शाळकरी मुलीने वर्षभरापूर्वीच लिहिली होती लघुकथा; वायनाडमध्ये अगदी तसंच घडलं, नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 14:21 IST2024-08-02T14:10:35+5:302024-08-02T14:21:38+5:30
Kerala Wayanad News : केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलनाची मोठी दुर्घटना घडली. या घटनेत ३०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला.

शाळकरी मुलीने वर्षभरापूर्वीच लिहिली होती लघुकथा; वायनाडमध्ये अगदी तसंच घडलं, नेमकं प्रकरण काय?
Kerala Wayanad News : केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलनाने ३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. वायनाडमध्ये अजूनही मदतकार्य सुरू आहे. बचाव पथक मातीच्या ढिगाऱ्याखाली असणाऱ्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. देशभरातून या घटनेवरुन चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आता वेगवेगळी माहिती समोर येण्यास सुरुवात झाली आहे. वायनाड मधील भूस्खलन झालेल्या घटनेसारखीच एक लघुकथा एका लहान मुलीने लिहिल्याची माहिती समोर आली आहे. या मुलीने लिहिलेली कथा एका मॅगझिनमध्ये छापुनही आली होती. ही लहान मुलगी इयत्ता आठवीत शिकते. तिने लिहिलेली कथा आता खरी ठरल्याची चर्चा सुरू आहे.
रस्ते अपघातग्रस्तांसाठी मोठी 'योजना', गडकरींनी संसदेत दिली महत्वाची महिती!
नेमकं प्रकरण काय?
या मुलीचे नाव लाया असं आहे. ती इयत्ता आठवीत शिकते. गेल्या वर्षी तिने शाळेत एका लघुकथा लिहिली होती, तिने ही कथा तिच्या एवढ्याच मुलीची लिहिली होती. लायाची ही कथा गेल्या वर्षी स्कूल मॅगझिनमध्येही प्रसिद्ध झाली होती. लायाने लिहिलेली कथा धबधब्यात बुडणाऱ्या मुलीची होती. तिचा बुडून मृत्यू होतो आणि मृत्यूनंतर ती पक्ष्याच्या रूपाने गावात परतते. लायाच्या कथेत पक्षी गावातील मुलांना म्हणते, 'मुलांनो, या गावातून पळून जा. इथे मोठा धोका होणार आहे.' यानंतर मुलं गाव सोडून पळू लागतात. त्यांनी मागे वळून पाहिले तर डोंगरावरुन जोरात पावसाचे पाणी वाहते. कथेत यानंतर पक्ष्याचे रूपांतर एका सुंदर मुलीत होते, आणि काही क्षणातच ती गायबही होते.
वायनाडमधील चुरमला भूस्खलनाच्या विळख्यात बुडाले आहे. लायाच्या कथेपेक्षा वेगळे, येथील वातावरण अतिशय वेदनादायक आहे. लायाने तिचे वडील लेनिन यांनाही गमावले आहे. लायाच्या शाळेतील ४९७ विद्यार्थ्यांपैकी ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर दोन विद्यार्थ्यांनी त्यांचे वडील आणि भावंडही गमावले आहेत. शाळेचीही दुरवस्था झाली आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे शाळेच्या मैदानाचे आणि इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे.
उत्तराखंडमध्येही पावसामुळे मोठं नुकसान
दिल्लीसह देशातील अनेक शहरांत पावसामुळे विध्वंस झाल्याचं पाहायला मिळत आहे. मान्सूनने देशातील अनेक भागात धुमाकूळ घातला आहे. काल (३१ जुलै) दिल्लीत विक्रमी पाऊस झाला, आजही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हिमाचलमधील कुल्लू आणि शिमला जिल्ह्यांजवळ ढगफुटी झाली आहे, ज्यामध्ये तब्बल ४४ लोक बेपत्ता आहेत आणि ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडच्या टिहरी गढवाल आणि केरळच्या वायनाडमध्येही भूस्खलन झालं आहे.