चंद्रशेखर आझाद व सावरकरांची क्षमापत्रे: आक्षेप आणि वास्तव

By Admin | Published: March 8, 2016 05:39 PM2016-03-08T17:39:10+5:302016-03-08T17:39:10+5:30

पंतप्रधान मोदीं पुढीलवेळी सुध्दा बहुमताने निवडून यावेत यासाठी कांग्रेस आटोकाट प्रयत्न करतय हे त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरील चंद्रशेखर आझाद-सावरकर संबंधित ट्विट वरून दिसून येतय

Chandrasekhar Azad and Savarkar's forgiveness: objection and fact | चंद्रशेखर आझाद व सावरकरांची क्षमापत्रे: आक्षेप आणि वास्तव

चंद्रशेखर आझाद व सावरकरांची क्षमापत्रे: आक्षेप आणि वास्तव

googlenewsNext
>- अक्षय जोग, पुणे 
पंतप्रधान मोदीं पुढीलवेळी सुध्दा बहुमताने निवडून यावेत यासाठी कांग्रेस आटोकाट प्रयत्न करतय हे त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरील चंद्रशेखर आझाद-सावरकर संबंधित ट्विट वरून दिसून येतय. ते ट्विट असे आहे. 
असली- चंद्रशेखर आझाद- आखरी दम तक लडे प्राणों की आहूति दी, 
नकली- सावरकर- अंगेजो से ६ बार रहम की भीख मांगी.
 
पण ही तुलना करताना कांग्रेस हे विसरली की चंद्रशेखर आझाद हे क्रांतिकारक होते व त्यांचा स्वातंत्र्य मिळवण्य़ाचा मार्ग हिंसेचा होता; हिंसावादी क्रांतिकारकांची ’वाट चुकलेले देशभक्त’ अशी हेटाळणी करणाऱ्या अहिंसक कांग्रेसला चंद्रशेखर आझादांचा स्वातंत्र्य मिळवण्य़ाचा हिंसक मार्ग मान्य आहे का? बर आझाद कांग्रेसमध्येही कधी नव्हते, मग आजच का कांग्रेसला आझादांची आठवण झाली? 
६ फ़ेब्रुवारी १९३१ला नेहरूंना भेटण्यासाठी आझाद गुप्तपणे ’आनंद भवनात’ गेले होते. त्या भेटीचा व चर्चेचा वृत्तांत नेहरूंनी आत्मचरित्रात दिलाय, ’सरकारशी संधी झाला तर आपल्या सहकाऱ्यांच्या गटाला स्वास्थ्य लाभेल काय, ते समजून घेण्याची त्यांची इच्छा होती.’ असे आझाद त्यांना म्हणाले असे नेहरू आत्मचरित्रात म्हणतात. अर्थात त्याचे खंडन वि श्री जोशींनी ’वडवानल’ पुस्तकात केले आहे,(पहा: वडवानल: लेखक: वि श्री जोशी, मनोरमा प्रकाशन, पृष्ठ ४४५) पण कांग्रेसला वि श्री जोशींपेक्षा नेहरू नक्कीच विश्वासार्ह वाटत असतील तर मग आझादांचीसुध्दा सरकारशी संधी करायची इच्छा होती असे दिसते त्यामुळे आजची आझाद-सावरकर तुलना फ़ोल ठरते व जर आझादांनी सरकारशी संधी करायची आहे अशी चर्चा नेहरूंशी केलीच नव्हती असे जर म्हणायचे असेल तर मग नेहरू खोटे ठरतात, अशा दुहेरी पेचात कांग्रेस अडकून तोंडघशी पडली आहे.
मध्यंतरी आझादांचे पुतणे सुजीत आझाद ह्यांनी मागणी केली होती की आझाद आल्फ़्रेड पार्कमध्ये असल्याची बातमी नेहरूंनीच ब्रिटिशांना दिली होती व ह्यासंबंधी पंतप्रधान मोदींनी ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. (यूपी पत्रिका, २७ फ़ेब्रुवारी २०१६)
 
आता मुद्दा सावरकर क्षमापत्रांचा. 
 
ज्याव्यक्तीने सावरकर चरित्र अभ्यासले आहे किंवा निदान 'माझी जन्मठेप' हे आत्मचरित्र वाचले आहे त्यांना ह्या आरोपातील फोलपणा त्वरीत लक्षात येईल.  प्रथम सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रिटिशांच्या तुरूंगात खितपत पडणे ही काही सावरकरांची देशभक्तीची कल्पना नव्हती, ते त्यांचे ध्येयही नव्हते. “कारागृहात राहून जी करता येत आहे त्याहून काही तरी अधिक प्रत्यक्ष सेवा या आमच्या मात्रुभूमीची करता येईल अशा प्रकारच्या कोणत्याही अटी मान्य करून मुक्तता करून घेणे हे प्रतियोगी धोरणानेच नव्हे तर समाजहिताचे दृष्टीनेही आमचे परम कर्तव्य आहे.” (माझी जन्मठेप: भाग २, लेखक: वि.दा. सावरकर, पृष्ठ क्रमांक: १६१) व तसेच “अंदमानात जे काय राष्ट्रहित साधता येईल ते इतके महत्त्वाचे कधीही नसणार की जितके मुक्तता झाल्यास हिंदुस्थानात येऊन साधता येईल; परंतु म्हणून मुक्ततेसाठी वाटेल ते विश्वासघातक, निंद्य, नीच आणि देशाच्या किंवा जातीच्या स्वाभिमानास कलंक लागेल, असे लाळघोटी वर्तन त्यामुळे समर्थनीय ठरणार नाही. कारण त्यायोगे होणारी मुक्तता ही राष्ट्रास अधिक हितकारक होण्यापेक्षा स्वतःचे उदाहरणाने अधिक अनीतिमान आणि राष्ट्र्घातकी मात्र होणारी होती.” (पृष्ठ: १०९) अशी त्यांची मनोभूमिका होती. म्हणजे सुटकेसाठी वाट्टेल त्या देशविघातक-देशद्रोही अटी त्यांनी मान्य केल्या नाहीत. 
 
तसेच हे केवळ सावरकरांचे मत नव्हते तर त्यांचा आंग्ल-मित्र डेव्हिड गार्नेटचेही हेच मत होते. “सावरकरांसारखी उत्कट चैतन्यमय व्यक्ती कारागारात जीवन कंठीत असलेली मी सहनच करू शकत नाही." (In the first volume of his autobiography, The Golden Echo, Harcourt, Brace and Company, New York, 1954) 
 
सावरकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे अनुयायी होते. अफजलखानवधाआधी, सिद्दी जोहारच्या वेढ्याच्यावेळी त्यांनी अशीच शत्रूला बेसावध करणारी पत्रे पाठवली होती, तसेच पुरंदरच्या तहावेळी महाराजांनीही अशीच वेळप्रसंगी औरंगजेबापुढे शरणागती पत्करल्याचे नाटक करून, त्याच्या मानहानीकारक अटी मान्य केल्या व पुढे सामर्थ्य प्राप्त होताच मोगली सत्तेविरूद्ध संघर्ष चालू ठेवला. हा युध्दशास्त्रातील कूटनीतिचा एक भाग असतो. आता कांग्रेस सावरकर-आझादांप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज-आझाद अशीच तुलना करणार का?
 
पहिले महायुद्ध १९१४ ला सुरू झाल्यावर सावरकरांनी हिंदुस्थान सरकारकडे आवेदनपत्र धाडले, ते पत्र मुळातूनच वाचावे; मी त्याचा मुख्य आशय उद्ध्रुत करतो: “हिंदुस्थानाला औपनिवेशक स्वायत्तता (Colonial-Self Government) द्यावी, वरिष्ठ विधिमंडळात हिंदी प्रतिनिधीचे निरपवाद बहुमत व त्याबदल्यात क्रांतिकारक इंग्लंडला महायुद्धात सहाय्य देतील अशा मागण्या केल्या होत्या व ‘युरोपात बहुतेक राष्ट्रे आपआपले अंतर्गत राजबंदी सोडून देत होती, आयरिश 'राजद्रोही' बंदीही सुटले होते’ अशी उदाहरणेही दिली होती. तसेच मला सोडता येत नसेल तर सरकारने मला न सोडता अंदमानतल्या, हिंदुस्थानातल्या आणि बाहेर देशोदेशी निर्वासित होऊन अटकून पडलेल्या राजबंदीवानांस तात्काळ मुक्त करावे. त्यांच्या मुक्ततेत मला जवळजवळ माझ्या मुक्ततेइतकाच आनंद वाटेल." अशी निस्वार्थी मागणीही केली होती. म्हणजे सावरकरांची आवेदनपत्रे-मागण्या क्रांतिकारकांच्यावतीने होत्या केवळ स्वतः करिता नव्हत्या. (पृष्ठ: ४५-४६) 
 
सावरकरांना ह्याची जाणीव होती की काही झाल तरी ब्रिटीश आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत व राजकारणात भाग घेऊ देणार नाहीत, म्हणून मग ‘कारागारीय अन्वेक्षेक मंडळा’पुढे त्यांनी अशी भूमिका मांडली-- "राजकारण करू देत नसाल तर इतर दिशेने देशाची आणि मानवजातीची सेवा करीन, हित करण्यास झटेन. बरे मी ते वचन मोडले तर आपणास मला पुन्हा जन्मठेपीवर धाडता येईल.(पृष्ठ:१११). तसेच राज्यपालांशी झालेल्या सुटकेसंदर्भातील चर्चेतही त्यांनी ह्याचे सुतोवाच केले होते, त्याचा सारांश असा: "काही अवधीपर्यंत राजकारणात - प्रत्यक्ष चालू राजकारणात आपण भाग घेणार नाही. कारागारातही राजकारणात प्रत्यक्ष भाग घेता येतच नाही. परंतु बाहेर राजकारणव्यतिरिक्त शैक्षणिक, धार्मिक, वाड्मयात्मक अशा अनेक प्रकारांनी तरी राष्ट्राची सेवा करता येईल. लढाईत पकडलेले सेनापती, युद्ध चालू आहेतो प्रत्यक्ष रणात उतरू नये, 'धरीना मी शस्त्रा कदनसमयीं या निजकरी' अशी यदुकुलवीराप्रमाणेच प्रतिज्ञा करवून घेतल्यावर त्या अभिवचनावर (on Parole), सोडण्यात येतच असतात आणि त्या यदुकुलवीराप्रमाणेच ते राजनीतिज्ञ सेनानी प्रत्यक्ष शस्त्रसंन्यास तेवढा करावा लागला तरी राष्ट्रकार्यात त्याचे सारथ्य तरी करता यावे म्हणून अशी अट मान्य करण्यात काही एक कमीपणा मानीत नाहीत तर उलट तसे करणे हेच तत्कालीन कर्तव्य समजतात." (पृष्ठ:१६२) ह्यानुसार सावरकरांनी कारावासातील मुक्ततेनंतर अटीनुसार राजकारणाव्यतिरिक्त शुद्धी, समाजसुधारणा, विज्ञाननिष्ठता, भाषाशुद्धी, लिपीसुधारणा अशा प्रकारे प्रचंड समाजकार्य केले. 
जे जे राजबंदीवान अंदमानातून सुटले त्यातील बहुतंशी जणांनी अशाच प्रकारच्या करारपत्रावर स्वाक्षऱ्या करून सुटका करून घेतली होती. उदा. "मी यावर पुन्हा कधीही - किंवा अमुक वर्षे - राजकारणात आणि राज्यक्रांतीत भाग घेणार नाही. पुन्हा मजवर राजद्रोहाचा आरोप सिद्ध झाला तर मी ही माझी मागची उरलेली जन्मठेपही भरीन! (पृष्ठ: १२०) 
अंदमानच्या  कारावासात त्यांचे मनोधैर्य तर खचले नाहीच पण त्यांनी तशा अमानुष बंदिवासातही हाती साधी कागदपेन्सिल नसतानाही कारागृहातील भिंतींवर ५ हजार ओळींचे उत्कट काव्य लिहिले आणि ते सर्व मुखोद्गत केले!  संपूर्ण जगाच्या इतिहासात अशा प्रकारचे हे एकमेव उदाहरण आहे. मनोधैर्य खचल्याचे हे लक्षण म्हणता येइल का?
सावरकरांचे जे पत्र 'क्षमापत्र' म्हणून दाखवतात ते पाहण्यासाठी नवी दिल्लीच्या 'शासकीय अभिलेखागारात' जायची आवश्यकता नाही. ते पत्र 'अंदमानच्या अंधेरीतून' ह्या पुस्तकात ‘पत्र ८ वे- दिनांक ६-७-१९२०’ शीर्षकाखाली छापलेले आहे. (इंग्रजांना पाठविलेल्या आवेदनाचा मूळ दिनांक २-४-१९२०) सावरकरांच्या ह्या अटी, ही आवेदनपत्रे, ह्यामागील राजकीय खेळी, मनोभूमिका स्वत: सावरकरांनी कधीही लपवून ठेवली नाही. सावरकरांचे आत्मचरित्र 'माझी जन्मठेप' मध्ये ह्या सर्वाचा सांगोपांग उहापोह केलेला आहे. त्यामुळे आम्ही नवी दिल्लीच्या 'शासकीय अभिलेखागारात' जाऊन संशोधन करून पत्र शोधून काढली अशा फुशारक्या कोणी मारू नयेत. 
सावरकर शत्रूला फसवायचा प्रयत्न करत होते पण ब्रिटीश न फसता स्वकीयच फसले. कधीही कुठलाही ठराव, आवेदन अशा प्रकारची राजकीय पत्रे वाचताना 'दोन ओळींमधील' (between the lines) वाचता आले पाहिजे, जे सावरकरांच्या पत्रावर आक्षेप घेतात ते एकतर  'दोन ओळींमधील' वाचण्यास सक्षम नसतात किंवा 'दोन ओळींमधील' वाचण्याची त्यांची तयारीच नसते. 
व्हिएतनामच्या कम्युनिस्ट 'हो-चि-मिन्ह'नेसुद्धा चीनच्या कोमिंग्टांग कारागृहातून अशाच प्रकारचे पत्र पाठवून व सहकार्याची अट मान्य करून सुटका करून घेतली होती. मार्शल चँगला त्याने कोमिंग्टांग शासनाच्या आधाराने इंडोचायनात स्थापन झालेल्या 'डाँग-मिन्ह-होई' (जी 'हो-चि-मिन्ह'च्या 'व्हिएत-मिन्ह'ला शह देण्यासाठी स्थापिली होती) या संघटनेचे काम करण्याची इच्छा व्यक्त केली व सुटका करून घेतली. (व्हिएतनाम: अर्थ आणि अनर्थ, लेखक: वि. ग.कानिटकर,  मनोरमा प्रकाशन १९९८, पृष्ठ क्रमांक ५३)
तसेच रशियाने जर्मनीशी केलेला अनाक्रमणाचा करार संपुष्टात आल्यावर मित्र राष्ट्रांशी हातमिळवणी केली, तेव्हा एका रात्रीत कम्युनिस्टांनी आपली निष्ठा बदलली. म्हणजे कम्युनिस्ट करतील ती राजकीय खेळी व सावरकर करतील तो द्रोह? तात्पर्य हेच की ‘झोपलेल्याला उठवता येते पण झोपेचे सोंग घेणार्याला उठवता येत नाही.’ 
 
(सर्वांना लेखातील संदर्भशोध सहज घेता यावा यासाठी 'स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक' प्रकाशित 'माझी जन्मठेप भाग १ व २' पुस्तकाचा आधार घेतला आहे; हे पुस्तक खालील संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध आहे. http://www.savarkarsmarak.com/downloadbooks.php)
 

Web Title: Chandrasekhar Azad and Savarkar's forgiveness: objection and fact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.