पाच दिवसांवर होतं लग्न, पत्रिका वाटत होते वडील; रस्त्याच्या कडेला सापडला मुलीचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 16:08 IST2021-06-16T14:39:44+5:302021-06-16T16:08:02+5:30
मुलीच्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; हत्येप्रकरणी एकाला अटक

पाच दिवसांवर होतं लग्न, पत्रिका वाटत होते वडील; रस्त्याच्या कडेला सापडला मुलीचा मृतदेह
मुरादाबाद: उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मुरादाबादमध्ये वास्तव्यास असलेले मदनपाल सिंह त्यांच्या मुलीच्या विवाहाची तयारी करत होते. लग्नाला केवळ पाच दिवस राहिल्यानं पत्रिका वाटण्यासाठी त्यांची धावपळ सुरू होती. सकाळपासून पत्रिका वाटून दुपारी घरी परतणाऱ्या मदनपाल यांना रस्त्याच्या कडेला थोडी गर्दी दिसली. त्यांनी मोटारसायकल थांबवली. त्यावेळी त्यांना तिथे त्यांच्याच मुलीचा मृतदेह आढळून आला.
मदनपाल सिंह सकाळी सूरजगावात पत्रिका वाटण्यासाठी घरातून निघाले. त्यावेळी त्यांचं मुलगी मीनाक्षीसोबत बोलणं झालं. पाच दिवसांनंतर मीनाक्षीचा विवाह होता. याच लग्नासाठी मदनपाल यांची धावपळ सुरू होती. मदनपाल घरातून निघाल्यानंतर मीनाक्षीला तिचा होणारा पती जितिनचा फोन आला. त्यानं तिला शॉपिंगला बोलावलं. मात्र त्याचा हेतू चांगला नव्हता.
मीनाक्षीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी जितिनची कसून चौकशी केली. त्यात त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. जितिनला मीनाक्षीसोबत लग्न करायचं नव्हतं. त्यावरूनच दोघांमध्ये वाद झाला. संतापलेल्या जितिननं मीनाक्षीचा गळा दाबून खून केला. तिचा मृतदेह ठाकूरद्वार परिसरात मदनपाल यांना आढळून आला.
'मी जितिनसोबत मीनाक्षीचं लग्न ठरवलं होतं. ते एकमेकांना ओळखायचे. ६ जूनला त्यांनी प्री-वेडिंग केलं. त्यावेळी आम्ही जितिनला गिफ्टदेखील दिलं. मात्र जितिनचं कुटुंब खूष नव्हतं. त्यांना आमच्याकडून आणखी पैसे हवे होते. लग्न पुढे ढकलू असं जितिन सांगत होता. मात्र सगळी तयारी झाली असल्यानं, नातेवाईकांना पत्रिका वाटून झाल्यानं ते शक्य नव्हतं,' असं मदनपाल यांनी सांगितलं.