काँग्रेस एकटी पडली! उमर अब्दुल्ला यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगाचे आभार मानले; नेमकं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 17:28 IST2025-01-13T17:27:49+5:302025-01-13T17:28:39+5:30
उमर अब्दुल्ला यांनी निवडणूका शांततेत पूर्ण केल्याबद्दल भाजपा सरकारचे कौतुक केले आहे.

काँग्रेस एकटी पडली! उमर अब्दुल्ला यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगाचे आभार मानले; नेमकं कारण काय?
महाराष्ट्रातील निवडणुकीनंतर काँग्रेसने ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. ईव्हीएमच्या मुद्द्यावर आधी अन्य विरोधी पक्षांनीही प्रश्न उपस्थित केले होते, आता या मुद्द्यावर विरोधी पक्षांमध्ये एकमत नसल्याचे दिसत आहे. दरम्यान, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी निवडणुकीत झालेल्या हेराफेरीच्या आरोपांवरून पुन्हा एकदा काँग्रेसला आरसा दाखवला आहे. सोनमर्गमधील बोगद्याच्या उद्घाटनासाठी हे सर्व नेते एका व्यासपीठावर आले होते. यावेळी उमर अब्दुल्ला यांनी व्यासपीठावर बसलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आणि त्यांना आपले वचन पाळणारे पंतप्रधान म्हटले.
दीड लाख वर्षांनी आजच्या रात्री मोठी पर्वणी; सूर्याच्या तावडीतून निसटलेला धुमकेतू दिसणार
उमर अब्दुल्ला म्हणाले की, आपल्या पंतप्रधानांनी नेहमीच त्यांची आश्वासने पूर्ण केली आहेत. योग दिनानिमित्त ते काश्मीरमध्ये आले होते आणि त्यांनी तीन आश्वासने दिली होती. यापैकी दोन पूर्ण झाली आहेत, तर तिसरे शिल्लक आहे. यातील एक आश्वासन म्हणजे दिल्ली आणि दिलमधील अंतर कमी करणे, जे त्यांनी पूर्ण केले आहे.
याशिवाय, दुसरे आश्वासन जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांचे आहे. त्यांनी योग दिनी वचन दिले होते आणि ४ महिन्यांत ते पूर्ण केले. उमर अब्दुल्ला म्हणाले की, त्या आश्वासनाची पूर्तता केल्यामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये निवडणुका झाल्या आणि मी मुख्यमंत्री म्हणून तुम्हा लोकांना संबोधित करत आहे. एवढेच नाही तर, शांततेत आणि कोणत्याही धांदलीशिवाय निवडणुका पार पाडल्याबद्दल उमर अब्दुल्ला यांनी भाजप सरकारचे कौतुक केले.
उमर अब्दुल्ला म्हणाले, 'लोकांनी मोठ्या संख्येने निवडणुकीत भाग घेतला आणि निवडणुका शांततेत पार पडल्या. कुठेही कोणत्याही प्रकारची हेराफेरी किंवा गोंधळ झाल्याची तक्रार नव्हती. याचे श्रेय तुम्हाला, तुमच्या सहकाऱ्यांना आणि निवडणूक आयोगाला जाते, असंही उमर अब्बुल्ला म्हणाले.
उमर अब्दुल्ला म्हणाले की, हा जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रश्न आहे. माझे मन म्हणते की तुम्ही लवकरच तुमचे हे तिसरे वचन पूर्ण कराल आणि जम्मू आणि काश्मीर लवकरच राज्याचा दर्जा परत मिळेल.
ईव्हीएमवरुन काँग्रेसवर निशाणा साधलेला
महाराष्ट्र निवडणुकीनंतरही काँग्रेसने ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले होते. यावर उमर अब्दुल्ला म्हणाले होते की असे प्रश्न योग्य नाहीत. अब्दुल्ला म्हणाले होते की, तुम्ही जिंकल्यावर असे प्रश्न का विचारत नाही. तुम्ही ज्या राज्यांमध्ये जिंकलात त्या राज्यांवर तुम्ही कोणताही प्रश्न उपस्थित केला नाही. त्यामुळे या प्रकारचा निषेध योग्य वाटत नाही. यावर संतप्त काँग्रेसने उमर अब्दुल्ला यांच्यावर टीका केली होती.