पंजाबमध्ये काँग्रेस, ‘आप’मुळे अकाली दल-भाजपाचा बचावाचा पवित्रा

By admin | Published: January 7, 2017 04:41 AM2017-01-07T04:41:06+5:302017-01-07T04:41:06+5:30

सतलज यमुना लिंक कालव्याचे पाणीवाटप हे दोन मुद्दे सर्वाधिक कळीचे ठरणार आहेत

Congress in Punjab, 'AAP', Akali Dal-BJP posthumously saved | पंजाबमध्ये काँग्रेस, ‘आप’मुळे अकाली दल-भाजपाचा बचावाचा पवित्रा

पंजाबमध्ये काँग्रेस, ‘आप’मुळे अकाली दल-भाजपाचा बचावाचा पवित्रा

Next

सुरेश भटेवरा,
नवी दिल्ली- पंजाब विधानसभेच्या आगामी निवडणुकीत तरूण पिढीला अमली पदार्थांच्या सेवनाने घातलेला विळखा आणि सतलज यमुना लिंक कालव्याचे पाणीवाटप हे दोन मुद्दे सर्वाधिक कळीचे ठरणार आहेत. नोटबंदीवरची जुगलबंदीही जोडीला आहेच. केजरीवालांचा ‘आप’ मैदानात उतरल्याने सर्व ११७ जागांवर लढणार आहेत. काँग्रेस व भाजपची थेट लढत असल्याने काँग्रेसची स्पेस हस्तगत करणे ही ‘आप’नीती आहे. भाजपसाठी ते सोयीचेच आहे, कारण अगोदरच क्षीण अवस्थेत असलेल्या काँग्रेसचा त्रिकोणी लढतीत अधिकाधिक शक्तिपात होईल, हा भाजपचा आडाखा आहे.
पंजाब १९६६ साली स्वतंत्र राज्य झाले, तेव्हापासून २0१२ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत अकाली दल व काँग्रेसमध्येच सरळ लढती झाल्या. २00७ आणि २0१२ चा अपवाद वगळला तर ५ वर्षांपेक्षा अधिक काळ एक पक्ष या राज्यात सत्तेवर राहू शकलेला नाही. पंजाबमध्ये भाजप-अकाली दलाची आघाडी आहे असली तरी भाजप लहान भावाच्या भूमिकेत आहे. शहरी भागात २३ जागांवर भाजप उमेदवार उभे करतो. भाजपला कमी जागा मिळाल्या, तर त्याचा थेट लाभ काँग्रेसला होतो हा इतिहास आहे.
मात्र लोकसभा निवडणुकीत पंजाबमधे ‘आप’ ला अचानक ४ जागा मिळाल्या. परंपरागत राजकारणाचे सारेच चित्र त्यामुळे बदलले. काँग्रेसतर्फे कॅप्टन अमरिंदरसिंग मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. निवडणुकीची सारी सूत्रेही त्यांच्याच हाती आहेत. अकाली दलापेक्षा २0१२ च्या निवडणुकीत काँग्रेसला १0 जागा कमी मिळाल्या आणि शहरी भागात भाजपला थेट १२ जागांचा लाभ झाला. त्यामुळे काँग्रेसला ४६ जागांवर समाधान मानावे लागले. लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला माफकच यश मिळाले.
अमृतसर मतदारसंघात मात्र अर्थमंत्री अरुण जेटलींचा कॅप्टन अमरिंदरसिंगांनी पराभव केला. सर्व अंदाजांना पूर्णविराम देत माजी क्रिकेटपटू खासदार नवज्योतसिंग सिध्दू यंदा काँग्रेसच्या तिकिटावर लढणार आहेत. काँग्रेससाठी ही नक्कीच जमेची बाजू आहे.
>‘आप’चे अस्तित्व पणाला
पंजाबमध्ये काँग्रेस बऱ्यापैकी मजबूत अवस्थेत आहे. मध्यंतरी ‘आप’ मधे जी फूट पडली त्यामुळे सुरूवातीला ‘आप’ च्या दिशेने झुकलेला जनमताच्या प्रतिसादाचा लंबक अचानक काँग्रेसच्या दिशेने वळल्याचे दिसू लागले.
तरीही केजरीवाल यांच्या सभांना प्रचंड गर्दी झाली. दिल्ली पॅटर्ननुसार ‘आप’ च्या स्वयंसेवकांनीही घरोघरी जात मतदारांच्या वारंवार भेटी घेतल्या. त्यामुळे स्पर्धेत ‘आप’चे स्थान बऱ्यापैकी मजबूत झाले.
विषय सर्जिकल स्ट्राइक्सचा असो की नोटबंदीचा, अकाली दल आणि भाजपच्या नेतृत्वावर सर्वाधिक कडवट हल्ले केजरीवालच चढवत आहेत. पंजाब व गोवाच्या निवडणुकीत ‘आप’ चे अस्तित्वच पणाला लागले आहे.
>अकालीचा ‘उडता पंजाब’
पंजाबची सत्ता १0 वर्षांपासून अकाली दल भाजप आघाडीच्या हाती आहे. सर्वात ज्येष्ठ व अनुभवी मुख्यमंत्री म्हणून प्रकाशसिंग बादल देशभर ओळखले जातात. त्यांचे सुपुत्र सुखबीरसिंग उपमुख्यमंत्री आहेत. सुखबीर यांच्या पत्नी हरसिमरत कौर केंद्रात मंत्री आहेत.
अमली पदार्थांचा विळख्यामुळे ‘उडता पंजाब’ स्थितीत पोहोचलेले राज्य, हा अकाली दल राजवटीला लागलेला सर्वांत मोठा कलंक. पंतप्रधानांच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातले वातावरण धुमसते आहे. भाजपच्या केंद्रीय नेत्यांचे फटकून वागणेही अकाली दलाला त्रासदायकच ठरले आहे.
१0 वर्षांच्या विविध आरोपांचा सामना करणारा अकाली दल व भाजपा बचावाच्या पवित्र्यात आहेत. दोघांची पीछेहाट झाल्याचे चित्र दिसते आहे. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता, सर्जिकल स्ट्राइक्स यांसारखे मुद्दे प्रचारात आणून या आघाडीने आपली पत सांभाळण्याचा प्रयत्न चालवला आहे.
>117जागांसाठी ४ फेब्रुवारी रोजी मतदान आहे. प्रारंभिक अंदाजानुसार यंदाची लढत काँग्रेस आणि‘आप’मधेच असून, सत्ताधारी आघाडी तिसऱ्या क्रमांकावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
>विद्यमान मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल(८९) बहुदा आयुष्यातल्या अखेरच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. तोच मुद्दा अकाली दल मांडू पाहत आहे.

Web Title: Congress in Punjab, 'AAP', Akali Dal-BJP posthumously saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.