पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 05:37 PM2024-10-15T17:37:18+5:302024-10-15T17:38:05+5:30

ECI chief Rajiv Kumar : ईव्हीएमबाबत आमच्याकडे आलेल्या सर्व तक्रारींना आम्ही उत्तर देऊ आणि त्या प्रसिद्धही करू, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले.

EVMs can't be hacked like pagers used for blasts: ECI chief Rajiv Kumar issues clarification | पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...

पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने मंगळवारी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. यासोबतच ईव्हीएमसंदर्भात निवडणूक आयोगाने भाष्य केले आहे. ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित आहे, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. दरम्यान, इस्रायल जर लेबनॉनमध्ये स्फोट घडवून आणण्यासाठी हिजबुल्ला पेजर हॅक करू शकतो, तर ईव्हीएम हॅक करता येणार नाही का? असा सवाल विचारण्यात आला होता. त्यावर राजीव कुमार म्हणाले, पेजर कनेक्टेड असतो. ईव्हीएम नाही. ईव्हीएमशी संबंधित प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत.  

ईव्हीएमबाबत आमच्याकडे आलेल्या सर्व तक्रारींना आम्ही उत्तर देऊ आणि त्या प्रसिद्धही करू, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले. राजीव कुमार म्हणाले, आम्ही ईव्हीएमवरील सर्व २० तक्रारींना व्यक्तिगतपणे वस्तुस्थितीनुसार उत्तर देऊ. ईव्हीएमची संपूर्ण यंत्रणा सुरक्षित असल्याचे ते म्हणाले. तसेच, प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्षांचे एजंट हजर असतात. ईव्हीएममध्ये बॅटरी टाकल्यावर त्यावर एजंटची सहीही असते. मतदानाच्या ५ ते ६ दिवस आधी चिन्ह लावली जातात. मशीन तसेच बॅटरीवरही एजंटची सही असते आणि ती सील केलेली असते, असे राजीव कुमार यांनी सांगितले.

"ईव्हीएमशी छेडछाड करणे शक्य नाही" 
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, ईव्हीएमशी छेडछाड शक्य नाही. ते म्हणाले, 'ईव्हीएमबाबत यापूर्वीही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. हॅकिंग होऊ शकतं, इथलं मतदान तिकडे जाऊ शकतं, असे आधी म्हटले जात होते. मात्र, आता पुढे काय म्हटले जाणार, याचाही विचार आम्ही करत आहोत, असेही मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले.

महाराष्ट्र-झारखंडमधील निवडणुकांची घोषणा 
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही एकाच टप्प्यात होणार आहे. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. तर झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. झारखंडमध्ये १३ नोव्हेंबरला पहिला टप्पा आणि २० नोव्हेंबरला निवडणुकांचा दुसरा टप्पा पार पडेल. तसेच, २३ नोव्हेंबरला झारखंडमध्ये मतमोजणी केली जाणार आहे.

Web Title: EVMs can't be hacked like pagers used for blasts: ECI chief Rajiv Kumar issues clarification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.