भाजपने महाराष्ट्र अन् दिल्लीची निवडणूक कशी जिंकली? ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप; म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 15:35 IST2025-02-27T15:35:31+5:302025-02-27T15:35:43+5:30
Mamata Banerjee: पुढील वर्षी पश्चिम बंगालच्या निवडणुका होत आहेत, यासाठी भाजप आणि तृणमूलने आतापासून तयारी सुरू केली आहे.

भाजपने महाराष्ट्र अन् दिल्लीची निवडणूक कशी जिंकली? ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप; म्हणाल्या...
Mamata Banerjee: हरयाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीची सत्ता काबीज केल्यानंतर आता भाजपने पश्चिम बंगालकडे आपला मोर्चा वळवल आहे. पुढील वर्षी बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी भाजपने स्थानिक पातळीवर पक्ष संघटना मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, भाजपसोबत तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील अॅक्टिव्ह मोडमध्ये आल्या आहेत. त्यांनी गुरुवारी (27 फेब्रुवारी) कोलकाता येथील नेताजी स्टेडियमवर सर्व खासदार आणि आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी दिल्ली आणि महाराष्ट्रात भाजपच्या विजयासाठी निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीला जबाबदार धरले.
बनावट मतदारांची नावे...
ममता बॅनर्जी म्हणाल्या, भाजपने हरियाणा आणि गुजरातमधील लोकांची बनावट मते बनवून दिल्ली आणि महाराष्ट्रात निवडणुका जिंकल्या. मतदार यादीतून बनावट मतदारांची नावे वगळण्याच्या मागणीसाठी आवश्यकता भासल्यास निवडणूक आयोग कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू, अशी घोषणा त्यांनी कार्यकर्त्यांसमोर केली.
ECI नियुक्तीवर टीका
या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती केल्यानंतर भाजप निवडणूक आयोगावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. निवडणूक आयोग निःपक्षपाती असल्याशिवाय मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका होऊ शकत नाहीत, असे त्या म्हणाल्या.
अभिषेक बॅनर्जी यांनी मतभेद नाकारले
या बैठकीत टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी कोणतेही मतभेद नसल्याचे सांगितले. मी तृणमूल काँग्रेसचा निष्ठावान सैनिक असून, माझ्या नेत्या ममता बॅनर्जी असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षात सामील होण्याच्या अटकळांना फेटाळून लावत अभिषेक म्हणाले, मी भाजपमध्ये सामील होत आहे, या सर्व अफवा आहेत.