शपथविधी सोहळ्याआधीच कुमारस्वामींना मनस्ताप, हिंदू महासभेची सर्वोच्च न्यायालयात धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 09:48 IST2018-05-22T09:48:06+5:302018-05-22T09:48:06+5:30
हिंदू महासभेनं कर्नाटकातील एचडी कुमारस्वामी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. हिंदू महासभेनं एचडी कुमारस्वामी यांचा होऊ घातलेला शपथविधी सोहळा हा संविधानाला धरून नाही, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

शपथविधी सोहळ्याआधीच कुमारस्वामींना मनस्ताप, हिंदू महासभेची सर्वोच्च न्यायालयात धाव
नवी दिल्ली- हिंदू महासभेनं कर्नाटकातील एचडी कुमारस्वामी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. हिंदू महासभेनं एचडी कुमारस्वामी यांचा होऊ घातलेला शपथविधी सोहळा हा संविधानाला धरून नाही, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यामुळे कुमारस्वामींच्या शपथविधी सोहळ्यातील अडचणी वाढल्या आहेत.
कालच लिंगायत नेत्याला उपमुख्यमंत्रिपद द्या, अशा आशयाचं पत्र अखिल भारतीय वीरशैव महासभेनं कुमारस्वामींना लिहिलं होतं. त्यामुळे नवा वादाला तोंड फुटलं असतानाच आता हिंदू महासभेच्या याचिकेमुळे कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यातील अडचणींमध्ये भर पडली आहे.
Hindu Mahasabha has filed a petition before the Supreme Court challenging the oath taking ceremony and appointment of H D Kumarswamy as the Karnataka Chief Minister,stating it is unconstitutional.
— ANI (@ANI) May 22, 2018
बुधवारी (23 मे) रोजी कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. कर्नाटकात एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारच्या सत्तावाटपाचा फॉर्म्युला जवळपास तयार झाला असून, त्यानुसार जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे 13 मंत्री व काँग्रेसचे 20 मंत्री बुधवारी शपथ घेतील, हे निश्चित मानले जात आहे. शपथविधीनंतर आपण 24 तासांतच बहुमत सिद्ध करू, असा दावा कुमारस्वामी यांनी केला आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी 15 दिवसांचा अवधी दिला आहे. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष जी. परमेश्वर यांना उपमुख्यमंत्रिपद मिळणे नक्की आहे. तसेच काँग्रेस फोडण्याची येडियुरप्पांची खेळी उधळून लावणारे डी. के. शिवकुमार यांचेही मंत्रिमंडळातील स्थान नक्की आहे. कुमारस्वामींच्या पक्षाकडे वित्त खाते, तर काँग्रेसकडे गृह खाते राहील, असे सध्याचे चित्र आहे. हीच दोन अतिशय महत्त्वाची खाती मानली जातात. काँग्रेसकडून अधिकाधिक लिंगायत आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असा अंदाज आहे. येडियुरप्पा यांचे भविष्यातील डाव यशस्वी होऊ नयेत, यासाठीच हे केले जाईल .बसपा, एक अपक्ष व एक मुस्लीम आमदारही सरकारमध्ये असेल.
सरकार चालवणे, ही आमची जबाबदारी
काँग्रेसच काही काळाने हे सरकार पाडेल, असे भाजपा नेते सांगत आहेत. पण सरकारने आपला काळ पूर्ण करावा, असे आमचे प्रयत्न राहतील, असे सांगून काँग्रेस नेता म्हणाला की, सध्या भाजपाविरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी राहुल गांधी प्रयत्नशील आहेत. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुकाही आहेत. यामुळे सरकार पाडण्याचे प्रयत्न वा सरकार पडेल, अशी कृती काँग्रेसकडून होणार नाही.
अडीच वर्षांचा फॉर्म्युला नाहीच : कुमारस्वामी
मुख्यमंत्रीपद अडीच वर्षे कुमारस्वामी यांच्याकडे राहील आणि नंतर ते काँग्रेसकडे जाईल, अशा बातम्या शनिवारपासून पसरल्या होत्या. पण तसे घडणार नाही आणि आपणच पूर्ण काळ मुख्यमंत्री राहू, असे कुमारस्वामी यांनी व काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले.