Hathras Stampede : "आम्ही कोणताही चमत्कार पाहिला नाही..."; शेजाऱ्यांनी केली भोले बाबांची पोलखोल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 08:45 AM2024-07-05T08:45:26+5:302024-07-05T09:01:49+5:30
Hathras Stampede : भोले बाबांच्या सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान आता भोले बाबांसंदर्भात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
![hathras stampede bhole baba neighbor reveals people helping with donations and his followers increase | Hathras Stampede : "आम्ही कोणताही चमत्कार पाहिला नाही..."; शेजाऱ्यांनी केली भोले बाबांची पोलखोल hathras stampede bhole baba neighbor reveals people helping with donations and his followers increase | Hathras Stampede : "आम्ही कोणताही चमत्कार पाहिला नाही..."; शेजाऱ्यांनी केली भोले बाबांची पोलखोल](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/bhole-baba4_2024071260508.jpg)
Hathras Stampede : "आम्ही कोणताही चमत्कार पाहिला नाही..."; शेजाऱ्यांनी केली भोले बाबांची पोलखोल
हाथरसमध्ये भोले बाबांच्या सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान आता भोले बाबांसंदर्भात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. नारायण साकार हरी यांनी नोकरी गेल्यानंतर सत्संगाला सुरुवात केली. सत्संगाला येणाऱ्या महिलांच्या समस्या ऐकून घेतल्या. पैशाची गरज सांगितल्यावर सत्संगाला आलेल्या भाविकांकडून देणगी दिली जायची. त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास वाढला आणि अनुयायी वाढले.
शेजारी राहणाऱ्या जगदीश चंद्र यांनी सांगितलं की, २५ वर्षांपूर्वी नारायण साकार हरी यांनी त्यांच्या केदार नगर येथील निवासस्थानी सत्संग करायला सुरुवात केली. सुरुवातीला आजूबाजूच्या भागातील महिला यायच्या. देणग्या गोळा करून आणि मदत करून त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपला प्रभाव निर्माण केला. दूर वरूनही अनुयायी येऊ लागले.
नारायण साकार हरी यांचे शेजारी साबीर चौधरी यांनी सांगितलं की, ३० वर्षांपूर्वीपर्यंत ते सामान्य माणसाप्रमाणे जगत होते. २००० नंतर भोले बाबा येथे आलेले नाहीत. येथे दर्शनासाठी दूरदूरवरून अनुयायी येतात. पहाटे ४ वाजल्यापासूनच गर्दी जमू लागते. गगन आणि विकी या परिसरातील नागरिकांनी सांगितले की, आम्हाला कोणताही चमत्कार दिसला नाही, मात्र दर मंगळवारी येथे गर्दी जास्त असते.
साबीर चौधरी सांगतात की, बाबांनी त्यांच्या एका नातेवाईकांची मुलगी स्नेहलता हिला दत्तक घेतलं होतं. २४ वर्षांपूर्वी तिचा मृत्यू झाल्यानंतर दोन दिवस मृतदेह येथे ठेवण्यात आला होता. भक्तांनी घोषणाबाजी करत बाबांना मुलीला पुन्हा जिवंत करण्यास सांगितलं. नंतर बाबांनी मृतदेह नेला, तिथे त्यांनी तिला जिवंत करण्यासाठी जप सुरू केला, हजारोंचा जमाव जमला होता.
जयपूर हायवेवर अभुआपुरा येथे नारायण साकार विश्व हरी चॅरिटेबल ट्रस्टचा आश्रम आहे. गेल्या वर्षीच त्याची खरेदी करण्यात आली होती. आश्रमाच्या गेटवर दररोज दर्शनासाठी अनुयायी येत असतात. २०१९ मध्ये, किरावलीच्या नागला भरंगरपूर विधापूर गावात भोले बाबांचा सत्संग १५ दिवस होता. सत्संग ऐकण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येत असत.
हाथरसमधील सिकंदरराव येथे झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ भाविकांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी १०६ हे यूपीच्या १७ जिल्ह्यांचे रहिवासी आहेत, तर सहा देशांच्या विविध राज्यातील रहिवासी आहेत. उर्वरितांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या सर्वांना राज्य आणि केंद्र सरकार मिळून भरपाई देणार आहे. या अपघातात ३८ जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. सीएम योगी यांनी बुधवारी हाथरस जिल्हा रुग्णालयात जखमींची प्रकृती जाणून घेतली.