नव्या बिहार विधानसभेत १४३ आमदारांविरुद्ध फौजदारी गुन्हे
By admin | Published: November 10, 2015 10:45 PM2015-11-10T22:45:21+5:302015-11-10T22:45:21+5:30
नव्या २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेतील एकूण १४३ आमदारांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल आहेत आणि ९६ आमदार हत्या व अपहरण यासारख्या गंभीर फौजदारी गुन्ह्यांचा सामना करीत आहेत.
पाटणा : नव्या २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेतील एकूण १४३ आमदारांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल आहेत आणि ९६ आमदार हत्या व अपहरण यासारख्या गंभीर फौजदारी गुन्ह्यांचा सामना करीत आहेत.
गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल असलेल्या नवनिर्वाचित आमदारांमध्ये १२ आमदारांविरुद्ध हत्येचा आरोप, २६ आमदारांविरुद्ध हत्येचा प्रयत्न करण्याचा आरोप, ९ आमदारांविरुद्ध अपहरणाचा आरोप आणि १३ आमदारांविरुद्ध खंडणी वसुलीचा आरोप आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत ८० जागा जिंकून सर्वांत मोठा बनलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलात गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि फौजदारी गुन्हे दाखल असलेल्या आमदारांची संख्या सर्वाधिक म्हणजे ४९ आहे. त्याखालोखाल नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाचा क्रमांक लागतो. या पक्षाच्या ३७ नवनिर्वाचित आमदारांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल आहेत.
२४३ सदस्यीय विधानसभेसाठी ३४५० उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केल्यानंतर ही बाब उघड झाली. या ३४५० उमेदवारांपैकी १०३८ (३० टक्के) उमेदवारांनी आपल्याविरुद्ध दाखल असलेल्या फौजदारी गुन्ह्यांचा खुलासा केला, अशी माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस् (एडीआर) या संस्थेने दिली.
किमान ७९६ उमेदवारांनी (२३ टक्के) आपल्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, सांप्रदायिक दुफळी, अपहरण आणि महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांशी संबंधित गंभीर फौजदारी गुन्हे दाखल असल्याची घोषणा या प्रतिज्ञापत्रांद्वारे केली आहे. भाजपाने या निवडणुकीत १५७ उमेदवार उभे केले होते. त्यांपैकी ९५ उमेदवारांनी (६१ टक्के) आपल्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे, तर १०१ उमेदवार उभे करणाऱ्या संयुक्त जनता दलाच्या ५८ उमेदवारांनी (५७ टक्के) आपल्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल असल्याची कबुली दिली आहे. याशिवाय १०१ उमेदवार उभे करणाऱ्या राजदच्या ६१ (६० टक्के), ४१ उमेदवार उभे करणाऱ्या काँग्रेसच्या २३ (५६ टक्के) आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढलेल्या ११५० पैकी २५९ (२३ टक्के) उमेदवारांनी आपल्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल असल्याचे प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे.
गंभीर फौजदारी गुन्हे दाखल असलेल्या आमदारांमध्ये राजदच्या आमदारांची संख्या सर्वाधिक (३१) आहे, तर संयुक्त जनता दलाचे २४ उमेदवार अशा गुन्ह्यांचा सामना करीत आहेत. (वृत्तसंस्था)