'एकतर माझी हत्या करा किंवा...', न्यायालयाच्या निर्णयानंतर केजरीवालांची भाजपवर जोरदार टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 17:43 IST2026-02-27T17:39:44+5:302026-02-27T17:43:14+5:30
Arvind Kejriwal : दिल्ली मद्य धोरणातील कथित भ्रष्टाचार प्रकरणात न्यायालयाने अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

'एकतर माझी हत्या करा किंवा...', न्यायालयाच्या निर्णयानंतर केजरीवालांची भाजपवर जोरदार टीका
Arvind Kejriwal : दिल्ली मद्य धोरणातील कथित भ्रष्टाचार प्रकरणात न्यायालयाने पुराव्यांच्या अभावी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. कोर्टाच्या निकालानंतर, केजरीवालांनी भाजपवर जोरदार टीका केली. हा संपूर्ण प्रकार राजकीय कट असल्याचा आरोप करत त्यांनी स्वतःसह आम आदमी पार्टी (AAP)च्या नेत्यांच्या प्रामाणिकतेवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याचे म्हटले.
न्याय व्यवस्थेने ऐतिहासिक निर्णय दिला
कोर्टाच्या निर्णयानंतर बोलताना केजरीवाल म्हणाले, लोक विचारतात की, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल कुठे गायब झाले. मी काही राजकारणी नाही; अशा आरोपांचा मला त्रास होतो. मी ठरवले होते की, सत्य बाहेर येईपर्यंत शांत राहायचे. आज माझे मन हलके झाले. भाजपने गेल्या चार वर्षांपासून कथित मद्य घोटाळ्याचा उल्लेख करत आमच्यावर आरोप केले. मात्र आज आपल्या न्याय व्यवस्थेने ऐतिहासिक निर्णय दिला आहे.
केजरीवालची हत्या करा, किंवा...
विरोधकांनी सर्व प्रयत्न करून पाहिले, पण अरविंद केजरीवालचे काहीही वाकडे करू शकले नाही. त्यांच्यासमोर आता एकच मार्ग उरतो. एकतर केजरीवालची हत्या करा किंवा आमच्यापेक्षा जास्त शाळा आणि मोहल्ला क्लिनिक उभे करून दाखवा. आज देशभरात लोकांना धमकावले जात असताना न्यायाधीशांनी मोठे धैर्य दाखवले. आम्ही न्यायालयाचे, तसेच अभिषेक मनु सिंघवी, हरिहरन यांच्यासह सर्व वकिलांचे आभार मानतो, असेही केजरीवाल म्हणाले.
600 पानांच्या आदेशात एकही पुरावा नाही
केजरीवाल यांनी दावा केला की, कोर्टाने आपल्या 600 पानांच्या आदेशात स्पष्ट लिहिले आहे की, या प्रकरणात एकही पुरावा कोर्टासमोर सादर झालेला नाही. हा संपूर्ण कट रचण्यात आला होता. यासाठी सत्ताधाऱ्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे. दिल्लीमध्ये आम्हाला निवडणुकीत हरवता येत नाही हे कळल्यावर आमच्या प्रामाणिकतेवरच हल्ला करण्यात आला. 100 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला गेला. मात्र आज कोर्टाच्या आदेशाने सिद्ध झाले आहे की, अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, संजय सिंह आणि दुर्गेश पाठक हे कट्टर प्रामाणिक आहेत.