रामदेव बाबांची मोठी घोषणा! १२ वी पास, पदवीधर, पदव्युत्तर तरुणांना पतंजली संन्यासी-ब्रह्मचारी बनवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 16:34 IST2023-03-14T15:54:15+5:302023-03-14T16:34:17+5:30
बाबा रामदेव यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तरुणांवा या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे.

रामदेव बाबांची मोठी घोषणा! १२ वी पास, पदवीधर, पदव्युत्तर तरुणांना पतंजली संन्यासी-ब्रह्मचारी बनवणार
योग गुरु स्वामी रामदेव बाबा यांनी देशातील तरुणांसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यात संन्यासी आणि ब्रह्मचारी संदर्भात कार्यशाळेचे आयोजन केले आहे, या कार्यक्रमासाठी तरुणांना बाबा रामदेव यांनी निमंत्रण दिले आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर माहिती शेअर करण्यासोबतच वर्तमानपत्रांमध्ये जाहिरातीही दिल्या आहेत. 'ज्या तरुण-तरुणींना भिक्षू बनायचे आहे त्यांना कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील. यासाठी संन्यास महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे, जो २२ मार्चपासून सुरू होईल आणि रामनवमी म्हणजेच ३० मार्चपर्यंत चालेल. यासाठी बारावी उत्तीर्ण, पदवीधर, पदव्युत्तर तरुण अर्ज करू शकतील, असं यात बाबा रामदेव यांनी सांगितले आहे.
बाबा रामदेव यांनी शेअर केलेल्या पोस्टरमध्ये म्हटले आहे की, 'कोणत्याही जाती आणि समुदायात जन्मलेला एक सामान्य व्यक्ती मोठी क्रांती घडवू शकतो. फक्त तोच पराक्रमी आणि कठोर प्रयत्न करणारा असावा.
रामनवमी दिवशी पतंजली येथे येऊन त्यांच्याकडून दीक्षा घेऊन तपस्वी जीवन जगण्याचे आवाहन बाबा रामदेव यांनी तरुणांना केले. तरुणांनी पतंजली विद्यापीठात येऊन शिक्षण घेऊन स्वत:मध्ये महान ऋषीमुनींसारखे व्यक्तिमत्त्व घडवावे, असंही त्यांनी म्हटले आहे. संन्यासी तरुण सनातनला समर्पित असतील, कोणत्याही जातीचे आणि प्रांतातील पालक आपल्या हुशार मुलांना नाव गौरवण्यासाठी शिक्षण आणि दीक्षा घेऊन रामदेव यांच्याकडे पाठवू शकतात. ही मुले सनातन धर्मात एकनिष्ठ राहतील, असंही यात पुढे म्हटले आहे.
'जर एखाद्या तरुणाला स्वत:च्या इच्छेने संन्यास घेण्यासाठी यायचे असेल आणि अज्ञान किंवा आसक्तीमुळे त्याचे पालक त्याला समजून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे पालकांच्या परवानगीशिवायही तो पतंजली योगपीठात येऊ शकतो. स्वामी रामदेव आणि महर्षी दयानंद यांसारखे बहुतेक संन्यासी असेच तयार झालेले असतात. तुम्ही हे अभ्यासक्रम पतंजली विद्यापीठातून करू शकता, असंही रामदेवबाबा म्हणाले. एमए, बीएएमएस आणि बीवायएनएस सोबत योगात बीए आणि एमए आणि संस्कृत आणि साहित्य यासह तत्त्वज्ञान, वेदशास्त्र आणि व्याकरण देखील पतंजली विद्यापीठातून करता येईल, असा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे.