लाच प्रकरणावरून केरळमध्ये ‘घमासान’
By admin | Published: November 10, 2015 11:02 PM2015-11-10T23:02:24+5:302015-11-10T23:02:24+5:30
केरळमध्ये बार परवान्यांच्या नूतनीकरणासाठी एक कोटी रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले केरळ काँग्रेसचे (एम) नेते अर्थ आणि कायदामंत्री
नवी दिल्ली/ कोट्टयम : केरळमध्ये बार परवान्यांच्या नूतनीकरणासाठी एक कोटी रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले केरळ काँग्रेसचे (एम) नेते अर्थ आणि कायदामंत्री के.एम.मणी यांनी मंगळवारी रात्री राजीनाम्याची घोषणा केली. त्यांनी मुख्यमंत्री ओमन चंडी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्याचे आणि काँग्रेसप्रणित युडीएफ सरकारला समर्थन कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. या सरकारमध्ये मणी यांचा पक्ष मुख्य घटक आहे.
८२ वर्षीय मणी यांनी राजीनाम्याची घोषणा करण्यापूर्वी केरळ काँग्रेसच्या (एम) सुकाणू समितीच्या बैठकीत राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर मणी यांनी ज्येष्ठ नेते पी. जे. जोसेफ यांच्यासोबत बंदद्वार चर्चा केली.
तत्पूर्वी केरळ काँग्रेसचे (एम) बंडखोर नेते पीसी जॉर्ज यांनी मंगळवारी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा करीत हिंमत असेल तर मणी यांनीही राजीनामा द्यावा असे थेट आव्हान दिल्यानंतर काँग्रेसने बचावात्मक पवित्रा अवलंबला होता, मात्र अखेर मणी यांनी राजीनामा देत तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला.
केरळ उच्च न्यायालयाने या प्रकरणी तपास सुरू ठेवण्याचा आदेश दिल्याच्या पार्श्वभूमीवर मणी यांच्या राजीनाम्याची जोर धरू लागली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
त्यानंतर लगेच दक्षता विभागाने शहानिशा करीत एफआयआर नोंदविला होता. केरळ उच्च न्यायालयाने सोमवारी या प्रकरणी तपास चालू ठेवण्याचा आदेश दिल्यानंतर मणी यांच्या राजीनाम्याच्या मागणीने पुन्हा डोके वर काढले होते.मणी यांनी भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची विक्री करणाऱ्या ४०० पेक्षा जास्त बारमालकांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी एक कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केरळ राज्य बार हॉटेल मालक संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष बिजू रमेश यांनी गेल्या वर्षी केला होता.
आमदार पीसी जॉर्ज यांनी १२ नोव्हेंबर रोजी विधानसभाध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा सोपविणार असल्याचे स्पष्ट केले. मणी यांनी यापूर्वीच राजीनामा देण्यास नकार दिला असताना जॉर्ज यांनी अचानक वादात उडी घेत त्यांना थेट आव्हान दिल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला.