जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात १७ वर्षांनंतर न्याय, ४ दहशतवाद्यांना जन्मठेप; झाला होता ७१ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 16:40 IST2025-04-08T16:39:57+5:302025-04-08T16:40:47+5:30
१३ मे २००८ रोजी जयपूर येथे एकापाठोपाठ एक असे आठ बॉम्बस्फोट झाले होते. एक बॉम्ब चांदपोल बाजारातील एका मंदिराजवळ सापडला होता. जो निकामी करण्यात आला. या साखळी बॉम्बस्फोटात ७१ जणांचा मृत्यू झाला होता.

जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात १७ वर्षांनंतर न्याय, ४ दहशतवाद्यांना जन्मठेप; झाला होता ७१ जणांचा मृत्यू
जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी चार दहशतवाद्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जयपूरच्या विशेष न्यायालयाने मोहम्मद सैफ, मोहम्मद सरवर आझमी, सैफुर्रहमान आणि शाहबाज अहमद यांना दोषी ठरवले होते. यानंतर त्यांना मंगळवारी (८ एप्रिल) ही शिक्षा सुनावण्यात आली.
झाला होता ७१ जणांचा मृत्यू -
१३ मे २००८ रोजी जयपूर येथे एकापाठोपाठ एक असे आठ बॉम्बस्फोट झाले होते. एक बॉम्ब चांदपोल बाजारातील एका मंदिराजवळ सापडला होता. जो निकामी करण्यात आला. या साखळी बॉम्बस्फोटात ७१ जणांचा मृत्यू झाला होता.
१७ वर्षांनंतर मिळाला न्याय -
जयपूर बॉम्बस्फोटाशी संबंधधित प्रकरणांत चौघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. यानंतर, राजस्थान उच्च न्यायालयाने मार्च २०२३ मध्ये सर्वांना निर्दोष सोडले होते. १७ वर्षे जुन्या या प्रकरणात, सरकारी वकिलांनी ११२ साक्षीदारांचे जबाब नोंदवले, तर सुमारे १२०० कागदपत्रे न्यायालयात सादर केली. यानंतर न्यायालयाने मंगळवारी (८ एप्रिल) ६०० पानांचा निकाल दिला.
तीन आरोपी अद्यापही फरार -
या प्रकरणात पोलिसांनी एकूण १३ झणांना आरोपी केले होते. यांतील तीन जण अद्यापही फरार आहेत. तर दोन जण हैदराबाद आणि दिल्लीतील कारागृहात आहेत. तर दोन जण दिल्लीतील बाटला हाऊस एनकाउंटरमध्ये मारले गेले होते.
सायंकाळच्या सुमारास झाले होते स्फोट -
चांदपोलमध्ये सापडलेल्या नवव्या जिवंत बॉम्बच्या प्रकरणात न्यायालयात स्वतंत्र सुनावणी झाली. गेल्या ४ एप्रिल २०२५ रोजी जयपूरच्या विशेष न्यायालयाने चार आरोपींना दोषी ठरवले होते. १३ मे २००८ रोजी राजधानी जयपूरमधील गर्दीच्या ठिकाणी सायंकाळी ७.३० वाजता आठ स्फोट झाले. या स्फोटात १८५ हून अधिक लोक जखमी झाले होते. जोहरी बाजार, सांगानेरी गेट, चांदपोल बाजार आणि त्रिपोलिया बाजार अशा वर्दळीच्या ठिकाणी हे स्फोट झाले होते.