लालू ठरले बिहारचे 'बाहुबली'
By admin | Published: November 8, 2015 05:43 PM2015-11-08T17:43:25+5:302015-11-08T17:43:25+5:30
२०१५ च्या विधानसभा निवडणुकीत लालूप्रसाद यादव यांनी सर्वाधिक ८० जागांवर आघाडी घेत बिहारच्या राजकारणात दमदार पुनरागमन केले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. ८ - २००५ च्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव आणि चारा घोटाळ्यात झालेली तुरुंगवासाची शिक्षा यामुळे लालूप्रसाद यादव यांची राजकीय कारकिर्द संपुष्टात आल्याची चर्चा सुरु होती. मात्र २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत लालूप्रसाद यादव यांनी सर्वाधिक ८० जागांवर आघाडी घेत बिहारच्या राजकारणात दमदार पुनरागमन केले आहे.
तब्बल १५ वर्ष बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांचे राज्य होते. २००५ च्या निवडणुकीत नितीशकुमार यांच्या जदयू आणि भाजपा युतीने बिहारमधून लालूंचे साम्राज्य खालसा केले. त्यानंतर लालूप्रसाद यांची पिछेहाटच सुरु झाली. विविध निवडणुकांमध्ये राष्ट्रीय जनता दलाचा पराभव सुरु होता. २०१० मधील विधानसभा निवडणुकीत राजदला फक्त २२ जागांवर समाधान मानावे लागले होते. २०१३ मध्ये चारा घोटाळ्याप्रकरणी लालूंना दोषी ठरवण्यात आले व त्यांना खासदारकीही गमवावी लागली. लालूंना सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्याचा मार्गही बंद झाला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राजदला ४० पैकी फक्त ४ जागांवरच विजय मिळाल्याने बिहारमध्ये लालूपर्वाची अखेर झाल्याची चर्चा सुरु झाली.
गेल्या वर्षभरात लालूप्रसाद यांनी बिहारच्या राजकारणात पुनरागमन करण्यासाठी अथक मेहनत घेतली. लालूंची पत्नी राबडीदेवी राजकारणात येण्यासाठी तयार नव्हत्या तर लालूंचे पुत्र तेजप्रताप आणि तेजस्वी हे दोघेही मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याच्या दृष्टीने फारसे अनुभवी नव्हते. अशा स्थितीत मोदींना घडवण्यासाठी लालूंनी कट्टरविरोधक नितीशकुमार यांच्याशी घरोबा साधला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत लालूंनी सर्वाधिक म्हणजेच तब्बल २४२ हून अधिक सभा घेतल्या. आरक्षण, हिंदूत्ववादाच्या मुद्द्यावर लालूंनी भाजपावर जहरी टीका केली. बीफच्या विधानावरुन भाजपाने लालूंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र बिहारी जनतेने भाजपाला फारसा प्रतिसाद दिला नाही याऊलट लालूंना भरभरुन मतं दिली. एकेकाळी बिहारचे किंग म्हणून ओळखले जाणारे लालू आता बिहारचे किंगमेकर ठरले आहेत. निवडणुकीनंतर लालूंनी नितीशकुमारच आगामी मुख्यमंत्री असतील असे जाहीर केले आहे. तर उपमुख्यमंत्रीपदी लालूंच्या दोन्ही पुत्रांपैकी एकाची निवड होईल अशी शक्यता आहे.