'आप'चे अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया यांचा पराभव; आतिशी यांनी मात्र गड राखला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 13:59 IST2025-02-08T13:57:19+5:302025-02-08T13:59:15+5:30
Atishi Won, Kejriwal Sisodia Loss, Delhi Election Results 2025: आम आदमी पक्षाची दिल्ली निवडणुकीत दाणादाण उडाली. तब्बल २७ वर्षांनी भाजपा सत्तेत येणार आहे.

'आप'चे अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया यांचा पराभव; आतिशी यांनी मात्र गड राखला!
Atishi Won, Kejriwal Sisodia Loss, Delhi Election Results 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार या प्रश्नाचे उत्तर शनिवारी सर्व दिल्लीकरांना मिळाले. तब्बल २७ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर भाजपाने दिल्लीत आपला विजय नोंदवला. दुपारी १ वाजेपर्यंत हाती आलेल्या आकड्यांनुसार, भाजपा ४८ जागांवर आघाडीवर तर आम आदमी पक्ष (AAP) केवळ २२ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसले. यावरून दिल्लीत भाजपा बहुमतासह सरकार स्थापन करणार हे चित्र जवळपास निश्चित झाले. पण या निकालातील एक आश्चर्याची बाब म्हणजे, 'आप'चे दोन दिग्गज माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) हे दोघेही पराभूत झाले, पण मावळत्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना मात्र विजयी झाल्या. भाजपाची (BJP) विजयी लाट असूनही त्यांनी आपला गड राखला.
आतिशी विजयी, सिसोदिया-केजरीवाल पराभूत
आपचे दोन दिग्गज पराभूत झाले. भाजपाच्या प्रवेश साहिब सिंग वर्मा यांनी अरविंद केजरीवालांना ३,१८६ मतांनी पराभूत केले. तर मनीष सिसोदिया यांना जंगपुरा मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला. भाजपाचे तरविंदर सिंग मारवा यांनी ६०० हून जास्त मतांनी विजय मिळवला. पण दिल्लीच्या कालकाजी मतदारसंघातून लढणाऱ्या आपच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी मात्र विजय मिळवला. सलग दुसऱ्यांदा त्यांनी विधानसभा गाठली. या ठिकाणी काँग्रेसकडून अलका लांबा आणि भाजपाकडून रमेश बिधुरी अशी तिरंगी लढत होती. त्यात आतिशी यांनी सुमारे २५०० हून जास्त मतांनी बिधुरी यांचा पराभव केला. काँग्रेसच्या अलका लांबा यांनी ४००० मतांचा टप्पाही गाठता आला नाही.
दरम्यान, दिल्ली निकालावर (Delhi Election Results) अण्णा हजारे यांनी केजरीवालांना दारू घोटाळ्याने बुडविले, असे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच हजारेंनी केजरीवालांना स्वार्थी म्हटले होते. अरविंद केजरीवाल पूर्वी तो चांगला होता म्हणून माझ्यासोबत होता. मात्र ज्या दिवशी राजकारण आणि पार्टीच्या नादात अरविंद केजरीवाल स्वार्थी झाला, तेव्हाच त्याच्यापासून मी दूर झालो, या शब्दांत अण्णा हजारे यांनी निशाणा साधला होता. तेव्हा त्याची नियत साफ होती. तेव्हा मला वाटले की, हा एक चांगला कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी त्याला सोबत घेतले होते, असे हजारे म्हणाले होते.