...म्हणून आज बाळासाहेब ठाकरे असते तर- अरविंद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 16:22 IST2019-08-06T15:34:38+5:302019-08-06T16:22:02+5:30
राज्यघटनेच्या कलम 370 हटवून जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा रद्द करण्याचा धाडसी निर्णय घेऊन नरेंद्र मोदी सरकारने सोमवारी सर्वांना धक्का दिला आणि 65 वर्षांचा इतिहासही पुसून टाकला.

...म्हणून आज बाळासाहेब ठाकरे असते तर- अरविंद सावंत
नवी दिल्ली: राज्यघटनेच्या कलम 370 हटवून जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा रद्द करण्याचा धाडसी निर्णय घेऊन नरेंद्र मोदी सरकारने सोमवारी सर्वांना धक्का दिला आणि 65 वर्षांचा इतिहासही पुसून टाकला. जम्मू-काश्मीर राज्याचे जम्मू व काश्मीर, तसेच लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याचे सरकारने मांडलेले विधेयकही राज्यसभेने आवाजी मतदानाने मंजूर केले. यानंतर शिवसेनेचे खासदार व केंद्रीय सार्वजनिक अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांनी देखील संसदेच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांचे तोंडभरुन कौतुक केले आहे.
अरविंद सावंत यांनी भाषणात म्हटले की, आज शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे असते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर त्यांनी फुलांचा वर्षाव केला असता. त्याचप्रमाणे कलम 370मुळे काही चुकीच्या लोकांसोबत हातमिळवणी करुन काश्मिरी पंडितांना काश्मीरमधून निघून जाण्यास भाग पाडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच एक लहान मुलगा आपल्या जवानांवर दगडफेक करतो, तेव्हा तुम्हाला त्रास होत नाही का असा सवाल त्यांनी विरोधकांना विचारला.
भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात कलम 370 हटविण्यासंबंधीच्या आश्वासनाचा पुनरुच्चार केला आणि कलम 35- अ कायमस्वरूपी रहिवासी नसलेल्या लोकांसाठी आणि महिलांप्रति भेदभाव करणारे असल्याचे सांगत ते रद्द करण्याचीही ग्वाही दिली होती. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात अमित शहा यांनी गृहमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतानाच जम्मू-काश्मीर आणि दहशतवाद हे प्रमुख विषय असल्याचे सूचित केले होते. कलम 370 तात्पुरते असल्याचे सांगत त्यांनी आपला इरादा स्पष्ट केला. त्यांनी स्वत: जम्मू-काश्मीरचा दौरा करून तेथील स्थितीचा आढावा घेतला आणि राज्यपाल राजवटीला मुदतवाढ दिली.