बिहारी जनतेने समाजात फूट पाडणा-यांना नाकारले - नितीशकुमार
By admin | Published: November 8, 2015 06:04 PM2015-11-08T18:04:31+5:302015-11-08T18:25:33+5:30
बिहार निवडणुकीचा देशावर प्रभाव पडणार असून देशातील जनतेला राष्ट्रीय स्तरावर एक सक्षम पर्याय हवा आहे. जनतेने समाजात फूट पाडण्याच्या प्रयत्नांना नाकारले अशी प्रतिक्रिया नितीशकुमार यांनी दिली आहे.
ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. ८ - बिहार निवडणुकीचा देशावर प्रभाव पडणार असून देशातील जनतेला राष्ट्रीय स्तरावर एक सक्षम पर्याय हवा आहे. जनतेने समाजात फूट पाडण्याच्या प्रयत्नांना नाकारले अशी प्रतिक्रिया नितीशकुमार यांनी दिली आहे. बिहारमधील विजय हा बिहारी जनतेच्या स्वाभिमानाचा विजय असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
बिहारमध्ये बहुमताचा आकडा ओलांडल्यावर नितीशकुमार, लालूप्रसाद यादव आणि काँग्रेस या महाआघाडीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. बिहारमधील निवडणूक हा मैलाचा दगड ठरली असून यातून देशातील मानसिकता दिसून येते असे नितीशकुमारांनी म्हटले आे. निवडणुकीतील कटू प्रचारानंतरही आम्ही कोणाशीही शत्रूत्व ठेवणार नाही, सकारात्मक विचाराने सर्वांना सोबत घेऊन काम करु असे त्यांनी स्पष्ट केले. बिहारच्या प्रगतीमध्ये आम्हाला केंद्राचेही सहकार्य हवे आहे असे नितीशकुमार यांनी सांगितले. बिहारच्या जनतेला आमच्याकडून आशा असून त्या आशा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु अशी ग्वाहीही त्यांनी दिली.