हातमाग व्यवसायास मिळणार चालना!
By admin | Published: August 5, 2015 10:38 PM2015-08-05T22:38:11+5:302015-08-05T22:38:11+5:30
देशात ४३ लाखांपेक्षा अधिक असलेल्या हातमाग व्यावसायिकांना चालना देण्यासाठी दरवर्षी आॅगस्ट महिन्याच्या ७ तारखेला ‘राष्ट्रीय हातमाग दिवस’ म्हणून साजरा
राम देशपांडे, अकोला
देशात ४३ लाखांपेक्षा अधिक असलेल्या हातमाग व्यावसायिकांना चालना देण्यासाठी दरवर्षी आॅगस्ट महिन्याच्या ७ तारखेला ‘राष्ट्रीय हातमाग दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. तसेच या विशेष दिनी दरवर्षी देशातील उत्कृष्ट हातमाग व्यावसायिकांना संत कबीर व राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
भारतीय बाजारपेठेत विविध ब्रांडेड कंपन्यांद्वारा निर्मित हातमाग वस्त्रांचा बोलबाला असला तरी, भारतीय विणकरांनी खास स्वत:च्या हाताने विणलेल्या हातमाग वस्त्रांनादेखील तेवढीच, नव्हे त्यापेक्षा अधिक मागणी आहे. स्त्री-पुरुषांना परिधान करण्यासाठी लागणारे वस्त्र, विविध प्रकारच्या कॉटन आणि सिल्कच्या साड्या, शेले, मफलर, धोती, टॉवेल, गालिचे, चादरी, सतरंज्या, ब्लँकेट, चटया तसेच विणकाम करून तयार केलेल्या सजावटीच्या वस्तू अशा विविध प्रकारच्या वस्त्रांचा अंतर्भाव हातमाग या संज्ञेअंतर्गत होतो. देशातील बहुतांश हातमाग व्यावसायिक हे ग्रामीण भागात काम करीत असून, गरिबीच्या रेषेखाली जीवन जगत आहेत. कष्टकरी हातांनी तयार केलेल्या या वस्तूंना भारतीय बाजारपेठेप्रमाणेच इतर देशातील बाजारपेठांमध्येदेखील मागणी वाढत आहे. हातमाग व्यवसाय चालविणाऱ्या या कष्टकऱ्यांनी देशाला एक वेगळी ओळख दिली आहे. दिवस-रात्र एक करून कष्ट करणाऱ्या या अनंत हातांना चालना मिळावी, त्यांना प्रोत्साहन मिळावे, याकरिता दरवर्षी ७ आॅगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय हातमाग दिवस’ म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. दरवर्षी या विशेष दिनी देशातील सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या हातांना संत कबीर तथा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.