'समाजवादी पक्षात औरंगजेबाचा आत्मा', अबू आझमींच्या युपीच्या उपमुख्यमंत्र्यांची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 15:37 IST2025-03-04T15:37:18+5:302025-03-04T15:37:57+5:30
BJP on Abu Azmi Statement : अबू आझमींनी औरंगजेबावर केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे.

'समाजवादी पक्षात औरंगजेबाचा आत्मा', अबू आझमींच्या युपीच्या उपमुख्यमंत्र्यांची बोचरी टीका
BJP on Abu Azmi Statement : समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू असीम आझमी यांनी औरंगजेबावर केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. भाजपसह काँग्रेस अन् राष्ट्रवादी(शप) पक्षाच्या नेत्यांनींही अबू आझमींवर कारवाईची मागणी केली आहे. अशातच, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीदेखील आझमींसह समाजवादी पक्षावर निशाणा साधला आहे.
'भारत देश कोणत्याही परिस्थितीत भगवान शंकराचा अपमान सहन करणार नाही. याचे उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील जनताच देईल. त्यांच्या संरक्षणाखाली सर्व देशद्रोही शक्ती फोफावतात, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. मुघल आक्रमकांनी देशाची संस्कृती उद्धवस्त केली, पण भारतीय संस्कृतीने जगाला रस्ता दाखवण्याचे काम केले. समाजवादी पक्षात औरंगजेबाचा आत्मा घुसला आहे. अखिलेश यादव यांनी माफी मागावी आणि अबू आझमींवर कारवाई करावी', अशी टीका केशव प्रसाद मौर्य यांनी केली.
काय म्हणाले अबू आझमी?
सपा नेते अबू असीम आझमी म्हणाले होते की, औरंगजेब क्रूर आणि असहिष्णू शासक नव्हता. त्याने अनेक मंदिरेही बांधली होती. औरंगजेबाने मंदिरे पाडली तर मशिदीही पाडल्या. हिंदू आणि मुस्लिम असा भेद करण्याची गरज नाही. औरंगजेबाबाबत चुकीचा इतिहास दाखवला जातो.
विधानसभेबाहेर निदर्शने
महाराष्ट्र विधानसभेबाहेर भाजप-शिवसेनेच्या नेत्यांकडून अबू आझमींविरोधात निदर्शने करण्यात आली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा दावा करत अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांना विधानसभेत प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी केली.
अबू आझमींविरोधात एफआयआर
अबू आझमींनी केलेल्या वक्तव्याबाबत मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशनमध्ये सीआर क्रमांक 59/25 कलम 299, 302, 356(1), 356(2) BNS अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, अबू आझमी यांच्या वक्तव्याचा परिणाम ठाण्यातही दिसून येत आहे. अबू आझमी यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे निदर्शने करण्यात आली. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लोकांनी निदर्शने केली. यावेळी अबू आझमी यांचा पुतळा जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला.