२४८ कोटींच्या संपत्तीचे मालक मनजिंदर सिंग सिरसा बनले दिल्ली सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 14:03 IST2025-02-20T14:02:36+5:302025-02-20T14:03:09+5:30
Delhi CM Oath Ceremony : रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. रामलीला मैदानावर झालेल्या शपथविधी सोहळ्यात त्यांच्या मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

२४८ कोटींच्या संपत्तीचे मालक मनजिंदर सिंग सिरसा बनले दिल्ली सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
Delhi CM Oath Ceremony : नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरु झाल्या होत्या. यानंतर आज दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला. रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. रामलीला मैदानावर झालेल्या शपथविधी सोहळ्यात त्यांच्या मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
या मंत्र्यांमध्ये मनजिंदर सिंग सिरसा यांचाही समावेश आहे. मनजिंदर सिंग सिरसा हे मंत्री होण्यामागे अनेक राजकीय कारणे असल्याचे म्हटले जात आहे. मनजिंदर सिंग सिरसा यांनी राजौरी गार्डन विधानसभा मतदारसंघातून भाजपमधून पहिल्यांदाच दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकली आहे. मात्र, याआधी ते अकाली दलाच्या तिकिटावर दोनदा आमदारही राहिले आहेत.
याचबरोबर, मनजिंदर सिंग सिरसा हे २०१३ आणि २०१७ मध्ये दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षही होते. २०२१ मध्ये त्यांनी शिरोमणी अकाली दल सोडले आणि भाजपमध्ये सामील झाले. यानंतर, ऑगस्ट २०२३ मध्ये, त्यांची भाजपचे राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती झाली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनजिंदर सिंग सिरसा यांनी आम आदमी पक्षाच्या विद्यमान आमदार धनवती चंडेला यांचा १८,१९० मतांनी पराभव केला.
मनजिंदर सिंग सिरसा यांची संपत्ती किती?
मनजिंदर सिंग सिरसा यांच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाल्यास निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, मनजिंदर सिंग सिरसा यांची एकूण संपत्ती २४८.९ कोटी रुपये आहे. तसेच, त्यांचे शिक्षण फक्त बारावीपर्यंतच झाले आहे. परंतु राजकारणात त्यांची पकड खूप मजबूत मानली जाते.
भाजपने मंत्री का बनवले?
दरम्यान, मनजिंदर सिंग सिरसा यांना मंत्री करून भाजपने शीख समुदायाला आकर्षित करण्याची रणनीती आखली आहे. मनजिंदर सिंग सिरसा हे दिल्लीतील भाजपच्या प्रमुख शीख चेहऱ्यांपैकी एक आहेत. तसेच, शेतकरी आंदोलनानंतर पंजाबमध्ये भाजपची स्थिती कमकुवत झाली होती. अशा परिस्थितीत, २०२७ च्या पंजाब निवडणुका लक्षात घेऊन भाजपने मनजिंदर सिंग सिरसा यांना दिल्ली सरकारमध्ये मंत्री केले आहे, जेणेकरून शीख समुदायात भाजपला आपली पकड मजबूत करता येईल.