काश्मीरहून जास्त हिंसा पश्चिम बंगालच्या निवडणुकीत- मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 15:39 IST2019-05-15T15:38:53+5:302019-05-15T15:39:44+5:30
पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हिंसेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला

काश्मीरहून जास्त हिंसा पश्चिम बंगालच्या निवडणुकीत- मोदी
नवी दिल्ली- पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हिंसेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी म्हणाले, पश्चिम बंगालच्या तुलनेत जम्मू-काश्मीरमधल्या निवडणुका जास्त शांततापूर्ण झाल्या. मोदी न्यूज 18 या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
हिंसा आणि दहशतवादाचा विषय आल्यास काश्मीरचं नाव येतं. परंतु त्याच काश्मीरमध्ये पंचायत निवडणुकीदरम्यान 30 हजार लोक बाहेर पडले होते. त्यावेळीसुद्धा एवढी हिंसा झाली नाही. जे लोक लोकशाहीवर विश्वास ठेवतात आणि तटस्थ राहतात, त्यांचं मौनही फारच चिंताजनक आहे. कारण काहींचा पूर्ण कार्यकाळ मोदींच्या विरोधात द्वेष पसरवण्यात गेला. त्यामुळेच देशाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. हिंसा आणि दहशतवाद म्हटल्यास पहिलं नाव काश्मीरचं येतं. परंतु काश्मीरमधल्या पंचायत निवडणुकीतही एवढी हिंसा झालेली नाही. तर दुसरीकडे बंगालच्या पंचायत निवडणुकीत शेकडो लोक मारले गेले आहेत.
जे जिंकून आलेत, त्यांची घरं जाळण्यात आली आहेत. त्यांना झारखंड किंवा अन्य राज्यांत जाऊन 3-3 महिने लपून राहावं लागतं आहे. त्यांचा गुन्हा एवढाच आहे की ते निवडणुकीत जिंकले आहेत. त्यावेळी लोकशाहीची भाषा करणारे लोक मूग गिळून गप्प होते. भाजपा याविरोधात आवाज उठवत होता. तिथे भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टरही उतरवू दिलं नाही. शेवटच्या क्षणी सर्व रद्द करण्यात आलं, असंही मोदी म्हणाले आहेत.