सायबर हल्ल्याचा 150 देशातील 2 लाख संगणकांना फटका

By admin | Published: May 15, 2017 08:58 AM2017-05-15T08:58:10+5:302017-05-15T08:58:10+5:30

अजूनही हा धोका पूर्णपणे टळलेला नसून, सोमवारी सकाळी कामकाजाला सुरुवात केल्यानंतर संगणक हॅक होऊ शकतो.

Cyber ​​attacks hit 2 million computers in 150 countries | सायबर हल्ल्याचा 150 देशातील 2 लाख संगणकांना फटका

सायबर हल्ल्याचा 150 देशातील 2 लाख संगणकांना फटका

Next

 ऑनलाइन लोकमत 

लंडन, दि. 15 - आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला शुक्रवारी झाला. "रॅन्समवेअर" व्हायरसच्या सायबर हल्ल्याचा 150 देशातील जवळपास 2 लाख संगणकांना फटका बसला आहे. अजूनही हा धोका पूर्णपणे टळलेला नसून, सोमवारी सकाळी कामकाजाला सुरुवात केल्यानंतर संगणक हॅक होऊ शकतो असा इशारा युरोपियन पोलीस एजन्सीच्या प्रमुखांनी दिला आहे. 
 
युरोप, अमेरिकेला या सायबर हल्ल्याचा सर्वाधिक फटका बसला असला तरी, आशिया खंडात या सायबर हल्ल्याचा अजूनपर्यंत अंत्यत वाईट परिणाम दिसून आलेला नाही. सोमवारी सकाळी प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर या व्हायरसच्या व्याप्तीबद्दल अजून माहिती मिळेल एका सायबर सुरक्षा तज्ञांने सांगितले. भारतालाही या सायबर हल्ल्याचा काही प्रमाणात फटका बसला आहे. 
 
आणखी वाचा 
 
संगणक हॅकिंगमागे कोण आहे त्याचा तपासकर्ते शोध घेत आहेत. बँकिंग, आरोग्यसेवा आणि सरकारी यंत्रणांना या हॅकिंगचा फटका बसला आहे. इंग्लंडमधील "नॅशनल हेल्थ सर्विस"शी (एनएचएस) संबंधित संगणकांवर हा हल्ला झाल्यामुळे येथील संपूर्ण आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाली होती. 
 
"रॅन्समवेअर" म्हणजे नेमकं काय ?
एखाद्या दिवशी तुम्ही तुमचा संगणक किंवा लॅपटॉप चालू करायला जाता आणि त्यावर एक मेसेज तुम्हाला दिसतो कि तुमचा संगणक किंवा लॅपटॉप आम्ही हॅक केलेले असून तुमचा संपूर्ण डेटा तुम्हाला हवा असल्यास स्क्रिन वर दिसत असलेल्या पेमेंट ऑप्शन ला क्लिक करून अमुक इतकी रक्कम ह्या बँक खात्यात पुढील अमुक इतक्या तासात जर ही रक्कम जमा झाली नाही तर तुमचा सर्व डेटा डिलिट होईल. तुमच्या स्क्रीनवर एका बाजूला तुम्हाला दिलेल्या वेळेचे काउंट डाऊन सुद्धा चालू झालेले असते. अर्थात तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा संपूर्ण ताबा ह्या हॅकर्स ने घेतलेला असतो. ह्या मेसेजच्या पुढे तुमचा संगणक किंवा लॅपटॉप जातच नाही अर्थात तुमची ऑपरेटींग सिस्टम चालूच होत नाही. ह्या प्रकारच्या सायबर गुन्हेगारीला रॅन्समवेअर असे म्हणतात. ह्या मध्ये कुणीतरी सायबर गुन्हेगार अज्ञात ठिकाणाहून तुमचा संगणक किंवा लॅपटॉप हॅक करतो आणी तुम्हाला खंडणीची मागणी करतो. असे प्रकार जगात अनेक ठिकाणी उघडकीस आलेले आहेत .जगाच्या कुठल्या तरी कानाकोपर्‍यात बसून तुमचा डेटा नष्ट करण्याचे उद्योग हे ‘सायबर भामटे’ करायला लागले.
 
काय काळजी घ्यावी ?
१. सगळ्यात आधी तर तुमच्या संगणक किंवा लॅपटॉप मध्ये चांगला अ‍ॅण्टीव्हायरस असणे तसेच
अ‍ॅण्टीव्हायरस नियमित अपडेट असणे आवश्यक आहे.
२.इंटरनेट वापरताना नेहमी सुरक्षित वेबसाईटलाच भेट द्या. कुठल्याही मोफत भूलथापाना बळी पडुन चुकीच्या वेबसाईटला किंवा अनोळखी लिंकला क्लिक करू नका .
३. संगणक किंवा लॅपटॉपची ऑपरेटींग सिस्टमही नेहमी अपडेट असावी कारण अपडेट मध्ये बऱ्याच वेळा काही प्रॉब्लेम्स वर सोलुशन उपलब्ध असते . जसे कि "रॅन्समवेअर" साठी पॅच मायक्रोसॉफ्ट ने दोन महिन्यापूर्वीच जारी केला होता .
४. तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा नियमित डेटा कॉपी करून दुसऱ्या हार्ड डिस्कवर ठेवावा म्हणजे तुमचा संगणक हॅक झाला आणि तुमच्या डेटा च्या बदल्यात हॅकर ने तुम्हाला पैसे मागीतले तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही .
 स्मार्टफोन ला ही धोका
संगणकांप्रमाणे स्मार्टफोन ला ही हॅकिंग चा धोका वाढल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अनेक वेळा तुमच्या स्मार्टफोन वर काही जाहिराती दाखवल्या जातात त्यातील काही जाहिराती ह्या हॅकरने तुम्हाला भुलवण्यासाठी सुद्धा टाकल्या असू शकतात. त्यामुळे अशा जाहिरातीला क्लिक करू नये तसेच एखादे एप तुमच्या स्मार्टफोन वर इन्स्टाल करण्यापूर्वी ते सुरक्षित आहे की नाही हे पाहून घ्या . शक्यतो गुगल प्ले वरून एप इन्स्टाल करा . कुठलीही ए पी के फ़ाइल घेऊन तुमच्या स्मार्टफोन वर इंस्टाल करू नका . 
 
 एक वर्षांपूर्वी लोकमत ने दिला होता इशारा
सोमवार ६ जून २०१६ च्या अंकात लोकमतने ने "रॅन्समवेअर" ह्या व्हायरस च्या संभाव्य धोक्याविषयी आपल्या वाचकांना इशारा दिला होता तसेच "रॅन्समवेअर" ह्या व्हायरसचा प्रतिकार करण्यासाठी काय काळजी घ्यावी याविषयी सविस्तर माहिती दिली होती . "रॅन्समवेअर" च्या संभाव्य हल्ल्याचे भाकीत देखील लोकमतने केले होते . 
 

Web Title: Cyber ​​attacks hit 2 million computers in 150 countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.