सोनियांच्या नेतृत्वात धरणे
By admin | Published: August 4, 2015 11:52 PM2015-08-04T23:52:28+5:302015-08-04T23:52:28+5:30
लोकसभेत आपल्या २५ सदस्यांच्या निलंबनाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत काँग्रेस खासदारांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात
नवी दिल्ली : लोकसभेत आपल्या २५ सदस्यांच्या निलंबनाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत काँग्रेस खासदारांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात मंगळवारी संसद भवन परिसरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ काळ्या फिती लावून धरणे दिली. आमच्या सर्व खासदारांना संसदेतून बाहेर फेकले तरी आम्ही मागे हटणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
निलंबनाची कारवाई म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला, तर मुख्य विरोधी पक्ष परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज, मुख्यमंत्रिद्वय वसुंधरा राजे आणि शिवराजसिंह चौहान य् ाांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम राहील, असे राहुल यांनी ठासून सांगितले.
काँग्रेस अध्यक्षा पक्षाच्या धरणे आंदोलनात सहभागीच झाल्या नाही, तर ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, ए. के. अँटोनी आणि आनंद शर्मा यांच्यासोबत त्यांनी लोकसभा अध्यक्षांविरुद्ध जोरदार घोषणाही दिल्या.
माजी पंतप्रधान मनमोहनसिंगही यावेळी उपस्थित होते. समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय जनता दलाचे सदस्यही काँग्रेस खासदारांसोबत आंदोलनात सहभागी झाले होते. लोकसभा अध्यक्षांचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा आरोप सपा अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी केला.
उत्तर प्रदेशात लखनौ आणि जम्मूत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्ष खासदारांच्या निलंबनाविरुद्ध निदर्शने केली.
नवी दिल्ली : संसद परिसरात सरकारविरुद्ध जोरदार आघाडी उघडण्यात पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी मंगळवारी सक्रिय भूमिका बजावली. स्वत: आक्रमक होताना राहुल, सोनिया गांधी यांनी आपल्या खासदारांवरही बारीक नजर ठेवली. ज्योतिरादित्य शिंदे, सुष्मिता देव, गौरव गोगोई, राजीव सातव, रजनी पाटील हे घोेषणाबाजी करण्यात अग्रेसर होते.
धरणे दिले जात असताना अचानक राजीव सातव यांचा शोध सुरू झाला. कारण काळे झेंडे, काळे कपडे त्यांच्याकडे होते. त्यांच्या नावाचा पुकारा होताच ते धावत आले आणि त्यांनी सर्व सामग्री सोपविली. दुसरीकडे अंबिका सोनी आणि अशोक चव्हाण टीव्हीवर बाईट देण्यात व्यग्र होते. सोनिया गांधी यांची नजर त्यांच्यावर पडताच त्यांनी या दोघांना धरणे देण्यासाठी बोलावण्याचा आदेश दिला.
सुब्बीरामी रेड्डी यांच्याकडेही सोनिया गांधी यांचे लक्ष गेले. त्यांनी काळे कपडे परिधान केले नव्हते. सोनियांनी त्याबद्दल विचारताच त्यांनी घाईघाईत कपडे चढविले. सोनिया, राहुल यांनी घोषणा देत आवाज बुलंद केला, मात्र गुलाम नबी आझाद यांचा स्वर ऐकू येत नव्हता. सोनियांनी त्यांना नम्रपणे विचारले की, तुम्ही घोषणा देत नाहीत काय? मग काय गुलाम नबींनीही आवाज वाढविला. नबींकडेच धरणेस्थळावरील संपूर्ण व्यवस्था सोपविण्यात आली होती. खा. विजय दर्डा, मोतीलाल व्होरा, अहमद पटेल यांच्यासह सर्व खासदार उपस्थित होते. बुधवारीही धरणे आंदोलन सुरूच राहील.
(लोकमत न्यूज नेटवर्क)