Bihar Assembly Election Results : झेंड्याच्या वादावरून भाजपा-राजदच्या समर्थकांमध्ये हाणामारी; अनेक जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 14:17 IST2020-11-11T14:07:04+5:302020-11-11T14:17:40+5:30
Bihar Assembly Election Results : सीवान जिल्ह्याच्या गोरेयाकोठी विधानसभा मतदारसंघातील अंगया गावात ही घटना घडली.

Bihar Assembly Election Results : झेंड्याच्या वादावरून भाजपा-राजदच्या समर्थकांमध्ये हाणामारी; अनेक जण जखमी
सीवान : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. या निकालानंतर सीवानमध्ये भाजपा आणि राजदच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याचे समजते. तसेच, घटनेतील पीडितांकडून पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
सीवान जिल्ह्याच्या गोरेयाकोठी विधानसभा मतदारसंघातील अंगया गावात ही घटना घडली. या मतदारसंघात भाजपाचे उमेदवार देवेशकांत सिंह यांचा विजय झाला आहे. या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपा आणि राजदच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत राजदचे काही समर्थक जखमी झाले आहेत. जखमींना सीवानच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
अंगया गावातील काही दलित आणि कुशवाहा कुटुंबीयांनी आपल्या घरांवर राजदचा झेंडा लावला होता. यावरून गावातील भाजपा समर्थक नाराज होते. त्यानंतर निवडणुकीचा निकाल हाती येताच भाजपाच्या समर्थकांचा जोर वाढला आणि बाचाबाचीला सुरुवात झाली. या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत राजदचे समर्थक गंभीर स्वरुपात जखमी झाले. त्यांच्यावर सीवानच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी समर्थकांच्या म्हणण्यानुसार, घरावर राजदचा झेंडा लावण्यावरून गावात भाजपा समर्थक नित्यानंद सिंह यांच्यासहित १४ जणांनी मारहाण केली. दरम्यान, या घटनेची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.
निकालाकडे सर्वांचे लक्ष...
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकाचा निकाल आता सर्वांसमोर आला आहे. बिहारमध्ये भाजपा आणि नितीश कुमार यांच्या एनडीएला बहुमत मिळणार नाही, असे एक्झिट पोलचे अंदाज मतदारांनी धुळीस मिळविले आणि या एनडीएलाच सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. मंगळवारी रात्री एनडीएने १२२ बहुमताचा जादूई आकडा पार करताच एकच उत्सवाचे वातावरण झाले. रात्री एनडीएने बहुमताचा आकडा ओलांडला आणि बिहारच्या लोकांनी एनडीएला पुन्हा एकदा राज्याची सत्ता सांभाळण्याची संधी दिली. पण भाजपाला संयुक्त जनता दलापेक्षा अधिक जागा मिळाल्याने नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील का, हा प्रश्न आहे.
नितीशकुमार यांनी भाजपा मुख्यमंत्रीपद देणार का?
शिवसेनेपाठोपाठ अकाली दलानेही भाजपाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संयुक्त जनता दल भाजपाचा सर्वात मोठा सहकारी पक्ष म्हणून समोर आला. मात्र आपल्याहून कमी जागा जिंकणाऱ्या नीतिशकुमार यांना मुख्यमंत्री बनवण्याची भूमिका भाजपाने कायम ठेवली, तरच एनडीएचे अस्तित्त्व टिकेल. २०१४ साली लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा महाराष्ट्रात शिवसेना व भाजपाने स्वतंत्र निवडणूक लढवली. पण नंतर शिवसेना-भाजपा युती सरकार झाले. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत युती कायम राहिली. मात्र मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्ष एकमेकांपासून दूर गेले. जदयूनेही पंतप्रधान मोदी यांना विरोध करून एनडीएला काही काळ सोडचिठ्ठी दिली होती.