भाजपासमोर आणखी एक संकट; सरकार बनवण्यापूर्वीच घटक पक्षांच्या मागणीनं टेन्शन वाढलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 17:58 IST2024-06-05T17:58:02+5:302024-06-05T17:58:59+5:30
loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता दिल्लीत सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

भाजपासमोर आणखी एक संकट; सरकार बनवण्यापूर्वीच घटक पक्षांच्या मागणीनं टेन्शन वाढलं
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर आता दिल्लीत सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी एनडीए असो वा विरोधी इंडिया आघाडीची राजधानीत बैठक सुरू आहेत. त्यात एनडीए सरकार आजच सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याचं बोललं जातं. ८ जून रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. मात्र नवीन सरकार स्थापनेपूर्वी एनडीएच्या घटक पक्षांच्या मागण्या वाढल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नीतीश कुमार यांच्या जेडीयूने ४ केंदीय मंत्रालयाची मागणी केली आहे. तर चिराग पासवान यांनी २, जीतनराम मांझी यांनी १ आणि टीडीपीनेही ४ मंत्रालयाची मागणी केली आहे. लोकसभा निकालात भाजपा प्रणित एनडीएला बहुमत मिळालं परंतु भाजपाला स्वबळावर २४० जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे बहुमतासाठी घटक पक्षांची गरज भाजपाला लागणार आहे. अशावेळी घटक पक्षांनी नव्या सरकारमध्ये अधिकच्या मंत्रालयाची मागणी केली आहे.
आज एनडीएची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीला तेलुगु देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू, जेडीयू नेते बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार, शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकजनशक्ती पार्टीचे चिराग पासवान यासह इतर नेते हजर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपाला २४० जागा जिंकता आल्या. तर टीडीपी १६, जेडीयू १२, शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला ७, चिराग पासवान यांना ५ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे नव्या सरकार स्थापनेत घटक पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळेच घटक पक्षांची मागणी वाढली आहे.
सर्वात मोठा पक्ष पण आनंद नाही...
लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपानं सर्वाधिक २४० जागा जिंकल्या, सर्वात मोठा पक्ष बनला परंतु भाजपामध्ये आनंदाचं वातावरण नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे भाजपा पक्षाच्या जागा बहुमतापासून दूर आहेत. एक्झिट पोलचे आकडे पाहून भाजपा नेत्यांना २०१९ प्रमाणेच २०२४ मध्येही प्रचंड बहुमत मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु विरोधी इंडिया आघाडीने त्यांच्या स्वप्नावर पाणी टाकलं. सर्वात मोठा फटका भाजपाला उत्तर प्रदेशात बसला. त्याठिकाणी केवळ ३३ जागांवर भाजपाला समाधान मानावं लागलं. मागील निवडणुकीत इथं ६२ जागांवर भाजपा विजयी झाली होती. भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएकडे बहुमत असल्याने नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनू शकतील परंतु या सरकारमध्ये प्रादेशिक घटक पक्षांचं महत्त्व वाढलेलं आहे.