आयटी कंपनीची मालकीण पडली कर्मचाऱ्याच्या प्रेमात, लग्नही केलं, पण तो ५ कोटी घेऊन झाला फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 10:24 IST2025-01-19T10:24:07+5:302025-01-19T10:24:41+5:30
Crime News: आयटी कंपनीची मालकीण असलेल्या एका महिलेसोबत प्रेमसंबंधांतून अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. ही महिला कंपनीतील एका कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली. तसेच त्याच्यासोबत लग्नही केलं. मात्र लग्नाला काही काळ लोटल्यानंतर तिचा पती तिला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून फरार झाला.

आयटी कंपनीची मालकीण पडली कर्मचाऱ्याच्या प्रेमात, लग्नही केलं, पण तो ५ कोटी घेऊन झाला फरार
आयटी कंपनीची मालकीण असलेल्या एका महिलेसोबत प्रेमसंबंधांतून अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. ही महिला कंपनीतील एका कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली. तसेच त्याच्यासोबत लग्नही केलं. मात्र लग्नाला काही काळ लोटल्यानंतर तिचा पती तिला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून फरार झाला. यासंदर्भात गुजरातमधील या महिलेने ओदिशामधील भद्रक जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी तक्रारीनंतर काहीच कारवाई न केल्याने वैतागलेल्या सदर महिलेने पोलील ठाण्यामध्येच जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या महिलेला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार पीडित महिला अहमदाबादमधील एका आयटी कंपनीची मालकीण होती. ती तिच्या कंपनीत काम करत असलेल्या मनोज नायक नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली. त्यानंतर त्यांनी लग्न केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांचाही एक दोन वर्षांचा मुलगाही आहे. दरम्यान, मनोज याने विवाह केल्यानंतर आपल्या गावात एक व्यवसाय सुरू करण्यासाठी कंपनीची मालकीण असलेल्या पत्नीला राजी केले. त्यानंतर या महिलेने कंपनी आणि संपत्ती गहाण ठेवत सुमारे ५ कोटी रुपये महिलेला दिले.
मात्र हे पाच कोटी रुपये घेतल्यानंतर मनोज या महिलेला सोडून फरार झाला. त्यानंतर पोलिसांनी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. मात्र तीन महिले लोटले तरी पोलिसांना काही माहिती मिळू शकली नाही. तक्रारीनंतरही फारसा तपास न झाल्याने त्रस्त झालेल्या बोनठ पोलीस ठाण्यात जाऊन फिनाईलचं सेवन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. हे दृश्य पाहून पोलीस कर्मचारीही हादरले. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता उपचारांनंतर या महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
महिलेच्या भावाने सांगितले की, माझी बहीण मागच्या तीन महिन्यांपासून त्रस्त आहे. तसेच पोलिसांच्या बेफिकीरीमुळे तिनं आज टोकाचं पाऊल उचललं, असा आरोप त्याने केला.