उत्तम प्रशासनासाठी डिजिटल व्यवहार आवश्यक

By Admin | Published: December 25, 2016 05:05 AM2016-12-25T05:05:18+5:302016-12-25T05:05:18+5:30

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा आज, २५ डिसेंबर रोजी वाढदिवस. त्यांचा वाढदिवस देशभर सुशासन दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारने घेतला आहे.

Better administration requires digital transaction | उत्तम प्रशासनासाठी डिजिटल व्यवहार आवश्यक

उत्तम प्रशासनासाठी डिजिटल व्यवहार आवश्यक

googlenewsNext

- वेंकय्या नायडू
(माहिती व प्रसारण तसेच शहर विकास मंत्री)

२५ डिसेंबर : सुशासन दिन

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा आज, २५ डिसेंबर रोजी वाढदिवस. त्यांचा वाढदिवस देशभर सुशासन दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारने घेतला आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख...

मी कोणत्या रस्त्याने जाऊ?
गजबजलेल्या चौरस्त्यावर
पराभव पत्करू,
की बाजारबुणग्यांकडून सरदाराची
होणारी हार पत्करू!
मी अखेरची लढाई लढू की
युद्धातून माघार घेऊ?
मी कोणत्या रस्त्याने जाऊ?
एक स्वप्न जन्मले आणि नष्ट झाले,
वसंतात बाग सुकून जावी
आणि उरलेला पाचोळा मी वेचावा
की नवे जग निर्माण करू?
मी कोणत्या रस्त्याने जाऊ?

राह कौनसी जाऊ मैं या माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या कवितेतील या काही ओळी आहेत.
लोकांपर्यंत पोचण्यासाठी एखादी व्यक्ती जेव्हा खडतर मार्गाची निवड करते, तेव्हा तिला अनेक अडचणींना सामोरे जाण्याची तयारी करावी लागते. प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी तरी अशी वेळ येते की, संकटांचा सामना करून पुढे जायचे की माघार घ्यायची, यापैकी एकाची निवड करावी लागते! ज्यांच्यात धाडस नसते, ते पहिला अडथळा येताच माघार घेतात. पण प्रचंड इच्छाशक्ती असलेली व्यक्ती मात्र संकटावर मात करून आपले इच्छित ध्येय साध्य करतेच! अटल बिहारी वाजपेयी हे या तऱ्हेची विजिगिषु वृत्ती असलेले नेते आहेत.
पंतप्रधानपदापर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. ते एका सामान्य शिक्षकाचा मुलगा होते व पत्रकार म्हणून त्यांनी जीवनाची सुरुवात केली होती. चले जाव चळवळीत भाग घेतल्याने त्यांना अटकही झाली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते कार्यप्रवण स्वयंसेवक होते. त्यांनी स्वदेश, वीर अर्जुन, राष्ट्रधर्म आणि पांचजन्य या नियतकालिकांचे संपादन केले होते. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांच्या सरकारने त्यांना अटक केली होती. पण लोकसेवा करण्याची बांधिलकी त्यांनी कधी सोडून दिली नाही. भारतीय जनसंघ आणि त्याच पक्षाचे रूपांतर भारतीय जनता पक्षात झाले, तेव्हा पक्षाचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी पक्षाची शून्यापासून उभारणी केली. वाजपेयी १९५७ ते २००९ या काळात दहा वेळा संसदेत निवडून गेले. जनता पक्षात परराष्ट्रमंत्री असताना त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावर स्वत:चा ठसा उमटविला. पुढे ते देशाचे पंतप्रधान जेव्हा झाले, तेव्हा अनेक समस्यांचा त्यांना सामना करावा लागला. पहिल्यांदा ते १३ दिवस, त्यानंतर १३ महिने पदावर राहिले. पण अखेर बिगरकाँग्रेसी पंतप्रधान या नात्याने त्यांनी सलग पाच वर्षे देशाचा कारभार बघितला. अत्यंत कमी काळात दीर्घकाळ लाभ देऊ शकणारे अनेक निर्णय त्यांनी घेतले. देशाच्या महत्त्वाच्या शहरांना जोडणारे आठ महामार्ग त्यांच्याच काळात निर्माण झाले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील जनता शहरांपर्यंत सहज पोहोचू लागली. विकासाच्या मार्गावर ‘सुवर्ण चतुष्कोन’ आणि ‘ग्रामीण सडक’ योजना है मैलाचे दगड ठरले.
माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी सुरू केलेल्या आर्थिक सुधारणा त्यांनी अधिक वेगाने पुढे चालविल्या. आर्थिक विकासाच्या हिताच्या दृष्टिकोनातून विदेश संचार निगम लिमिटेडसारख्या सार्वजनिक उपक्रमांचे त्यांनी खासगीकरण केले. अनिवासी भारतीयांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी ‘प्रवासी भारतीय दिवस’ कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला. हवाई प्रवास, रेल्वे प्रवास, रस्ता वाहतूक, माहिती तंत्रज्ञान, बंदर विकास आणि राजकारणसुद्धा त्यांनी क्रांतिकारी वळणावर नेले. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, गरिबांच्या घरांसाठी आंबेडकर, वाल्मिकी वस्ती योजना, सर्वशिक्षा अभियान या योजनांच्या माध्यमातून त्यांनी अशिक्षित जनतेला साक्षर होण्यास साह्य केले. पंतप्रधान झाल्यावर वाजपेयींनी पोखरण येथे अणुचाचणी करून भारताची अण्वस्त्रशक्ती जगाला दाखवून दिली. त्यामुळे अमेरिका, ब्रिटन, कॅनडा या राष्ट्रांनी भारतावर आर्थिक बंदी लादून भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण काही काळातच त्यांना ही बंदी उठवावी लागली. वाजपेयींनी स्वत:ची परराष्ट्र धोरणाची शैली विकसित केली. त्यांनी चीनसोबत व्यापार संबंध वाढविण्यावर भर दिला. त्यांच्या काळात २२ वर्षानंतर प्रथमच अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिन्टन यांनी भारताचा दौरा करून भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. दहशतवादाविरुद्ध साऱ्या जगाने सामूहिक लढा देण्याची गरज वाजपेयींनीच प्रतिपादन केली. लाहोरला बसयात्रा सुरू करून
त्यांनी पाकिस्तानसोबत मित्रत्वाचा हात पुढे करून सीमेवरून चालणारा दहशतवाद थांबविण्याचा प्रयत्न केला. वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालीच भारतीय लष्कराने आॅपरेशन
विजयद्वारे कारगिलच्या युद्धात यश संपादन केले.
उपखंडात शांतता नांदली, तरच राष्ट्रे प्रगती करू शकतील, या भावनेतून त्यांनी पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल मुशर्रफ यांच्यापुढे मैत्रीचा हात केला. ‘‘आम्हाला शांतता हवी आहे पण आमच्या हद्दीत कुणी आक्रमण केले, तर आम्ही पोलादी हातांनी ते परतवून लावू’’ हा निर्धार त्यांनी १५ आॅगस्ट २००१ मध्ये लाल किल्ल्यावरून भाषण देताना व्यक्त केला होता. वक्तृत्व ही त्यांची ताकद आहे. शंकराच्या जटेतून वाहणाऱ्या गंगेच्या ओघाप्रमाणे त्यांच्या वाणीतून शब्दांची गंगा प्रवाहित व्हायची. १९५७ साली लोकसभेत प्रथमच प्रवेश केल्यानंतर त्यांनी केलेल्या भाषणाने पं. जवाहरलाल नेहरूसुद्धा प्रभावित झाले होते आणि त्यांची पाठ थोपटून भविष्यात तू देशाचे नेतृत्व करशील, असे भाकीत केले होते. पं. नेहरूंचे ते शब्द चार दशकांनंतर प्रत्यक्षात उतरले!
वाजपेयी हे अजातशत्रू आहेत. त्यामुळे विरोधी पक्षात असो की, पंतप्रधानपदी असो ते सर्वांच्या आदराचे पात्र ठरतात. चांगले प्रशासन कसे असावे याविषयी ते म्हणत, ‘‘सामान्य व्यक्तीच्या सक्षमीकरणातून राष्ट्र सक्षम होत असते. त्यासाठी झपाट्याने आर्थिक विकास होणे गरजेचे असते.’’ त्यांनी त्यांच्या काळात अनेक आर्थिक सुधारणा लागू करून धोरण लकवा संपवून टाकला. म्हणून २५ डिसेंबर हा त्यांचा जन्मदिन रालोआ सरकारकडून ‘सुशासन दिन’ म्हणून पाळण्यात येतो.
वाजपेयींप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या करिअरची सुरुवात संघाचे स्वयंसेवक म्हणूनच केली. वाजपेयी हे शिक्षकाचा मुलगा आहेत तर मोदी हे चायवाला. आपल्या देशात अशी व्यक्ती पंतप्रधानपदापर्यंत पोहोचू शकते, हे आपल्या भारतीय लोकशाहीचे मोठेपण आहे. दोघांचीही एक विचारधारा आहे आणि समान ध्येय आहे. वाजपेयींप्रमाणेच मोदींची धारणा आहे की लोकशाहीत सत्ताधारी हे शासक नसतात तर जनताच शासक असते. त्यामुळे ते स्वत:ला ‘प्रधानसेवक’ मानतात. विकासाच्या केंद्रस्थानी सामान्य माणूस असावा ही मोदींची धारणा आहे. किमान शासन, कमाल प्रशासन, या धोरणावर त्यांचा फोकस आहे. चांगल्या प्रशासनाच्या मार्गात काळा पैसा अडसर ठरतो. भ्रष्टाचार आणि काळा पैसा यांनी गरिबांचे शोषण केले व त्यांचे हक्क हिरावून घेतले म्हणून मोदींनी काळ्या पैशाविरुद्ध युद्ध पुकारले आहे.
अखेर सुशासन काय असते? लोकांच्या गरजांची पूर्तता करणे हे सरकारचे कर्तव्य आहे, हा विचार सुशासनाच्या केंद्रस्थानी आहे. देशाच्या विकासाला दुर्बलांचा तसेच सशक्तांचा सारखाच हात लागला पाहिजे. प्रशासनात पारदर्शकता आणि परिणामकारकता हवी. भ्रष्टाचारमुक्त स्वच्छ प्रशासन हवे. सरकारी कर्मचाऱ्यांनी सुशासन देत सामान्य माणसाचे उत्तरदायित्व पत्करले पाहिजे. निर्णय प्रक्रियेत विलंबाला, पक्षपातीपणाला स्थान नसावे. पंतप्रधानांच्या हस्तक्षेपामुळे प्राप्तिकराचा परतावा १५ दिवसांत मिळू लागला आहे. त्यात उशीर झाल्यास संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येते. भ्रष्टाचार उखडून टाकण्यासाठी जनधन खात्यांना त्यांनी लोकांना मिळणाऱ्या लाभाशी जोडले. दलालाची कमिशनखोरी संपावी, हा त्यामागचा हेतू होता. लोकांचे जीवन सुखकर व्हावे यासाठी त्यांनी १००० हून अधिक जुने अर्थहीन कायदे संपवून टाकले. ‘जीवन प्रमाण’ आणि आधार आधारित डिजिटल जीवन प्रमाणपत्रामुळे निवृत्तीधारकांना दरवर्षी जीवन प्रमाणपत्र देण्याची गरज उरली नाही. My Gov. आणि  Narendra Modi apps च्या माध्यमातून सामान्य माणसाला देशाच्या विकासात त्यांनी सहभागी करून घेतले आहे.
वाजपेयींच्या सुशासनाच्या कार्यक्रमाचा मोदींनी विस्तार केला. ‘सुधारणा, कामगिरी आणि बदल’ हे त्यांचे ध्येय आहे. त्यांना आपला देश मजबूत व समृद्ध करायचा आहे. खेडे, गरीब, महिला, तरुण आणि अंत्योदय हे त्यांचे प्राधान्याचे विषय आहेत. ‘पराभव स्वीकारणार नाही’ असे विचार वाजपेयींनी एका कवितेतून व्यक्त केले आहेत. तेच मोदींसाठी प्रेरणास्थान आहे. लोकांच्या हृदयात कायमचे स्थान मिळण्यासाठी लोकांच्या प्रश्नासाठी लढा देण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.

Web Title: Better administration requires digital transaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.