लष्करात चार वर्षांची नाेकरी, ४० हजार वेतन; अग्निपथ योजनेची घोषणा; सैनिकांप्रमाणे लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 05:46 AM2022-06-15T05:46:40+5:302022-06-15T05:46:57+5:30
केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची घोषणा केली.
![Four years in the army 40000 salary Announcement of Agneepath scheme Benefit like soldiers | लष्करात चार वर्षांची नाेकरी, ४० हजार वेतन; अग्निपथ योजनेची घोषणा; सैनिकांप्रमाणे लाभ Four years in the army 40000 salary Announcement of Agneepath scheme Benefit like soldiers | लष्करात चार वर्षांची नाेकरी, ४० हजार वेतन; अग्निपथ योजनेची घोषणा; सैनिकांप्रमाणे लाभ](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/new-project-2022-06-15t054633.764_202206836111.jpg)
लष्करात चार वर्षांची नाेकरी, ४० हजार वेतन; अग्निपथ योजनेची घोषणा; सैनिकांप्रमाणे लाभ
नवी दिल्ली :
केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची घोषणा केली. वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. त्यांना अग्निवीर संबोधण्यात येणार आहे. त्यांना चार वर्षे लष्करात सेवा करता येईल. सुरक्षा विषयाच्या मंत्रिमंडळ समितीच्या (सीसीएस) बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नौदलाचे प्रमुख एडमिरल आर. हरीकुमार म्हणाले की, या योजनेमुळे सशस्त्र दलाची ताकद वाढेल. या योजनेची घोषणा तिन्ही दलांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. पूर्ण देशात भरती आयोजित करण्यात येणार आहे.
काय आहेत 'अग्निपथ'ची वैशिष्ट्ये?
>> ४६,००० सैनिकांची यावर्षी तीनही दलात भरती
>> ४४ लाख रुपये सेवेत असताना विकलांग झाल्यास देणार, याशिवाय शिल्लक नोकरीचे वेतनही दिले जाईल.
>> ११.७१ लाख रुपये प्रत्येक अग्निवीराला मिळणार
>> २५% अग्निविरांना मेरिटच्या आधारावर नियमित कॅडरमध्ये समाविष्ट करणार
वेतन किती?
पहिले वर्ष >> ₹३०,०००
दुसरे वर्ष >> ₹३३,०००
तिसरे वर्ष >> ₹३६,५००
चौथे वर्ष >> ₹४०,०००
कुणाला मिळू शकेल लाभ?
>> १७.५ ते २१ वर्षांचे तरुण पहिली भरती रॅली ९० दिवसात दहावी, बारावी उत्तीर्ण आवश्यक
सैन्यदलात दहा वर्षांसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशननुसार तरुणांची भरती करण्यात येते. हा काळ १४ वर्षांपर्यंत वाढविला जाऊ शकतो. वेतन व पेन्शन खर्च घटवण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे.
अग्निपथ योजनेचा उद्देश सशस्त्र दलातील भरतीमध्ये परिवर्तन आणणे, हा आहे. या योजनेमुळे सैन्यात युवा ताकद आणि अनुभव यांचे संतुलन राखण्यास मदत होईल. सैनिकांची भरती चार वर्षांसाठी होईल. मात्र, त्यातील काही जणांना सेवेत ठेवले जाईल.
- जनरल मनोज पांडे, सैन्य दलाचे प्रमुख
या माध्यमातून भारतीय तरुणांना सशस्त्र दलांमध्ये अग्निवीर म्हणून सेवा देण्याची संधी मिळणार आहे. हा एक क्रांतिकारी उपक्रम आहे. सशस्त्र दलाला या माध्यमातून युवा चेहरा मिळणार आहे.
- राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री