गेल्या 10 वर्षात किती लाख लोकांना रेल्वेत नोकऱ्या मिळाल्या? रेल्वेमंत्र्यांनी थेट आकडा सांगितला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 16:00 IST2024-11-26T15:59:04+5:302024-11-26T16:00:05+5:30
Railway Jobs: काँग्रेस सरकारच्या दहा वर्षात 4.4 लाख कर्मचाऱ्यांची रेल्वेत नियुक्ती झाली होती.

गेल्या 10 वर्षात किती लाख लोकांना रेल्वेत नोकऱ्या मिळाल्या? रेल्वेमंत्र्यांनी थेट आकडा सांगितला...
Indian Railway Jobs: मोदी सरकारच्या काळात सरकारी नोकऱ्या कमी झाल्याची तक्रार सातत्याने विरोधक करतात. रेल्वे विभागातील नोकऱ्यांबाबत तर अनेकदा चर्चा होते. आता भारतीय रेल्वेने गेल्या 10 वर्षात किती लोकांना नोकरी दिली, याची आकडेवारी समोर आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षात जवळपास 5 लाख कर्मचाऱ्यांची भरती केली आहे.
काँग्रेसच्या काळातील भरतीपेक्षा जास्त
अश्विनी वैष्णव यांनी सांगितल्यानुसार, मोदी सरकारच्या काळात झालेली भरती काँग्रेसच्या काळातील भरतीपेक्षा जास्त आहे. 2004 ते 2014 दरम्यान भारतीय रेल्वेने नियुक्त केलेल्या कर्मचऱ्यांची संख्या 4.4 लाख होती. पण, आता मोदी सरकारच्या काळात 5 लाख कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. ऑल इंडिया एससी/एसटी रेल्वे एम्प्लॉइज युनियनच्या राष्ट्रीय परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
सर्वसामान्यांसाठी 12 हजार जनरल डबे बांधले
केंद्रीय मंत्र्यांनी रेल्वे उत्पादन योजनेबद्दलही माहिती दिली. ते म्हणाले, सर्वसामान्यांच्या सुविधेसाठी नवीन विशेष आणि सामान्य डब्यांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या 12,000 हून अधिक सामान्य डब्यांची निर्मिती केली जात आहे, ज्यामुळे सामान्य लोकांसाठी रेल्वे प्रवास सुलभ होईल. या कार्यक्रमापूर्वी वैष्णव यांनी दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.