असहिष्णुता : लोकसभेचे कामकाज चार वेळा तहकूब

By admin | Published: December 1, 2015 02:42 AM2015-12-01T02:42:50+5:302015-12-01T09:08:50+5:30

असहिष्णुतेच्या मुद्यावर लोकसभेत सुरू झालेल्या चर्चेला सुरुवातीलाच वेगळे वळण लागले. मोदी सत्तेवर आल्यानंतर एका ठिकाणी बोलताना गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘पृथ्वीराज चौहान

Intolerance: The Lok Sabha proceedings are quashed four times | असहिष्णुता : लोकसभेचे कामकाज चार वेळा तहकूब

असहिष्णुता : लोकसभेचे कामकाज चार वेळा तहकूब

Next

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली

असहिष्णुतेच्या मुद्यावर लोकसभेत सुरू झालेल्या चर्चेला सुरुवातीलाच वेगळे वळण लागले. मोदी सत्तेवर आल्यानंतर एका ठिकाणी बोलताना गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘पृथ्वीराज चौहान यांच्यानंतर ८00 वर्षांनी भारतात कोणी हिंदु शासक आला आहे’ असे उद्गार काढले होते, असा आरोप माकप खासदार मोहम्मद सलिम यांनी करताच गृहमंत्री चांगलेच व्यथित झाले.
खा. सलीम यांचे वाक्य कामकाजातून काढून टाकण्यात यावे, अशी मागणी सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आली, मात्र त्यास विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतल्याने एकच गदारोळ झाला. त्यामुळे दिवसभरात चारवेळा कामकाज तहकूब करावे लागले.
अधिवेशनात आता केंद्र सरकारच्या दृष्टिने अत्यंत संघर्षाचा काळ सुरू झाला आहे, याची चुणूक सभागृहातल्या तणावात जाणवत होती.
लोकसभेत असहिष्णुतेच्या चर्चेचा प्रारंभ करतांना आऊटलूक नियतकालिकाचा अंक सभागृहात सादर करीत व त्यातल्या लेखाचा हवाला देत मार्क्सवादी सदस्य मोहम्मद सलीम म्हणाले, मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर गृहमंत्रीच म्हणतात, की ८00 वर्षांच्या गुलामीनंतर भारतात हिंदू शासक सत्तेत परतला आहे. रा.स्व. संघाच्या बैठकीत ते असे बोलल्याचा उल्लेख या नियतकालिकाच्या नोव्हेंबर महिन्याच्या अंकात आहे. सलीम यांच्या वाक्यावर गृहमंत्री सिंह यांनी जोरदार आक्षेप घेतला. ‘खासदार मोहम्मद सलीम यांच्या आरोपाने आज मी जितका व्यथित झालो, तितका आयुष्यात कधीच झालो नाही. प्रत्येक वाक्य मी कायम जपूनच बोलतो. खासदारांनाच नव्हे तर अल्पसंख्य समुदायालाही याची कल्पना आहे’, असे उद्गार गृहमंत्र्यांनी सभागृहाला ऐकवले.
त्यावर खा, सलीम म्हणाले, गृहमंत्री म्हणतात की हे वाक्य ते बोललेच नाहीत, मग माझा इतकाच सवाल आहे की मजकूर प्रसिध्द झाल्यानंतर गेले १५ दिवस त्याचे गृहमंत्र्यांनी खंडन का केले नाही? तमाम गुप्तचर यंत्रणा हाताशी आहेत. कोणीच याविषयी तुम्हाला कसे कळवले नाही? माहिती खोटी असेल तर संबंधित पत्रकाराला कायदेशीर नोटीस का पाठवली नाही?
केंद्र सरकारवर चौफेर हल्ला चढवीत सलीम म्हणाले, असहिष्णुतेचा माहोल देशात वेगाने वाढतो आहे. आपली असहमती व्यक्त करण्यासाठी मान्यवर लेखक, साहित्यिक, वैज्ञानिक, कलाकार, इतिहासतज्ज्ञ आपले पुरस्कार परत करीत आहेत.
हे पुरस्कार त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टाची पूंजी आहे. त्यांचा उपहास करतांना सत्ताधारी म्हणतात ही कृत्रिम असहमती आहे. हे बोलून तुम्ही कोणाचा अपमान करता आहात? अपमान करणाऱ्यांबरोबर त्याचा निषेध करणाऱ्यांची संख्याही वाढतच चालली आहे. असहिष्णुतेचा साक्षात्कार घडवणारे लोक मुख्यत्वे सत्तेशी संबंधित आहेत. त्यात केंद्रातले मंत्री आणि सत्ताधारी खासदारही आहेत. त्यांना कोणी आवरणार आहे की नाही, असा सवाल खा. सलिम यांनी केला.
सलिम यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप सत्ताधारी सदस्यांच्या वर्मावर घाव घालणारे ठरले. सभागृहात भाजपचे बहुतांश सदस्य आरडाओरड करीत आपल्या संतापाचे प्रदर्शन घडवीत होते. एका नियतकालिकातील मजकुराच्या भरवशावर सलूम यांनी गृहमंत्र्यांवर आरोप केला आहे, त्यांनी आपले विधान मागे घ्यावे, तरच सभागृहाचे कामकाज सुरळीत चालेल, असा आग्रह संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव प्रताप रूडी वारंवार करीत होते. त्यावर सलीम म्हणाले, व्यक्तिश: राजनाथसिंहांविषयी मला आदर आहे. मोदींऐवजी ते पंतप्रधान झाले असते तर मला नक्कीच आवडले असते!
असहिष्णुतेच्या मुद्यावर सुरू झालेल्या चर्चेला वेगळे वळण लागत असल्याचे पाहून लोकसभा लोकसभाध्यक्षांनी चारदा सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

Web Title: Intolerance: The Lok Sabha proceedings are quashed four times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.