"१० दिवस उलटून गेले, PM मोदींना कोणत्याही आमदारावर विश्वास नाही", आतिशी यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 16:16 IST2025-02-17T16:14:22+5:302025-02-17T16:16:45+5:30
भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नाही. भाजप आमदार कोणत्याही दूरदृष्टीशिवाय बसले आहेत, असे आतिशी यांनी म्हटले आहे.

"१० दिवस उलटून गेले, PM मोदींना कोणत्याही आमदारावर विश्वास नाही", आतिशी यांचा टोला
नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. यानंतर भाजपकडून अद्याप सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. बरेच दिवस उलटूनही अजून दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांची निवड झाली नाही. यावरून आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्या आणि माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी भाजपवर मोठा हल्लाबोल केला आहे. भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नाही. भाजप आमदार कोणत्याही दूरदृष्टीशिवाय बसले आहेत, असे आतिशी यांनी म्हटले आहे.
दिल्लीतील जनतेला अशी अपेक्षा होती की ८ तारखेच्या निकालानंतर भाजप ९ तारखेला आपल्या मुख्यमंत्र्यांची घोषणा होईल आणि १० फेब्रुवारीला शपथविधी समारंभही होईल. दिल्लीतील जनतेला ११ फेब्रुवारीपासून त्यांचे काम सुरू व्हावे अशी इच्छा होती. पण इथे फक्त तारीख पुढे ढकलली जात आहे आणि भाजपने अद्याप आपला मुख्यमंत्री निवडलेला नाही. भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नाही, हे स्पष्टपणे दिसून येत आहे, असे आतिशी म्हणाल्या.
याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदींना ४८ विजयी आमदारांपैकी कोणत्याही आमदारावर विश्वास नाही. ते कोणालाही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवू शकत नाहीत, असा दावाही आतिशी यांनी केला. तसेच, ४८ भाजप आमदारांकडे फक्त एकच काम शिल्लक आहे; ते दिल्लीतील जनतेचे पैसे वाया घालवतील आणि लुटतील, असाही आरोप आतिशी यांनी केला. दरम्यान, निवडणूक निकालानंतर भाजप नेते जय पांडा म्हणाले होते की, दिल्लीला १० दिवसांत नवीन मुख्यमंत्री मिळेल.
नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी २० फेब्रुवारीला
दरम्यान, भाजपकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी समारंभ २० फेब्रुवारी रोजी दिल्लीत होणार आहे. आज होणारी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. आता बुधवारी म्हणजेच १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी मोठा शपथविधी समारंभ होईल. शपथविधी सोहळा दिल्लीतील रामलीला मैदानावर होणार आहे.
मुख्यमंत्र्यांचे नाव अद्याप ठरलेलं नाही
दिल्लीत विधानसभा निवडणुकीचे निकाल ८ फेब्रुवारीला जाहीर झाले. यात भाजपने ७० पैकी ४८ जागा जिंकल्या. या विजयानंतर भाजपकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, दिल्लीत भाजपकडून मुख्यमंत्री कोण होणार? हे अद्याप निश्चित झालेले नाही. भाजपचे वरिष्ठ नेते दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत अनेक बैठका घेत आहेत. या बैठकींनंतरच मुख्यमंत्र्यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावे चर्चेत
मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांमध्ये भाजपच्या अनेक आमदारांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये नवी दिल्ली मतदारसंघातून आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे प्रवेश वर्मा यांचे नाव सर्वाधिक जास्त चर्चेत आहे. याचबरोबर, दिल्ली भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष विजेंदर गुप्ता, सतीश उपाध्याय, मनजिंदर सिंग सिरसा, पवन शर्मा, आशिष सूद, रेखा गुप्ता आणि शिखा राय यांचेही नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे म्हटले जात आहे.