बसवर विजेची तार पडून १६ ठार
By admin | Published: June 12, 2015 11:57 PM2015-06-12T23:57:20+5:302015-06-12T23:57:20+5:30
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यात शुक्रवारी लग्नाची वरात घेऊन निघालेल्या एका खासगी बसवर विजेची जिवंत तार तुटून पडल्याने बसमधील
जयपूर : राजस्थानच्या टोंक जिल्ह्यात शुक्रवारी लग्नाची वरात घेऊन निघालेल्या एका खासगी बसवर विजेची जिवंत तार तुटून पडल्याने बसमधील १६ प्रवाशांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. तर अन्य अनेक जण होरपळून जखमी झाले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
टोंकच्या बाछेडा गावातील जयराम याचा मुलगा रामचरण याचे लग्न होते. रामचरणची वरात बाछेडावरून मोरला गावाकडे जात होती. येथील माजी सरपंच रामधन याच्या मुलीशी रामचरणचा विवाह होणार होता. रामचरणची वरात मोरला गावात पोहोचण्यापूर्वीच सांस गावानजीक एका विजेच्या खांबावरील जिवंत तार अचानक तुटून वऱ्हाड्यांच्या बसच्या छतावर कोसळली. यामुळे क्षणात बसमध्ये विद्युत प्रवाह पसरला आणि विजेच्या धक्क्याने १६ जणांचा जागीच मृत्यू झाला. बसमधील अनेक वऱ्हाडी भाजले गेले. यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. (वृत्तसंस्था)