बोलत असताना अखिलेश यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. या प्रकारातून मुलगा व वडिल यांचे संबंध बिघडल्याचे स्पष्ट झाले असले तरी मुलायमसिंग यांनी अद्याप तरी त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला सांगितलेले नाही.
या संघर्षानंतर पंतप्रधान कार्यालयाच्या सूचनेनुसार राज्यपाल राम नाईक यांनी आपला प्राथमिक अहवाल केंद्राला पाठवला आहे. समाजवादी पक्षातील संघर्षामुळे आतापर्यंत तरी घटनात्मक पेच निर्माण झालेला नसला तरी ज्या पद्धतीने लखनौच्या रस्त्यावर अखिलेश आणि शिवपाल यादव यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली आणि बैठकीत शिवपाल यांनी मुख्यमंत्र्यांवर ज्या प्रकारे हल्ला चढवला, ते पाहता राज्यात कदाचित लवकरच घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. घडणाऱ्या घटनांबाबत राज्यपाल सध्या नियमितपणे कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेत आहेत.
मुलायमसिंग यांनी सांगितल्यास आपण राजीनामा द्यायला तयार आहोत, असे सांगितले असले तरी ज्या पद्धतीने ते शिवपालसमर्थकांना हाकलत चालले आहेत, ते पाहता ते आपले वडिल व काका यांच्याशी कोणताही समझोता करायला तयार नाहीत, असे सांगण्यात येत. अखिलेश हे वेगळा पक्ष काढायला निघाले होते, असा थेट आरोप शिवपाल यांनी त्यांच्यासमोर बैठकीत केला. तुम्ही जन्मलात, तेव्हापासून मी पक्षाचे काम करीत आहे, असे सांगून, मला राजकारण शिकवू नका, असेच शिवपाल यांनी बैठकीत सुनावले. बैठकीनंतर लगेचच त्यांनी अखिलेशसमर्थक पदाधिकाऱ्यांना संघटनेतून हाकलले. त्यामुळे अखिलेश यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न शिवपाल सरळसरळ करीत असून, त्यांना मुलायमसिंग यांचा पूर्ण पाठिंबा आहे, हेच स्पष्ट होते.
त्या बैठकीत मुलायमसिंग यांनीही अखिलेश यांचे थेट कानच उपटले. ज्या शिवपाल आणि अमरसिंग यांच्यावर तुम्ही टीका करीत आहात, त्यांनीच पक्ष वाढवला आहे आणि ते असल्यामुळेच ती तुरुंगात जाण्यापासून वाचलो, असे त्यांनी बोलून दाखवले. त्यांच्या भाषणाच्या वेळी अखिलेशसमर्थकांनी घोषणाबाजी सुरू करताच, अशा मंडळींना पक्षाबाहेर काढले जाईल, असे सांगत, त्यांनी समर्थकांनाच नव्हे, तर अखिलेश यांनाही आजही पक्षात मी सांगेन, तसेच घडेल, असे ऐकवले. आजही तरुणवर्ग माझ्याबरोबर आहे, असे अखिलेश यांना सांगून तुम्ही सर्वेसर्वा नाही आहात, असे स्पष्ट केले.


अखिलेश यादव अखेर वठणीवर
वडील आणि काका यांनी फटकारल्यानंतर अखिलेश हडबडून गेले आहेत. रात्री उशीरा ते काका शिवपाल यादव यांच्याकडे गेले आणि त्यांच्यासह एका कारने नेताजी मुलायमसिंह यांना भेटण्यास गेले.
या बैठकीत दोघांनी अखिलेश यांना ‘नीट वागा’ असा इशारेवजा सल्ला दिला. तसेच ३ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या अखिलेश यांच्या यात्रेविषयी अनेक सूचना केल्या. हे सारे पाहता अखिलेश वठणीवर आल्याचे तसेच बंडखोरीच्या भूमिकेतून बाहेर पडल्याचे सांगण्यात आले.

भाजपाला हवी राष्ट्रपती राजवट
राष्ट्रपती राजवटीमध्ये जर उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका झाल्या तर आपल्याला त्याचा लाभ होईल असे सध्या भाजपला वाटते आहे. राष्ट्रपती राजवटीत सरकारी यंत्रणेचा कल समाजवादी पक्षाकडे असणार नाही.

मुलायमसिंह यांनी अखिलेशना मुख्यमंत्रीपदावरून दूर केल्यास, ते विधानसभा बरखास्त करण्याचे पाऊल उचलू शकतील. तसे झाल्यास ते पदावर राहू शकतील. मुलायमसिंह वा अखिलेशकडून राजकीय संकटासंदर्भात राज्यपालांना पत्र पाठविले गेले तर चेंडू सरळच राज्यपालांकडे जाईल व राष्ट्रपती राजवट लावणे सोपे होईल.

अखिलेशना दूर करून दुसऱ्या कोणाला मुख्यमंत्रीपदाची शपथ द्यावी, असे पत्र मुलायमसिंह यांनी पाठविल्यास आणि अखिलेशनी स्वत: राजीनामा न दिल्यास राज्यपाल अखिलेशंना बहुमत सिद्ध करण्याची संधी देऊ शकतील. पण अखिलेशनी विधानसभा बरखास्तीची करण्याची शिफारस केली आणि सरकार अल्पमतात आले आहे अशी राज्यपालांना खात्री झाल्यास राष्ट्रपती राजवटीचा मार्ग मोकळा होईल.

शह-काटशहचे राजकारण रंगले
एवढे झाल्यावर अखिलेश गप्प बसतील, यावर कोणाचाही विश्वास नाही. दुसरीकडे त्यांनी मुलायमसिंग वा शिवपाल यांना शह देण्याचा प्रयत्न केल्यास, तितक्यास जोरकसपणे त्यांना काटशह दिला जाईल, हे उघड आहे. अशा शह-काटशहाच्या राजकारणातच राज्यात घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होईल आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या आधीच राष्ट्रपती राजवट लागू होईल, अशी अटकळ आहे.

Web Title: Akhilesh rebukes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.