परिवारातील आग कशी विझवायची? भाजप आणि संघातील वादाचा नवा अध्याय संपता संपेना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 11:09 AM2024-07-25T11:09:05+5:302024-07-25T13:14:20+5:30

BJP Vs RSS: भाजपला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नाही, असे नड्डा बोललेले, तेवढ्यावरच हे थांबलेले नाही... संघपरिवाराला मतभेद नवीन नाहीत; पण यंदा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सुरू झालेला वादाचा अध्याय अद्याप संपलेला नाही.

How to extinguish the fire in the family? The new chapter of controversy between BJP and RSS Sangh is never ending | परिवारातील आग कशी विझवायची? भाजप आणि संघातील वादाचा नवा अध्याय संपता संपेना

परिवारातील आग कशी विझवायची? भाजप आणि संघातील वादाचा नवा अध्याय संपता संपेना

- हरीष गुप्ता,

नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

यंदाच्या मे महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि त्याला पितृस्थानी असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सुरू झालेला वादाचा अध्याय अद्याप संपलेला नाही. संघपरिवाराला असे मतभेद नवीन नाहीत. यापूर्वी वसंतराव ओक, बलराज मधोक, लालकृष्ण अडवाणी इतकेच नव्हे, तर अटलबिहारी वाजपेयी यांच्यावरूनही मतभेद झालेले होते; परंतु त्यावेळी हिंदी सिनेमाचा शेवट जसा गोड होतो तसे ते वाद मिटले आणि अर्थातच संघाची त्यात सरशी झाली होती; परंतु यावेळी भाजपचे अध्यक्ष जयप्रकाश नड्डा १८ मे २०२४ रोजी काहीसे अकल्पनीय बोलले.

लोकसभा निवडणुका रंगात आलेल्या असताना ते म्हणाले होते, 'भाजपला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नाही. कारण आता पक्ष मोठा झाला असून, आपला कारभार पाहू शकतो.' एवढ्यावर ते थांबले नव्हते. 'प्रत्येकाला त्याची त्याची कर्तव्ये आणि भूमिका आहेत. संघ ही सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना असून, भाजप राजकीय संघटन आहे. हा प्रश्न गरजेचा नाही. नड्डा यांच्या उद्‌गारांमुळे राजकीय निरीक्षकांना धक्का बसला. परिवारातही प्रतिक्रिया उमटली; परंतु उघडपणे कोणी बोलायला तयार नव्हते; मात्र लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजप नेतृत्वाला धक्का देणारा लागला. ३०३ वरून पक्षाचे संख्याबळ २४० वर आले. पक्षाने बहुमत गमावले. एनडीएला मात्र बहुमत मिळाले.

भाजपचे नेतृत्व सुधारणा करून घेईल असे वाटले होते; परंतु तसे काहीच घडले नाही. शेवटी सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांजराच्या गळ्यात दोन महिन्यांनंतर का होईना घंटा बांधायचे ठरवले. १८ जुलैला रांचीत त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात सांगितले, 'स्वयंविकास करत असताना एखाद्या व्यक्तीला सुपरमॅन किंवा परमेश्वर आणि नंतर विश्वरूप व्हावे, असे वाटत असते. भागवत यांनी कोणाचे नाव घेतले नाही; परंतु ते कोणाला उद्देशून बोलत होते ते सगळ्यांनाच कळले.

सुरेश सोनी यांचे महत्त्व
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन दिवस चालणाऱ्या वार्षिक समन्वय समितीची बैठक ३१ ऑगस्टला केरळमध्ये सुरू होत असून, सर्वांच्या नजरा आता या बैठकीकडे लागल्या आहेत. भाजपसह संघाच्या सर्व ३६ संघटनांच्या कामगिरीचा आढावा या बैठकीत घेतला जाईल. नड्डा आणि काही ज्येष्ठ मंत्री केरळमध्ये होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याने संघ आणि भाजपतील धुमसणाऱ्या वादावर काहीतरी मार्ग निघेल असे अंतर्गत सूत्रांना वाटते. भाजपचे अध्यक्ष नड्डा यांनी सलोख्याच्या गोष्टी सुरू केलेल्या आहेतच. संघ नसेल तर भाजप नवी काँग्रेस होईल हेही त्यांना कळून चुकले आहे. प्रत्येक जिल्ह्यातून संघाने आपले राजकीय स्वयंसेवक काढून घेतले तर भाजपमध्ये इतर पक्षांतून फुटून आलेले लोक तेवढे राहतील. चिंताग्रस्त भाजप मंत्रिमंडळ तयार करण्यात गुंतलेला असताना संघाचे ज्येष्ठ नेते सुरेश सोनी यांचा दरवाजा ठोठावण्यात आला. संघात सोनी यांच्याकडे आदराने पाहिले जाते. त्यांनी गुजरातमध्ये काम केले असून, मोदी यांना गुजरातमधून दिल्लीला आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

प्रतिनिधीमार्फत किंवा अन्य प्रकारे सरकार चालवण्यात संघाला अजिबात रस नाही असे संघटनेच्या नेतृत्वाने भाजपला स्पष्ट केले आहे. नवा पक्षप्रमुख नेमला जाईल तेव्हा संघाचा सल्ला घेतला तर बरे, एवढीच अपेक्षा आहे हा अध्यक्ष संघाचा समर्पित स्वयंसेवक असावा, असेही पक्षाला कळवण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकाही जवळ आलेल्या आहेत, हे पक्षाने संघाच्या निदर्शनास आणून दिले. कार्यकारी अध्यक्ष नेमावा अशीही कल्पना पुढे आली. काही नावांवर चर्चाही झाली. त्यात महाराष्ट्रातून आलेले भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि शिवराजसिंह चौहान यांचा उल्लेख होता; परंतु भाजप नेतृत्वाने जानेवारी २०२५ पर्यंत नड्डा यांनाच अध्यक्ष ठेवावे, अशी सूचना केली. भाजपशी समन्वय ठेवण्याचे काम संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे व सह सरचिटणीस अरुणकुमार हे करत असले तरीही सध्याचा पेचप्रसंग मात्र सुरेश सोनी यांच्यावर सोपविण्यात आला आहे.

खट्टर यांचा हरयाणात हस्तक्षेप
करनालमधून लोकसभेवर निवडून आल्यानंतर मनोहरलाल खट्टर यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. अर्थातच त्यांनी मुख्यमंत्रिपद सोडले; परंतु राज्याच्या कारभारात ढवळाढवळ त्यांनी थांबवलेली नाही. चंडिगडमधील मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यातच ते तळ ठोकून आहेत. त्यांचे उत्तराधिकारी नायब सिंह सैनी यांना कारभार करताना खट्टर यांचे मार्गदर्शन लागते असे सांगण्यात आले. खट्टर हे मोदींचे निष्ठावंत असून, पूर्णवेळ संघस्वयंसेवक आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसारच खट्टर यांचे दुसरे निष्ठावंत मोहनलाल बदोली यांना हरियाणा भाजपचे अध्यक्ष करण्यात आले. सोनीपतमधून बदोली लोकसभा निवडणूक लढले; परंतु त्यांना अपयश आले. ते भाजपचे आमदार आहेत. जातीने ब्राह्मण असल्याने राज्यातील विगर जाट मते त्यांच्यामुळे पक्षाकडे वळतील अशी आशा भाजपला आहे. खट्टर पंजाबी असून, सैनी इतर मागासवर्गीय आहेत. जाट मते काँग्रेस, लोकदल आणि जेजेपी अशा तीन पक्षांत विभागली जातील अशी भाजपची अटकळ असून, तिसऱ्यांदा यश मिळवायचे तर पक्षाला बरेच झगडावे लागेल, लोकसभा निवडणुकीतही पक्षाला जोरदार फटका बसला. १० पैकी पाच जागा पक्षाने गमावल्या. मतांची टक्केवारीही घसरली. डिसेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होत असल्याने अँटी इन्कम्बन्सीचा त्रास होऊ नये म्हणून पक्षाने त्यांना हटवले असताना राज्यातील पक्षाचा चेहरा म्हणून अजूनही खट्टर यांनाच का समोर ठेवले जाते, याचे अनेकांना आश्चर्य वाटते.

Web Title: How to extinguish the fire in the family? The new chapter of controversy between BJP and RSS Sangh is never ending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.