बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना 'भारतरत्न', CM नितीश कुमार म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 21:50 IST2024-01-23T21:48:52+5:302024-01-23T21:50:20+5:30
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना 'भारतरत्न', CM नितीश कुमार म्हणाले...
Karpoori Thakur Bharat Ratna: बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि थोर समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर (Karpoori Thakur) यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च सन्मान 'भारतरत्न' देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयावर मुख्यमंत्रीनितीश कुमार यांनी मनापासून आनंद व्यक्त केला. त्यांनी केंद्राचा हा निर्णय योग्य असल्याचे म्हटले.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जननायक कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. कर्पूरी ठाकूर यांच्या 100व्या जयंतीनिमित्त हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्याच्या घोषणेमुळे दलित, वंचित आणि उपेक्षित घटकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. 'केंद्र सरकारने अगदी योग्य निर्णय घेतला आहे. जनता दल युनायटेडची अनेक वर्षांची मागणी आता पूर्ण झाली आहे,' अशी प्रतिक्रिया दिली.
कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्नने सन्मानित केल्याबद्दल जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय सचिव राजीव रंजन प्रसाद म्हणाले, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अनेक वेळा 'जननायक' कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. आज पीएम मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने ती मागणी पूर्ण केली, याचा आम्हाला आनंद आहे.
लालूंचा पक्ष काय म्हणाला?
जननायक कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याच्या निर्णयाला राष्ट्रीय जनता दलाने आरजेडीच्या प्रदीर्घ संघर्षाचे यश म्हटले आहे. आरजेडीचे मुख्य प्रवक्ते शक्ती सिंह यादव आणि चित्तरंजन गगन यांनी स्वतंत्र वक्तव्ये जारी करून म्हटले की, आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखाली आरजेडी जननायक कर्पूरी ठाकूरजी यांना भारतरत्न देण्याची मागणी अनेक दिवसांपासून करत होते. कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न मिळणे हा केवळ बिहारचाच नाही तर कर्पूरी ठाकूर यांना आपला आदर्श मानणाऱ्या देशातील करोडो जनतेचा विजय आहे.