CoronaVirus: मद्यप्रेमींसाठी खूशखबर! 'या' दोन राज्यांत आजपासून उघडली दारूची दुकानं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 17:07 IST2020-04-13T17:04:34+5:302020-04-13T17:07:27+5:30
अनेक राज्य सरकारं दारू विक्री सुरू करायची की नाही, यासंदर्भात विचारात पडली आहेत.

CoronaVirus: मद्यप्रेमींसाठी खूशखबर! 'या' दोन राज्यांत आजपासून उघडली दारूची दुकानं
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला असून, उद्या त्याचा शेवटचा दिवस आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊन वाढवायचा की काढायचा याचा निर्णय 130 कोटी देशवासीयांना सांगणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात सर्वच दुकानं बंद असल्यानं मद्यप्रेमींचा हिरमोड झाला आहे. अनेक राज्य सरकारं दारू विक्री सुरू करायची की नाही, यासंदर्भात विचारात पडली आहेत. हरियाणामध्ये लॉकडाऊन असूनही दारूविक्री सुरूच आहे. केरळमधील आत्महत्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या सल्ल्यानं दारू पिण्याचा सल्ला देण्यात आला होता. दारूच्या दुकानांतून सरकारला महसूलही मोठ्या प्रमाणात मिळतो.
दरम्यान, आसाम आणि मेघालय या दोन ईशान्यकडच्या राज्यांनी सोमवारपासून दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, आसामच्या उत्पादन शुल्क विभागाने सोमवारपासून दारूची दुकाने, गोडाऊन, बाटल्यांचे कारखाने, दारूभट्टी उघडण्यास परवानगी दिली आहे. या काळात बीअर बार पूर्णपणे बंद राहतील. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दारूची दुकानं उघडी राहतील. दुकानांमध्ये कमीत कमी कर्मचार्यांसह काम करण्याचे आणि बाटल्या किंवा रोख रक्कम घेताना ग्राहक व कर्मचार्यांना हाताला सॅनिटायझर लावावे किंवा हात स्वच्छ धुण्यास सांगण्यात आले आहे.
बाटल्यांचे कारखाने, दारूभट्टीवर दारू बनविणारे आणि डिस्टिलर यांना त्यांच्या ठरावीक कर्मचाऱ्यांबरोबरच फक्त 50 टक्के कामगारांच्या उपस्थितीत काम करावे लागेल. त्यांना आपल्या कर्मचार्यांना आवारात किंवा जवळपासच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी लागेल. लॉकडाउन सुरू झाल्यापासून देशी दारूचे अवैध उत्पादन व विक्री अनेक पटीने वाढल्याचे एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अधिकृत दुकाने उघडण्यास परवानगी न दिल्यास बेकायदेशीररीत्या मद्यपान करून लोकांचा मृत्यू ओढावण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे भारतासह जगाचा एक तृतीयांश भाग लॉकडाऊनमध्ये आहे. भारतात कोरोना संक्रमणाची संख्या नऊ हजारांच्या वर पोहोचली आहे.Assam: People line up outside a liquor shop in Dibrugarh as government permits sale of liquor between 10 AM & 5 PM during #CoronavirusLockdown. pic.twitter.com/d8HhAYJa5G
— ANI (@ANI) April 13, 2020
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 35 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9152 आहे. यापैकी 7987 पॉझिटिव्ह आहेत, तर 856 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे आणि आतापर्यंत 308 लोकांचा मृत्यू झाला आहे. आज नागालँडमध्ये कोरोना पॉझिटिव्हची पहिली घटना समोर आली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात 82, उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये 30, गुजरातमध्ये 22, मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये 22, कर्नाटकात 15, आंध्र प्रदेशात 12, राजस्थानमधील 11 आणि मुंबईतील धारावीत आज चार नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.