भारत-पाक चर्चा लांबणीवर

By admin | Published: January 15, 2016 04:49 AM2016-01-15T04:49:50+5:302016-01-15T04:49:50+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काबूलहून परतताना अचानक लाहोरला जाऊन भारत व पाकिस्तान यांच्यातील गेले वर्षभर ठप्प झालेला द्विपक्षीय संवाद पुन्हा सुरू होण्यासाठी तयार केलेली

Indo-Pak talks to be postponed | भारत-पाक चर्चा लांबणीवर

भारत-पाक चर्चा लांबणीवर

Next

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काबूलहून परतताना अचानक लाहोरला जाऊन भारत व पाकिस्तान यांच्यातील गेले वर्षभर ठप्प झालेला द्विपक्षीय संवाद पुन्हा सुरू होण्यासाठी तयार केलेली अनुकूल पृष्ठभूमी पठाणकोट हवाईदल तळावरील दहशतवादी हल्ल्यामुळे कलुषित होऊ न देण्याची प्रगल्भता गुरुवारी उभय देशांनी दाखविली. आधी ठरलेल्या कार्यक्रमानुसार भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर त्यांच्या पाकिस्तानी समकक्ष अधिकाऱ्याशी चर्चेसाठी शुक्रवारी इस्लामाबादला जाणार होते. परंतु पठाणकोट हल्ल्यामागील ‘जैश-ए-मोहम्मद’ संघटनेच्या विरोधात पाकिस्तान सरकारने सुरू केलेल्या कारवाईचे ठोस फलित समोर येईपर्यंत तूर्तास ही बोलणी पुढे ढकलण्याचा निर्णय दोन्ही देशांनी परस्पर सहमतीने घेतला.
शुक्रवारची नियोजित चर्चा पुढे ढकलण्यात आल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सकाळी प्रथम जाहीर केले. सायंकाळी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही यास दुजोरा दिला व चर्चेचे नवे वेळापत्रक ठरविण्यासाठी दोन्ही देश परस्परांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट केले. एवढेच नव्हे, तर पठाणकोट हल्ल्याच्या तपासासाठी विशेष तपासी पथक (एटीएस) पाठविण्याचा पाकिस्तानचा प्रस्तावही भारताने मान्य केला. पाकिस्तानच्या या तपासी पथकाला हरतऱ्हेचे सहकार्य देण्यात येईल, असेही परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी स्पष्ट केले. मात्र ‘जैश’चा म्होरक्या मसूद अजहर यास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याच्या पाकिस्तानी प्रसिद्धिमाध्यमांनी बुधवारी दिलेल्या दोन्ही सरकारांकडून दुजोरा न मिळाल्याने मसूदविषयीची अनिश्चितता कायम राहिली. किंबहुना मसूदला जेरबंद करण्यात पाकिस्तान कितपत गंभीर आहे, हे स्पष्ट न झाल्यानेच नियोजित चर्चेसाठी आणखी थोडे दिवस थांबण्याचे भारताने ठरविले असावे, असे माहीतगार सूत्रांना वाटते.
परराष्ट्र सचिव जयशंकर व पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी एकमेकांशी बोलले. उभय देशांतील चर्चेचा कार्यक्रम ‘अगदी नजीकच्या भविष्यात’ निश्चित केला जाईल, असे त्यांनी ठरविले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

शुक्रवारची नियोजित चर्चा पुढे ढकलण्यात आल्याचे पाकिस्तानने गुरुवारी सकाळी प्रथम जाहीर केले. सायंकाळी भारतानेही यास दुजोरा दिला.

टोकाची भूमिका टाळली
पठाणकोट हल्ल्यात हात असल्याच्या संशयावरून पाकिस्तानने ‘जैश-ए-महंमद’ या दहशतवादी संघटनेच्या डझनभर लोकांना स्थानबद्ध केल्याचे भारताने स्वागत केले आहे. प्रत्यक्ष कारवाई हवी असल्यामुळे पोकळ निवेदने उपयोगाची नाहीत यावर भारताने भर दिला होता. त्यानंतर जैश-ए-महंमदवर झालेली कारवाई ही ‘महत्त्वाचे आणि सकारात्मक पहिले पाऊल’ असल्याचे भारताने म्हटले. पठाणकोट हल्ल्यात पाकिस्तानी घटक सहभागी नाहीत, असे म्हणत या वेळी पाकिस्तानने अंग झटकले नाही. तसेच भारताने आपल्या बाजूने चर्चा रद्दही केली नाही. यापूर्वी या दोन्ही देशांकडून ज्या गोष्टी घडल्या त्या या वेळी टाळल्या गेल्या.

पाकची कारवाई सकारात्मक
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ‘‘पठाणकोट तळावरील हल्ल्यासंदर्भात पाकिस्तान सरकारने बुधवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्या हल्ल्याशी संबंधित असलेल्या दहशतवादी तत्त्वांच्या चौकशीत ‘महत्त्वाची प्रगती’ झाली असल्याचे कळविण्यात आले आहे.’’ जैश-ए-महंमदविरोधात करण्यात आलेली कारवाई हे सकारात्मक पहिले पाऊल आहे. जैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अजहर याला स्थानबद्ध करण्यात आल्याचे वृत्त बुधवारी पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिले व तेच भारतीय प्रसारमाध्यमांनीही दिले; मात्र हे वृत्त खोटे ठरले. परंतु भारताने चर्चेचा मुद्दा या स्थानबद्धतेशी जोडला नाही.

पाकिस्तान एअरलाइन्सच्या कार्यालयाची नासधूस
नवी दिल्ली : बाराखंबा मार्गावरील पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या (पीआयए) कार्यालयावर गुरुवारी उजव्या संघटनेच्या एका गटाने हल्ला केला. दुपारी ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली. पोलीस उपायुक्त (नवी दिल्ली) जतीन नरवाल यांनी या घटनेला दुजोरा देत योग्य कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. गेल्या वर्षी एका इसमाने दिल्लीतील केरळ हाउसमध्ये गोमांस वाढले जात असल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर खळबळ उडाली होती. राजकीय पातळीवरही या प्रकरणाची चर्चा झाली होती. त्याच व्यक्तीशी संबंधित काही लोकांनी पीआयएच्या कार्यालयात धुडगूस घातल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Indo-Pak talks to be postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.