"नितीश कुमार आणि नवीन पटनायक यांना भारतरत्न द्या", भाजप खासदाराची मोदी सरकारकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 20:45 IST2024-12-25T17:21:13+5:302024-12-25T20:45:28+5:30
२०२५ मध्ये होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास गिरिराज सिंह यांनी व्यक्त केला.

"नितीश कुमार आणि नवीन पटनायक यांना भारतरत्न द्या", भाजप खासदाराची मोदी सरकारकडे मागणी
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, ही मागणी भाजप नेते आणि बेगुसराय मतदारसंघाचे खासदार गिरिराज सिंह यांनी केली आहे. नितीश कुमार आणि माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना भारतरत्न देण्यात यावे, असे म्हणत गिरीराज यांनी म्हटले आहे.
२०२५ मध्ये होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास गिरिराज सिंह यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, "कोणीही संभ्रमात राहू नये. लालूजी सर्वतोपरी प्रयत्न करतील पण बिहार विधानसभेच्या निवडणुका नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली होतील आणि बिहारमध्ये पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन होईल. नितीश कुमार इतके दिवस मुख्यमंत्री राहिले आहेत. आज तीस वर्षांच्या मुलांनी लालूजींचे जंगलराज पाहिलेले नाही."
दरम्यान, यापूर्वी नितीश यांचा पक्ष जनता दलानेही (युनायटेड) एनडीए आघाडी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली आगामी बिहार विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. जेडीयूचे खासदार राजीव रंजन सिंह उर्फ लालन सिंह आणि पक्षाचे कार्याध्यक्ष संजय झा यांनी सांगितले की, त्यांचा पक्ष एनडीएच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि तसाच राहील.
दुसरीकडे, भाजप नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी देखील म्हटले आहे की, एनडीए (NDA) पुढील वर्षी बिहार विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढवेल. नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए काम करत असून या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत राहणार असल्याचे सम्राट चौधरी यांनी म्हटले आहे. दरम्यान, 2025 च्या अखेरीस बिहारमध्ये 243 विधानसभा जागांसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे.