'भगवंत मान मुख्यमंत्री आहेत की पायलट', त्यांचे एकच काम, केजरीवालांना देशात फिरवायचे: अमित शहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 18:57 IST2023-06-18T18:57:20+5:302023-06-18T18:57:48+5:30
"मोदी सरकार देशाला अंमली पदार्थांपासून मुक्त करण्यासाठी आणि पंजाबमधून अंमली पदार्थांचा व्यापार उखडून टाकण्यासाठी काम करत आहे"

'भगवंत मान मुख्यमंत्री आहेत की पायलट', त्यांचे एकच काम, केजरीवालांना देशात फिरवायचे: अमित शहा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना टोला लगावला. केंद्रातील मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंजाबमधील गुरुदासपूर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना गृहमंत्री शाह बोलत होते. यावेळी शहा म्हणाले की, भगवंत मान यांच्याकडे अरविंद केजरीवाल यांच्यासाठी वेळ आहे, पण त्यांच्याकडे पंजाबच्या लोकांसाठी वेळ नाही. केजरीवाल यांना देशाचे दौरे करणे हेच भगवंत मान यांचे काम आहे. कधी कधी भगवंत मान हे मुख्यमंत्री आहेत की पायलट हे समजत नाही, असा टोलाही शहा यांनी लगावला.
शहा म्हणाले की, पंजाबमधील लोकांना असुरक्षित वाटत आहे. त्यांचे मुख्यमंत्री भगवंत मान संपूर्ण वेळ दौऱ्यांवर जातात, त्यामुळे पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिकट झाली आहे. इथे लोक सुरक्षित नाहीत, अंमली पदार्थांचा धंदा वाढत आहे, शेतकऱ्यांच्या समस्या वाढत आहेत, पण मुख्यमंत्र्यांना यासाठी वेळ नाही. आम आदमी पक्षासारखा पोकळ आश्वासने देणारा दुसरा पक्ष नाही.
'आप'वर हल्ला चढवत शहा म्हणाले की, आम आदमी पार्टी महिलांना एक हजार रुपये देणार होती, त्या आश्वासनाचे काय झाले? आतापर्यंत महिला वाट पाहत असून, त्यांना एक हजार रुपये मिळण्यापासून एक हजार पैसेही मिळालेले नाहीत. पंजाब सरकार पंजाबमध्ये जाहिराती देते हे समजण्यासारखे आहे, पण पंजाबच्या जाहिराती केरळ, बंगाल आणि गुजरातमध्ये दिसतात. त्यामुळे पंजाबमधील जनतेची तिजोरी रिकामी होत आहे, त्याचा हिशोब जनता नक्कीच घेईल.
पंजाबमधून अमली पदार्थांचा व्यापार उखडून टाकण्याचे काम मोदी सरकार करत असल्याचे ते म्हणाले. अमृतसरमध्ये अमृतसरमध्ये महिन्याभरात एनसीबीचे कार्यालय सुरू करण्यात येणार असून थोड्याच कालावधीत भाजपचे कार्यकर्ते प्रत्येक गावात जाऊन अंमली पदार्थांविरोधात जनजागृतीचा प्रवास सुरू करणार आहेत.