खळबळजनक! शाळेतलं प्रेम, लव्ह मॅरेज... कपलने उचललं टोकाचं पाऊल; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 09:09 AM2024-07-08T09:09:45+5:302024-07-08T09:10:48+5:30

हरीश बगेश आणि संचिता श्रीवास्तव हे दोघेही वाराणसीतील एकाच शाळेत शिकले होते. ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न केलं.

husband And wife end life in gorakhpur after some years of love marriage | खळबळजनक! शाळेतलं प्रेम, लव्ह मॅरेज... कपलने उचललं टोकाचं पाऊल; नेमकं काय घडलं?

फोटो - आजतक

उत्तर प्रदेशमध्ये एका कपलने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाटणाचा रहिवासी हरीश आणि गोरखपूरची रहिवासी संचिता शाळेत असतानाच एकमेकांच्या प्रेमात पडले होते नंतर दोघांनी लग्न केलं. मात्र, लग्नानंतर काही वर्षांनी हरीशने वाराणसीत गळफास लावून आत्महत्या केली. पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने संचिताने देखील वडिलांच्या घरी छतावरून उडी मारून आत्महत्या केली.

कपलच्या आत्महत्येनंतर दोन्ही कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीश बगेश आणि संचिता श्रीवास्तव हे दोघेही वाराणसीतील एकाच शाळेत शिकले होते. अकरावीत ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न केलं. यानंतर हे कपल मुंबईत राहू लागलं. हरीशने एमबीए केल्यानंतर खासगी बँकेत नोकरी केली.

काही दिवसांनी जेव्हा संचिता श्रीवास्तवची तब्येत बिघडली तेव्हा तिचे वडील आणि गोरखपूरचे प्रसिद्ध डॉक्टर रामचरण दास तिला आपल्या शहरात घेऊन गेले. संचितावर गोरखपूरमध्येच उपचार सुरू होते. पत्नीची काळजी घेण्यासाठी हरीशही बँकेची नोकरी सोडून गोरखपूरला आला आणि गेल्या अनेक महिन्यांपासून सासरच्या घरी राहून पत्नीची काळजी घेत होता.

रिपोर्टनुसार, या काळात हरीशने अनेक ठिकाणी नोकरी शोधली, पण निराशा झाली. त्याला कुठेही नोकरी मिळाली नाही. यानंतर दोन दिवसांपूर्वी हरीश पाटणा येथील आपल्या घरी जात असल्याचं सांगून सासरच्या घरातून निघून गेला, मात्र तो वाराणसीला गेला. कुटुंबीयांचा फोन न उचलल्यानंतर, कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला आणि वाराणसीतील सारनाथ भागात पोहोचले, जिथे हरीश होम स्टेच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळला.

हरीशचे सासरे आणि गोरखपूर येथील डॉ. रामचरण दास यांना याबाबत माहिती मिळताच ते वाराणसीला रवाना झाले. मात्र, पतीचा मृत्यू झाल्याची माहिती मुलीला समजताच तिला ते सहन न झाल्याने तिने छतावर जाऊन खाली उडी मारली. यामध्ये तिचाही मृत्यू झाला.

सारनाथमध्ये पोलिसांनी आधार कार्डवरून हरीशच्या मृतदेहाची ओळख पटवली. त्याच्या वडिलांचं नाव रामास्वामी मालवीय आहे. पोलिसांनी हरीशचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. मात्र, घटनास्थळावर कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. नोकरी गेल्यानंतर हरीश नैराश्यात राहू लागला आणि त्याला ड्रग्जचं व्यसन लागलं, असं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
 

Web Title: husband And wife end life in gorakhpur after some years of love marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न