‘आपदा’ आता सहन करणार नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परिवर्तनाचा वादा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 14:41 IST2025-01-06T14:35:34+5:302025-01-06T14:41:10+5:30
दिल्लीसाठी ‘नमो भारत रेल्वे’सह विकास प्रकल्पांची दिली भेट

‘आपदा’ आता सहन करणार नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परिवर्तनाचा वादा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नववर्षातील रविवार दिल्लीकरांसाठी लाभदायी ठरला. पंतप्रधान मोदी यांनी ‘नमो भारत’ रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला. शिवाय, १२,२०० कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन, तसेच कोनशिलांचे अनावरण मोदी यांनी केले. यानंतर रोहिणीमध्ये जपानी पार्कमध्ये आयोजित परिवर्तन सभेत मार्गदर्शनही केले. दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीवर टीका करताना ‘आता ‘आपदा’ सहन करणार नाही, परिवर्तन घडवू’, अशी घोषणा मोदी यांनी केली. दिल्लीतील नमो भारत रेल्वेचा हा १३ किमी अंतराचा टप्पा पूर्ण झाला आहे. यावेळी मोदी यांनी साहिबाबाद ते न्यू अशोकनगरपर्यंत नमो भारत रेल्वेतून प्रवास केला.
पंतप्रधान म्हणाले...
- ‘आपदा’वाल्यांनी दिल्लीची १० वर्षे वाया घालवली. ज्यांना दिल्लीची काळजी नाही ते विकास करू शकत नाहीत.
- सुशासन राबवणारा पक्ष म्हणून दिल्लीचा भाजपवरच विश्वास आहे.
- २१ व्या शतकातील एक चतुर्थांश वर्षे सरली आहेत. आता आगामी २५ वर्षे दिल्लीच्या, भारताच्या भवितव्यासाठी महत्त्वाची.
- भारत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक महाशक्ती ठरेल तेव्हा विकसित भारताचा तो मोलाचा टप्पा ठरेल.
योजना सुरूच राहतील
भाजप सत्तेत आला तर दिल्लीत सध्या सुरू असलेल्या विविध कल्याणकारी योजना सुरूच राहतील, अशी हमी देत फक्त या योजनांच्या अंमलबजावणीतील लोक काढून तेथे प्रामाणिक लोकांची भरती केली जाईल, अशी हमी मोदी यांनी दिली.
सरकारच्या सहकार्याचे यश : केजरीवाल
पंतप्रधान मोदी यांनी ज्या योजना आणि विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले ते प्रकल्प दिल्लीतील ‘आप’ सरकार व केंद्र सरकारचा संयुक्त उपक्रम असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. ‘आप’च्या नेत्यांना तुरुंगात टाकले, अपमान केला तरीही आम्ही केवळ विकास आणि प्रशासनावर लक्ष केंद्रित केल्याचे ते म्हणाले.